मोदी युगाचा भारताचा सुवर्णकाळ

    दिनांक :12-Jun-2025
Total Views |
दिल्ली वार्तापत्र
Modi era मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिले वर्ष 9 जूनला पूर्ण झाले. 2024 च्या 9 जूनला नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. हाही एक विक्रम होता. आतापर्यंत देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू वगळता सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेण्याचे भाग्य कोणालाच लाभले नाही. नेहरूंनंतर सर्वाधिक काळ पंतप्रधान राहण्याची संधी त्यांची कन्या इंदिरा गांधी यांना मिळाली. गांधी तीन टप्प्यात जवळपास 15 वर्षे पंतप्रधान होत्या. पण सलग तीन वेळा पंतप्रधानपद त्यांनाही भूषवता आले नाही. त्या अर्थाने मोदी यांनी सलग तीन वेळा पंतप्रधानपदाची शपथ घेत नेहरूंची बरोबरी केली, असे म्हणायला हरकत नाही.
 
 

शपथविधी  
 
 
मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत सलग 10 वर्षे पंतप्रधान राहण्याचा काँग्रेसचे डॉ. मनमोहनसिंग यांचाही विक्रम मोडला आहे. मोदी यांच्या आधी सलग 10 वर्षे पंतप्रधानपद भूषवण्याची संधी कोणाला मिळाली नव्हती. राजीव गांधी, पी. व्ही. नरसिंहराव आणि अटलबिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधानपदाची पाच वर्षे पूर्ण केली होती. त्यामुळे मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या 11 वर्षांचे महत्त्व आपल्या लक्षात येईल.
 
मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिले वर्ष नुकतेच पूर्ण झाले असले, तरी मोदी यांच्या पंतप्रधानपदाची 11 वर्षेही यामुळे पूर्ण झाली आहेत. मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कामगिरीचा विचार करताना आम्हाला तिसऱ्यां कार्यकाळातील एक वर्षाचा नाही तर पंतप्रधान म्हणून त्यांच्या एकूण 11 वर्षांच्या कार्यकाळाचा विचार करावा लागणार आहे. देशात आतापर्यंत होऊन गेलेले सर्व पंतप्रधान एका बाजूला आणि मोदी यांना एका बाजूला ठेवले, तरी पंतप्रधान म्हणून मोदी यांचेच पारडे जड राहणार आहे. मोदी यांनी पंतप्रधानपदाच्या 11 वर्षांत देशहिताचे अनेक धाडसी आणि लोकाभिमुख निर्णय घेतले. त्यातील काही निर्णय असे होते, जे घेण्याची त्यांच्या आधीच्या पंतप्रधानांची हिंमतही झाली नाही, तसा विचारही ते कधी करू शकले नाही. मोदी यांच्या 11 वर्षांतील सर्व लोकाभिमुख आणि निर्णयाचा आढावा घेतला तर ते किमान तीन डझन होतील. याचा अर्थ आधीच्या पंतप्रधानांच्या कार्यकाळाचे वा त्यांचेही अवमूल्यन करतो आहे, असे नाही. मात्र ही वस्तुस्थिती आहे आणि ती कोणालाही नाकारता येणार नाही.
देशवासीयांशी ‘मन की बात’ करताना मोदी यांनी देशातील जनतेच्या मनातील गोष्टी ओळखून त्यांच्या इच्छा-आकांक्षांची तसेच अनेक स्वप्नांची पूर्तता केली. जनतेच्या मनातील ही अनेक स्वप्ने दीर्घकाळापासून प्रलंबित होती, पण आधी होऊन गेलेल्या पंतप्रधानांकडून त्यांच्या स्वप्नांची पूर्तता झाली नाही. त्यामुळे जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द करणे असो की अयोध्येतील राम जन्मभूमीवर रामललाचे भव्य मंदिर उभारणे असो. देशातील जनतेने नंतर नंतर तर ही स्वप्ने पाहण्याचेच सोडून दिले होते. पण मोदी यांनी लोकांच्या मनातील यासह अनेक स्वप्नांची पूर्तता केली; ती प्रत्यक्षात आणली. त्यामुळे लोकांचा अजूनही त्यावर विश्वास बसत नाही. आजही अयोध्येतील राम जन्मभूमीवर झालेले रामललाचे भव्य मंदिर पाहून तसेच 370 कलम रद्द झाल्यानंतर श्रीनगरच्या लाल चौकाला भेट देत असताना लोकांचा आपल्या डोळ्यावर विश्वास बसत नाही. रामललाची मंदिरात विराजमान मूर्ती पाहून त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू येतात. हे अश्रू एका स्वप्नपूर्तीचे असतात. त्यामुळे मोदी यांचा 11 वर्षांचा कार्यकाळ हा भारताच्या दृष्टीने सुवर्णकाळ म्हटला पाहिजे.
 
