तिरोडा,
Birsi Airport जिल्ह्याचा जलदगतीने विकास व्हावा, स्थानिक व्यापारी व नागरिकांना मुंबईचा प्रवास सोयीचा व्हावा, रोजगार निर्मितीचा उद्देश समोर ठेवून गोंदिया शहराला लागून असलेल्या बिरसी येथील विमानतळाचे आधुनिकरण करण्यात आले. आजघडीला देशातील प्रमुख विमानतळांवर उड्डाणासाठी बिरसीचे विमानतळ सज्ज आहे. असे असताना जिल्हावासींना अद्यापही मुंबईकरीता उड्डाणाची प्रतिक्षा आहे.
मिनी मुंबई म्हणून गोंदियाची ओळख आहे. धानाचे मोठे उत्पादन, शेकडो राईस मिल, विविध साहित्यांचे ठोक व किरकोळ व्यावसायीकांची मोठी बाजारपेठ आहे. विशेष म्हणजे, तिरोडा येथे अदानी विद्युत प्रकल्प असून प्रकल्पातील अनेक बडे अधिकार्यांचे मुंबई, सुरत ये-जा असते. त्यातच शासकीय व निमशासकीय कामामुळे जिल्हावासींचे मुंबईला नेहमीच येणे जाणे राहते. त्यामुळे बिरसी विमानतळावून देशातील प्रमुख शहरांसाठी विमानसेवा सुरू व्हावी, अशी मागणी होती. माजी केंद्रीयमंत्री, खा. प्रफुल्ल पटेल यांच्या प्रयत्नाने बिरसी विमानतळाला आधुनिक स्वरूप आले. पायलट प्रशिक्षण केंद्रही सुरू झाले. दरम्यान, खा. Birsi Airport पटेल तसेच माजी खा. सुनील मेंढे यांच्या पुढाकारने गोंदिया ते हैदराबाद ही विमानसेवा सुरूही झाली. परंतु मुंबईसाठी विमान उड्डाणाची प्रतिक्षा कायमच आहे. मुंबई येथे स्लॉट नसल्याने तिथे विमानसेवा सुरु नसल्याचे सांगण्यात येत आहे. असे असताना अमरावतीच्या खा. नवनीत राणा यांच्या प्रयत्नातून अमरावती ते मुंबई थेट विमानसेवा नुकतीच सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे गोंदिया-मुंबई विमान उड्डाणाची मागणी असूनही केवळ गोंदियासाठीच स्लॉट उपलब्ध नाही का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. जिल्ह्यातील व्यापारी, विद्यार्थी, रुग्ण आणि अन्य प्रवाशांसाठी मुंबईशी थेट विमानसेवा ही अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे या सेवेसाठी स्थानिक लोकप्रतिनिधींकडून ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.
जिल्हा व जिल्हा मुख्यालयाचा विविध कामे व व्यापारानिमित्त शेजारील छत्तीसगड व मध्यप्रदेशाशी संबंध येतो. त्यामुळे शेजारील राज्याला लागून असलेल्या शहरी व ग्रामीण भागातील जनता, व्यापारी लांबपल्ल्याच्या प्रवाशासाठी गोंदिया येथून रेल्वेने प्रवास करतात. यात त्यांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागतो. गोंदिया येथून मुंबईसाठी थेट विमानसेवा सुरू झाल्यास याचा लाभ छत्तीसगड व मध्यप्रदेशातील प्रवाशांना देखील होणार आहे.