वाशीम,
District Collector Bhuvaneshwari S शेतकरी हा आपल्या समाजाचा पाया असून त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणं आवश्यक आहे. वत्सगुल्म स्मार्ट पेरणी स्पर्धा — खरीप २०२५ या उपक्रमातून शेतकर्यांमध्ये स्मार्ट पद्धतींचा प्रसार करून उत्पादन व उत्पन्न वाढवायचं आहे. ही स्पर्धा शेतकर्यांना नव्या तंत्रज्ञानाशी जोडणारी दृष्टीकोन आहे. स्मार्ट पद्धतींमुळे जलसंधारण, बियाण्याची बचत तसेच उत्पादनात वाढ होते, जे आपल्या जिल्ह्याच्या कृषी क्षेत्राला नवसंजीवनी देईल. तरी शेतकर्यांनी या स्पर्धेत सहभागी होऊन आपले ज्ञान, अनुभव आणि उत्पादन क्षमता वाढवा. जिल्हा प्रशासन तुमच्या प्रत्येक पावलावर साथ देण्यासाठी सदैव तत्पर आहे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी केले.
पारंपरिक शेतीतून आधुनिक व तंत्रज्ञानाधिष्ठित शेतीकडे वाटचाल घडविण्यासाठी वाशीम जिल्हा प्रशासनाच्या वतीने ‘वत्सगुल्म स्मार्ट पेरणी स्पर्धा — खरीप २०२५’ या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाची घोषणा करण्यात आली. या उपक्रमाच्या निमित्ताने शेतकर्यांना उत्पादनवाढीसाठी स्मार्ट तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन मिळणार आहे. या उपक्रमाबाबत जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरीफ शाहा, आत्मा प्रकल्प संचालक अनिसा महाबळे, उपविभागीय कृषी अधिकारी संतोष वाळके, जिल्हा कृषी विकास अधिकारी अभिजीत देवगीरकर, कृषी उपसंचालक हिना शेख, जिल्हा माहिती अधिकारी यासिरोद्दिन काझी तसेच डॉ. हरीश बाहेती यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी दिलीपराव जाधव, केशवर भगत, शारीक सय्यद व विजय राऊत यांनी आपले मनोगत व्यक्त केले.