तभा वृत्तसेवा
चंद्रपूर/मूल,
5 women killed in Chandrapur ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये मानव-वन्यजीव संघर्ष तसा पाचवीलाच पूजला आहे. परंतु, शनिवारी चारगावच्या एकाच परिसरात एकाच दिवशी वाघाने चार महिलांवर हल्ला करून त्यापैकी तिघांना यमसदनी धाडल्याची घडना कदाचित पहिल्यांदाच घडली असावी. या धक्कादायक बातमीची शाई सुकत नाही तोच दुसर्या दिवशी वाघाने चिचपल्लीत आणखी महिलेचा जीव घेतला. एवढे कमी होते की काय, तिसर्या दिवशी, सोमवारी पुन्हा भादुर्णा येथे एक महिला व्याघ्र संकटाची बळी ठरली!

सोमवार, बुध्द पोर्णिमेला एकीकडे ताडोबातील वाघांच्या गणनेची तयारी सुरू असतानाच, भादुर्णा येथील बफर झोन क्षेत्रात एक महिला तेंदुपत्ता तोडण्यासाठी गेली असता, तिकडे असलेल्या वाघाने हल्ला करुन तिला ठार केले. 12 मे रोजी सकाळी 7.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. भुमेश्वरी दीपक भेंडारे असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या त्या महिलेचे नाव आहे. मूल तालुक्यातील भादुर्णा येथील भाऊजी गावतुरे यांची मुलगी भुमेश्वरी हिचा विवाह केवाडा (पेठ) येथील दीपक भेंडारे यांच्यासोबत झाला. काही दिवस केवाडा (पेठ) येथे राहिल्यानंतर भुमेश्वरी सहपरिवार आपल्या वडिलांकडे भादुर्णा येथे राहायला आली. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पती-पत्नी मिळेल ती कामे करीत असे. सोमवारी भुमेश्वरी सकाळीच तेंदुपत्ता तोडण्यासाठी तिच्या आई, वडील आणि पतीसोबत जंगलात गेली होती. तेंदुपत्ता तोडत असताना तिकडे बसलेल्या वाघाने भुमेश्वरीवर झडप घातली व तिला जागीच ठार केले. जवळच असलेल्या आई, वडील आणि पतीने आरडाओरड केल्याने वाघ पळून गेला. वनविभागाने घटनेचा पंचनामा केला व पार्थिव उत्तरीय तपासणीकरीता मूल उपजिल्हा रुग्णालयात पाठविले.
यापूर्वी, सिंदेवाही तालुक्याच्या मेंढामाल येथील काही महिला चारगाव रोड लगतच्या जंगल परिसरात तेंदूपत्ताच वेचण्यासाठी गेल्या होत्या. वाघाने त्यांच्यावर हल्ला चढवला आणि तीन महिलांना ठार केले. मृतकांत शुभांगी चौधरी, कांता चौधरी अशा एकाच परिवाराच्या सासू-सुनेचा आणि सारिका शालिक शेंडे यांचा समावेश आहे. ही घटना शनिवार, 10 मे रोजी सकाळी घडली होती. त्यानंतर तेंदूपत्ता संकलनासाठीच चिचपल्ली जंगलात गेलेल्या विमल शेंडे (65, रा. नागाळा) यांनाही वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना रविवार, 11 मे रोजी सकाळी 7 वाजताच्या सुमारास चिचपल्ली वन परिक्षेत्रात घडली.