वर्धा,
fraud case : नांदेड येथील एका खाजगी कंपनीने १२ टके व्याजाचे आमिष देत वर्धा जिल्ह्यातील ग्राहकांची तब्बल १ कोटी ११ लाख ६२ हजार २८३ रुपयांनी फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सुरेंद्र विश्वकर्मा, हेमलता विश्वकर्मा, हेमलता जावध, सुनील जावध, सोपान खंडारे यांच्याविरुद्ध शहर पोलिसांनी गुन्हा नोंद केला.
२१ मार्च २०११ ते ३ जानेवारी २०१७ दरम्यान सहयोग बिल्डर अॅण्ड रिअल ईस्टेटम प्रा. लि. कार्पोरेट, तिरुपती अपार्टमेंट, बिसेननगर, न्यू मोहा या कंपनीने आर. डी., फिस डिपॉझीट, पेन्शन योजना यासह इतर स्किममध्ये वार्षिक १२ टके व्याजाचे आमिष ग्राहकांना दिले होते. आमिषाला बळी पडत जिल्ह्यातील वर्धा, देवळी, हिंगणघाट, कारंजा, आर्वी, आष्टी, पुलगाव येथील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. गुंतवणूक वेळ संपल्यानंतरही या कंपनीत गुंतवणुकदारांनी जमा केलेली १ कोटी ११ लाख ६२ हजार २८६ रुपये परत केली नाही. कंपनीने कार्यालये बंद केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नागरिकांनी वर्धा शहर पोलिसात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला.
पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखा, पोलिस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधीक्षक डॉ. सागर कवडे, पोलिस उपअधीक्षक पुंडलिक भटकर यांच्या मार्गदशनात पोलिस उपनिरीक्षक शांताराम मुदमाळी व चमू करीत आहे. दरम्यान, या कंपनीत ज्यांनी गुंतवणूक केली आहे, आजपर्यंत परतफेडीचे अर्ज भरुन दिले नसतील, अशा सर्व नागरिकांनी आर्थिक गुन्हे शाखेत गुंतवणूक रक्कम संबंधाने पुराव्याचे कागदपत्रांसह ७ दिवसात कार्यालयीन वेळेत येवून सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.