तभा वृत्तसेवा
सावली,
Chandrapur murder तालुक्यातील केरोडा (मानकापूर) हेटी येथील आंबेडकर चौकात झालेल्या शाब्दिक वादातून एका युवकावर चाकुने सपासप वार करून हत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास घडली. समीर हरीदास खंडारे (32) असे मृतकाचे नाव असून, तो केरोडा (मानकापूर) हेटी येथील रहिवासी होता. तर आरोपींमध्ये गिरीधर वालदे (50), अभय वालदे (23) यांच्यासह दोन विधी संघर्ष बालकांचा समावेश आहे.
मृतक समीर खंडारे हा मजुरीचे काम करीत होता. मंगळवारी सायंकाळी 7.30 वाजताच्या सुमारास आंबेडकर चौकात असलेल्या रामदास कन्नाके यांच्या दुकानाजवळ समीर खंडारे याचा तेथीलच राहणारे गिरीधर वालदे व त्याचा मोठा मुलगा अभय गिरीधर वालदे यांच्यासोबत वाद झाला. त्यानंतर रात्री 9.30 वा. अमीत शेट्टे याने मृतकाच्या मोठ्या भावाला फोन करून तुझा लहान भाऊ आंबेडकर चौकात मृत्यूमुखी पडला आहे, अशी माहिती दिली. मृतकाच्या भावाने घटनास्थळी जाऊन बघीतले असता समीर खंडारे याच्या उजव्या मांडीवर चाकुने मारल्याने निशाण आढळून आले.Chandrapur murder याची माहिती मृतकाच्या भावाने पोलिस ठाण्याला दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून चौकशी केली असता गिरीधर वालदे आणि त्यांचा मुलगा अभय वालदे यांनी दुचाकीने जाऊन व्याहाडवरून दोन विधी संघर्ष बालक मित्रांना बोलावून आणले व समीरवर चाकूने वार करून त्याची हत्या केली. त्यानंतर नितेश नैताम यांच्या पाणठेल्यासमोर समीरचा मृतदेह टाकून अभय वालदे आणि त्याचे मित्र दुचाकीने निघून गेले, अशी माहिती समोर आली. घटनेच्या तक्रारीवरून सावली पोलिसांनी गिरीधर वालदे, अभय वालदे (23) यांच्यासह दोन विधी संघर्ष बालकांना ताब्यात घेतले. आरोपींविरुद्ध कलम 103 (1), 3 (5) अन्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.