कुरखेडा,
Rabi Paddy रब्बी धान हंगाम जवळपास पूर्ण झालेला आहे. धानाचे पीक निघालेले आहे. मात्र महामंडळाचे शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र अद्याप सुरू न झाल्याने शेतकर्यांना नाईलाजाने खाजगी व्यापार्यांना पडेल त्या किमतीत धान विकावा लागत आहे. खरेदी केंद्र हे 17 मे पर्यंत सुरू न झाल्यास 19 मे पासून तहसील कार्यालयासमोर बेमूदत उपोषण आंदोलन करण्याचा इशारा तालुका काँग्रेसच्यावतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र अद्याप सुरू न झाल्याने व अनेकांना धानाची साठवणूक करून ठेवणे शक्य नसल्याने त्यांना नाईलाजाने खाजगी व्यापार्यांना धान विकावा लागत आहे. शेतकर्यांच्या नाईलाजाचा गैरफायदा घेत व्यापारी शासकीय हमीभावापेक्षा प्रति क्विंटल 400 ते 500 रूपये कमी भावात धान खरेदी करीत आहेत. रानटी हत्ती, विज भारनियमन, अवकाळी पाऊस या संकटांवर मात करीत घामाने पीकविलेल्या पीकाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने व शासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने शेतकरी हतबल आहेत. शासनाने याकडे तातडीने लक्ष देत शेतकर्यांच्या सातबारा उतार्याची तातडीने ऑनलाइन नोंदणी सुरू करीत 17 मे पर्यंत प्रत्यक्षात खरेदी केंद्र सूरू करावे.Rabi Paddy अन्यथा शेतकर्यांसह उपोषण आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून तालुका काँग्रेसचे अध्यक्ष जिवन पाटील नाट, जिल्हा उपाध्यक्ष जयंत पाटील हरडे, माजी जिप सदस्य प्रभाकर तुलावी, माजी पंस सभापती गिरीधर तितराम, कपील पेंदाम यांनी दिला आहे. निवेदनाची प्रत आदिवासी विकास महामंडळाचे उपप्रादेशीक व्यवस्थापक सालवे यांना सुद्धा देण्यात आली आहे.