समृद्धीने अडवली ५४ शेतकर्‍यांची वहिवाट

09 May 2025 20:10:10
वर्धा, 
Suresh Deshmukh : सेलू तालुक्यातील महाबळा येथील ५४ शेतकर्‍यांची १५० हेक्टर शेती इटाळा शिवारात आहे. या शिवारातून समृद्धी महामार्ग गेला. अनेक शेतकर्‍यांच्या शेतातून महामार्ग गेल्याने शेतीचे तुकडे पडले. जमीन अधिग्रहण करतेवेळी शासनाने वहिवाटीसाठी दोन्ही बाजूने १५ फुटाचा रस्ता देण्याचे आश्वासन दिले. महामार्ग बनल्यानंतर आता संरक्षण भिंत बांधण्याचे काम सुरू आहे. मात्र, ही भिंत बांधल्यानंतर शेतकर्‍यांना शेतात येण्या-जाण्यासाठी रस्ताच राहणार नाही. यामुळे ५४ शेतकर्‍यांची वहिवाट बंद होणार असून १५० हेक्टर शेतीचे नुकसान होणार असल्याची माहिती शेतकरी सुरेश देशमुख यांनी आज शुक्रवार ९ रोजी स्थानिक विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेत दिली.
 
 
 
satish
 
 
 
इटाळा शिवारात १५० हेक्टर शेतजमिनी असून वहिवाटीसाठी शिवपांदण रस्ता होता. मात्र, समृद्धी महामार्गामुळे हा रस्ता बंद करण्यात आला. महामार्गामुळे अनेक शेतकर्‍यांच्या शेतीचे तुकडे झाले. शेताच्या मधातून रस्ता गेल्याने अर्धी शेती अलीकडे तर अर्धी रस्त्याच्या पलीकडे अशी स्थिती झाली. अशातच आता रस्त्यालगत संरक्षण भिंतीचे काम सुरू करण्यात आले. या संरक्षण भिंतीमुळे शेतात जाण्यासाठी रस्ताच उरला नाही. विटाळा, किनाळा मार्गावर एक शिवपांदण होती. या शिवपांदणमधून जवळपास १५ ते २० शेतकर्‍यांची वहीवाट होती. आता तीही बंद करून तिथे गेट लावण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची चहूबाजूंनी कोंडी झाली असून शेतपिकांचे मोठे नुकसान होत असल्याचेही देशमुख यांनी सांगितले.
 
 
 
शेतजमीन अधिग्रहण करतेवेळी शेतात जाण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी १५ फुटाचा पक्का रस्ता बांधून देण्याचे आश्वासन दिले होते. रस्ता बांधकामावेळी अनेक शेतीचे अर्धा एकर असे तुकडे पडले तेही अधिग्रहित करू, असे आश्वासन दिले. मात्र, यापैकी एकही आश्वासन पूर्ण करण्यात आले नाही. रस्त्याच्या दुतर्फा १५ फुटांचा रस्ता देण्यात यावा, सन २०१८ पासून झालेल्या पिकांची नुकसानभरपाई देण्यात यावी, या मागणीसाठी अनेकदा जिल्हाधिकार्‍यांना निवेदने दिली. याकडे प्रशासनाने सातत्याने दुर्लक्ष केले. अखेर शेतकर्‍यांनी २ मे रोजी संरक्षण भिंतीचे काम थांबविले. मात्र, आता संरक्षण भिंतीचे काम पोलिस संरक्षणात करण्यात येत आहे. ही संरक्षण भिंत बनल्यास शेतकर्‍यांची मोठी कोंडी होणार आहे. त्यामुळे प्रशासनाने वहिवाटीसाठी १५ फुटांचा रस्ता बांधून द्यावा, अशी मागणी यावेळी केली. पत्रपरिषदेला अमित उमाटे, मंगेश चांभारे, दयाकर चांभारे, संदीप बजाईत, बाबाराव वांदिले, मयूर चांभारे आदी शेतकरी उपस्थित होते.
 
 
१५ ऐवजी ३ फुटांचा रस्ता?
 
 
जमीन अधिग्रहणावेळी १५ फुटांचा रस्ता बांधून देण्याचे आश्वासन दिले. यासंदर्भात अनेकदा जिल्हाधिकार्‍यांना निवेदनं दिली. मात्र, आता ३ फुटांचा रस्ता बांधून देण्याचे सांगण्यात येत आहे. या तीन फुटात आमची बैलबंडी किंवा इतर वाहने जातील का, असा सवालही देशमुख यांनी यावेळी उपस्थित केला. त्यामुळे आम्हाला तत्काळ १५ फुटांचा रस्ता बांधून द्यावा, अन्यथा आत्मदहन करण्याचा इशाराही उपस्थित शेतकर्‍यांनी दिला.
Powered By Sangraha 9.0