वेध...
tarun bharat vedh bhandara हाडकुळा माणूस चांगला दिसत नाही. म्हणून थोडं मांस अंगावर आलं की, सगळे जण कौतूक करतात. पण तोच लठ्ठपणा अवाढव्य वाढला की, आलेली सूज माणसाला विद्रूप करते. शिक्षण क्षेत्राचेही असेच काहीसे झाले आहे. कधीकाळी मर्यादित पण गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाèया शिक्षण संस्था होत्या. आज व्याप वाढला, सांख्यिकी दृष्टीने आकडे वाढले; पण बाजारीकरण आले. ज्ञानदानाच्या पवित्र कार्याला अर्थार्जनाची काजळी चढली आणि पावित्र्य संपले. आज चित्र असे आहे, विद्यार्थी शाळेत येत नाहीत तरी उत्तीर्ण होतात आणि मग श्रम न करता यशाचे श्रेय घेण्यासाठी स्पर्धा लागते! अशावेळी विद्यार्थ्यांच्या यशाचे श्रेय नेमके कुणाचे हा प्रश्न उरतोच!

नि:स्वार्थ भावाने व्यक्ती घडविण्याचा कारखाना म्हणून शिक्षण संस्थांकडे कधीकाळी पाहिले जात होते. शाळा म्हणजे विद्येचे मंदिर आणि या मंदिरातून मिळणारे ज्ञान म्हणजे आयुष्यभरासाठी शिदोरीरूपी प्रसाद होता. शाळांची संख्या कमी होती. पण ज्या होत्या, त्या खèया अर्थाने विद्येचे मंदिर होत्या. त्यात व्यावहारिकता नव्हती, विद्यादान आणि विद्यार्जनाला पैशात मोजले जात नव्हते. होता तो केवळ नि:स्वार्थ भाव! पण आज स्थिती काय आहे? शिक्षण संस्थांचा व्याप वाढला. अनेक प्रकारच्या शिक्षणाची दालने प्रचंड संख्येत उघडली गेली. पण त्यात आला तो व्यापार. शिक्षणाचे बाजारीकरण झाले. शाळेत प्रवेश घेण्यासाठी शाळा निधी किंवा अन्य गोंडस नावाखाली लाखो रुपयांची घेतली जाणारी मदत इथपासून ते शिक्षकांची भरती करताना जुळवून आणला जाणारा लक्ष्मीदर्शनाचा योग इथपर्यंत सर्व काही बदलले. शाळांचे बाजारीकरण झाले अन् शिक्षणाचा बाजार मांडला गेला. काहींना ते महत्त्व जपले असेलही, पण बाजारीकरणाच्या गर्दीत त्यांना तग धरताना बरेच काही सहनही करावे लागत असावे. शिक्षण संस्था चालकांची बदललेली मानसिकता पाहून नवे फॅड उदयास आले. खाजगी शिकवणी म्हणजे कोचिंगने शाळांची अवस्था बिकट केली. आज शून्य उपस्थितीत म्हणजे ‘झिरो अटेंडन्स’वर शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. वर्षभर मुलं खाजगी शिकवण्यांमध्ये शिकतात. जणू काही तीच त्यांची शाळा असते. पण ज्यावेळी दहावी- बारावीचा निकाल लागतो, त्यावेळी ज्या शाळेत विद्यार्थी कधीच गेला नाही, ती शाळा आणि शिकवणी वर्ग दोघेही विद्यार्थ्यांच्या यशाचे श्रेय स्वतःच्या पदरी पाडून घेत आपलीच पाठ आपण थोपटून घेतात. शाळेने यशाची परंपरा राखली असे सांगताना त्यांना हा विसर पडतो की, यशस्वी विद्यार्थी तर कधीच आपल्या शाळेत येऊन बसला नाही. शिकवण्यांचेही मोठमोठे फलक गावात झळकतात.
आता खरंच त्या विद्यार्थ्यांच्या यशाचे खरे हकदार कोण? ती शाळा, ज्यात विद्यार्थी तासभरही बसला नाही की त्या शिकवण्या? शाळेशी साटेलोटे करून विद्यार्थ्यांना आपल्याकडे ओढून घेणाèया शिकवण्या विद्यार्थ्यांमागे शाळांना टक्केवारी देते अन् शाळाही शून्य उपस्थितीवर प्रवेशास तयार होते. ही शिक्षणाच्या मूळ हेतूशी प्रतारणा नव्हे का? कधीकाळी आपल्या विद्यार्थ्यांवर जिवापाड प्रेम करणाèया संस्था विद्यार्थ्यांचे तोंडही वर्षभर पाहात नाही आणि त्याच्या यशात मात्र आपला वाटा गृहीत धरून आनंद साजरा करत असतील तर आपलीच पाठ आपण थोपटून घेण्याचा हा प्रकार बाजारीकरणामुळे संस्थांची झालेली केविलवाणी अवस्था सांगण्यास पुरेशी आहे.
हा सर्व प्रकार उघड उघड होत आहे. शाळांवर नियंत्रण ठेवण्यासाठी असलेल्या यंत्रणेला म्हणजे शिक्षण विभागाला याची जाण नाही, असे नाही. शाळांची संख्या वाढली, त्याच तोडीने खाजगी शिकवण्यासाठीसुद्धा वाढल्या. शाळांपेक्षा शिकवण्यांमध्ये गर्दी वाढत असल्याचेही त्यांच्या नजरेदेखत आहे. मग शून्य उपस्थितीवर शाळा चालविणे शिक्षण विभागाच्या नियमात आहे का? हे स्पष्ट व्हायलाच हवे. नाहीतर मग ‘एकमेका साह्य करू’ या धोरणावर हे सगळं सुरू आहे, हे आपसूकच सिद्ध होते. एकीकडे नवीन शैक्षणिक धोरण लागू झाले आहे. शिक्षण क्षेत्र अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न होत असताना विद्यार्थ्यांच्या यशात श्रेय कुणाचे हे कोडेच जर सुटणार नसेल तर घडणारे विद्यार्थी कसे घडतील, हा प्रश्नच आहे. शाळेत न जाता जाहिरातींच्या फलकावर फोटो लावून घेण्यात आनंद मानणारे विद्यार्थीच नव्हे, तर त्यांच्या पालकांसाठीही हे विचार करण्यासारखे आहे.
विजय निचकवडे
9763713417