2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी यांना अपेक्षित बहुमत मिळाले नाही. 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने स्वबळावर स्पष्ट आणि निर्विवाद बहुमत मिळविले होते. त्यामुळे कोणताही निर्णय घेणे पंतप्रधान म्हणून मोदी यांना सहजशक्य होेते. पण आपल्या सलग तिसऱ्या कार्यकाळात भाजपाला बहुमत नसताना आणि सरकार मित्रपक्षांच्या पाठिंब्यावर अवलंबून असताना मोदी यांच्या घोडदौडीत कोणताच फरक पडला नाही. मोदींची धाडसी निर्णय घेण्याची प्रक्रिया कुठेच प्रभावित झाली नाही. कारण मोदींचे सर्व निर्णय हे स्वहिताचे आणि पक्षहिताचे नव्हते, तर समाजहित आणि राष्ट्रहिताचे तसेच देशातील गोरगरीब जनतेच्या कल्याणाचे होते.Modi era त्यामुळे मित्रपक्षही मोदी यांना काही म्हणू शकत नव्हते. उलट न मागता मोदी यांच्या निर्णयांना या मित्रपक्षांनी एकमुखाने पाठिंबा दिला. पहलगाम येथे निर्दोष भारतीय पर्यटकांची हत्या करणाऱ्या पाक पुरस्कृत अतिरेक्यांना धडा शिकवण्यासाठी मोदी यांनी राबविलेले ‘ऑपरेशन सिंदूर’ तसेच त्यानंतरच्या लष्करी कारवाईने मोदी यांनी पाकिस्तानवर मात करत देशातील जनतेची मने जिंकली. मोदी फक्त ‘मन की बात’च करत नाही तर जनतेची मनेही जिंकून टाकतात, हे या कारवाईने सिद्ध झाले.
 
देशातील सर्व राजकीय पक्षांची आणि त्यांच्या नेत्यांची विचार करण्याची प्रक्रिया जेथे संपते, तेथून मोदी यांची विचार करण्याची प्रक्रिया सुरू होते. आता समोर कोणताच मार्ग नाही. आता मोदी काय करणार, कोणता निर्णय घेणार, असे वाटते, तेथे मोदी आश्चर्यचकित करणारा निर्णय घेत देशाला नव्या उंचीवर घेऊन जातात, याचा अनुभव आतापर्यंत अनेक वेळा देशाने घेतला आहे. दहशतवादाच्या विरोधातील भारताची लष्करी कारवाई आतापर्यंत व्याप्त काश्मीरपर्यंतच मर्यादित राहात होती. यावेळी भारतीय लष्कराने पाकच्या हद्दीत 100 किमीपर्यंत घुसून पाकिस्तानला कधी न विसरणारा धडा शिकवला. नवा भारत आता घरात घुसून मारतो, हे फक्त मोदी बोललेच नाही तर आपले शब्द त्यांनी खरे करून दाखवले. ‘मेक इन इंडिया’चा नारा देत मोदींनी भारताला आत्मनिर्भर केले. पाकिस्तानविरुद्धच्या गनिमी काव्याच्या या युद्धात भारतीय लष्कराने तसेच हवाई दलाने ते सिद्ध करून दाखवले. कधीकाळी भारत जगातील अनेक विकसित देशांकडून शस्त्रास्त्र आणि लढाऊ विमानांची खरेदी करत होता. आता जगातील अनेक देश भारताकडून क्षेपणास्त्र तसेच अन्य शस्त्रास्त्रांची खरेदी करीत आहेत. हा चमत्कार मोदींनी ‘मेक इन इंडिया’ या मंत्राने करून दाखवला. पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात पंतप्रधान मोदी यांच्या मार्गदर्शनात केंद्रीय भूपृष्ठ परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या मंत्रालयाने केलेली प्रगती आश्चर्याने थक्क करणारी आहे.
 
तीन तलाकच्या बेड्यातून मुस्लिम महिलांची सुटका करण्याचा ऐतिहासिक असा निर्णय घेत मोदी यांनी आपण देशातील लोकांच्या विशेषत: महिलांच्या कल्याणाचा निर्णय घेताना धर्माचे अवडंबर माजवत नाही, हे दाखवून दिले. मोदी यांच्या सरकारने जीएसटीसह अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. शेतकèयांचे उत्पन्न वाढविण्यासाठी किमान हमी भावात ‘न भूतो न भविष्यती’ अशी वाढ केली. समाजातील एकही वर्ग मोदी यांच्या कल्याणकारी निर्णयापासून वंचित राहिला नाही. 25 कोटी लोकसंख्येला त्यांनी गरिबी रेषेतून बाहेर काढले, तर 80 कोटी लोकसंख्येला गेल्या काही वर्षापासून मोफत अन्नधान्य पुरवले जात आहे. मोदी यांच्या लोककल्याणकारी निर्णयावर विरोधी पक्ष टीका करत असला, तरी ‘हाथी चले बाजार तो कुत्ते भुके हजार’ याप्रमाणे मोदी दुर्लक्ष करत असतात.Modi era हेच मोदी यांच्या कार्यशैलीचे वैशिष्ट्य म्हटले पाहिजे आणि त्यांच्या या कार्यशैलीतच त्यांच्या लोकप्रियतेचे रहस्य दडले आहे.
श्यामकांत जहागीरदार
9881717817
........................