राज्यात उष्णतेची लाट

30 Mar 2025 17:19:40
मुंबई,
wather up date राज्यात एकीकडे उष्णतेची तीव्र लाट जाणवत असून, विदर्भातील अनेक भागांत तापमान ४० अंश सेल्सिअसच्या वर पोहोचले आहे. उन्हाच्या कडाक्यामुळे रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत असून, नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच हवामान विभागाने राज्यात काही भागांमध्ये पावसाचा इशारा दिल्याने दुहेरी संकट उभे राहिले आहे.
 

wather up date 
 
 
कोकण आणि मध्य महाराष्ट्राला यलो अलर्ट
 
हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या २४ तासांत कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. परिणामी या भागांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. विशेषतः कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी पावसाचा इशारा आहे, तर सातारा, धाराशिव, लातूर, मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.केरळपासून महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने महाराष्ट्रासह इतरही काही राज्यांमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. उष्णतेमुळे आधीच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी हा पाऊस मोठे नुकसानकारक ठरू शकतो. अवकाळी पावसामुळे पिके उध्वस्त होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
 
प्रशासन सतर्क, नागरिकांना सतर्कतेचा सल्ला
 
राज्यातील बदलत्या हवामानाच्या परिस्थितीमुळे प्रशासन सतर्क झाले आहे. संभाव्य पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनांना तयारीत राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0