संपूर्ण जिल्ह्यात जलतारा योजना प्रभावीपणे राबविण्याचा संकल्प: जिल्हाधिकारी

    दिनांक :01-Mar-2025
Total Views |
मानोरा, 
Jaltara Yojana : शेती पाणीदार करण्यासाठी पाण्याची उपलब्धता करणे अत्यावश्यक आहे. शेती समृध्द करूनच आपल्या जिल्ह्याचा विकास होवू शकतो, त्यासाठी प्रत्येक शेतकर्‍यांनी जलतारा प्रकल्प योजना १ मार्च पासून शेतात राबविण्याची सुरूवात करावी. आपण आपल्या जिल्ह्याला आकांक्षित जिल्हा न ठेवता प्रेरणादायी करण्याचा संकल्प पूर्ण करू या, यामध्ये सरसकट शेतकर्‍यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन कार्यक्रमाच्या अध्यक्षा जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी बाजार समिती येथे २८ फेब्रुवारीला आयोजित जलतारा प्रकल्प कार्यशाळेत उपस्थित शेतकर्‍यांना केले.
 
 
jaltara
 
कृषी उत्पन्न बाजार समिती व दि आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या जलतारा प्रकल्प कार्यशाळेला जलतारा प्रकल्पाचे जनक प्रा. पुरुषोत्तम वायाळ, उपजिल्हाधिकारी कैलास देवरे, माजी वीज मंडळ सदस्य अनिल राठोड, सभापती संजय रोठे, प्रदीप खंडेलवाल, सुधीर चापके, श्याम तिवारी, विजय चव्हाण, श्याम सवाई, तहसीलदार डॉ. येवलीकर, कृषी अधिकारी भागवत, उपसभापती भुजंगराव राठोड, बाजार समितीचे सर्व संचालक, आर्ट ऑफ लिव्हिंगचे स्वयंसेवक व शेतकरी बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
 
 
 
पुढे जिल्हाधिकारी म्हणाल्या की, शेतकर्‍यांचे आर्थिक जीवन उंचावण्यासाठी जिल्ह्यात चिया पीक घेण्यासाठी अनेक शेतकरी पुढे येत आहे. मनरेगा अंतर्गत ४५० कोटी रुपये शासनाकडून शेती कामासाठी मंजूर करून आणले आहे. बागायती शेती करण्यासाठी जलतारा प्रकल्प अंतर्गत शेतात शोष खड्डे करून पाणी जिरविल्याशिवाय पर्याय नाही. अतिवृष्टी झाली की पंचनामे करा, हे टाळण्यासाठी सर्व शेतकर्‍यांनी जलतारा प्रकल्प योजनेत सहभाग घ्यावा, असे मार्गदर्शन केले.
 
 
आपल्या मार्गदर्शन भाषणात डॉ वायाळ यांनी म्हटले की, शासन व आर्ट ऑफ लिव्हिंगने महाराष्ट्रातील ४४ हजार गावात जलतारा प्रकल्प राबविण्याचा संकल्प केलेला आहे. जलतारा प्रकल्प अंतर्गत २३२ गावे पाणीदार करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी केलेल्या आव्हानाची पूर्तता करण्याचे साकडे शेतकर्‍यांना घातले व जलतारा प्रकल्प सह गावाला तणावमुक्त जीवन, व्यसन मुक्त करण्यासाठी संपूर्ण आर्ट ऑफ लिव्हिंगची टीम अहोरात्र काम करणार असल्याचे सांगीतले.
 
 
यावेळी उपजिल्हाधिकारी कैलास देवरे यांच्यासह मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालक मनोज इंगोले यांनी केले तर आभार सभापती संजय रोठे यांनी मानले.