अग्रलेख
bij ankure ankure वेद-पुराणांमधील किंवा संत-साहित्यातील ज्ञान हे केवळ धार्मिक किंवा आध्यात्मिक स्वरूपाचा ऐवज असल्याचा समज आजही आहे. खरे तर वेद-पुराणे, श्रीमद्भगवद्गीता, रामायण, महाभारतादी पौराणिक ग्रंथांत तसेच संतांच्या उपदेशांत लौकिक व पारलौकिक जीवनातील अनेक गोष्टींचे अर्थ उलगडून दाखविलेले आहेत. त्यातलाच एक भाग आहे निसर्ग आणि मानवी जीवन यांच्यातील संबंधांचा! मत्स्य पुराणात वृक्षांचे महत्त्व सांगणारा एक श्लोक आहेः
‘‘दशकूपसमा वापी, दशवापीसमो हृदः।
दशहृदसमो पुत्रो, दशपुत्रसमो द्रुमः।।’’
bij ankure ankure याचा अर्थ असा की, एक मोठा जलकुंड (जलाशय) दहा विहिरींच्या बरोबरीचा असतो. एक सरोवर अशा दहा जलकुंडांच्या बरोबरीचा असतो. दहा सरोवर एका पुत्राच्या बरोबरीचे असतात आणि एक वृक्ष दहा पुत्रांच्या बरोबरीचा असतो! निसर्गाला थेट मानवी जीवनाशी जोडणारे आणि वृक्षराजीचे महत्त्व सांगणारे असे दर्शन जगात कुठेही नाही. या दर्शनाचे भान ठेवून आपल्या संस्कृती-परंपरांच्या संवहनासह राष्ट्रनिर्माण कार्यातही निरंतर वाटा उचलत असलेल्या ‘दैनिक तरुण भारत’चे यंदा शताब्दी वर्ष आणि आत्यंतिक निष्ठेने हे दैनिक चालवीत असलेल्या श्री नरकेसरी प्रकाशनाचा यंदा अमृत महोत्सव. हा सुवर्णयोग लक्षात घेऊन तरुण भारतने समाजाला काहीतरी द्यायचे ठरविले आणि त्यातून साकारली ‘बीज अंकुरे अंकुरे’ ही संकल्पना!
तरुण भारत हे विचारपत्र आहे. एक व्रत आहे. या पवित्र भारतभूमीवर शांतता, स्थैर्य नांदावे. सर्वांचे जीवन सुखी-समाधानी व्हावे आणि हे राष्ट्र परम वैभवाप्रत पोहोचावे, हे आमच्या प्रयत्नांचे ध्येय. ज्या राष्ट्रातील नागरिक सुखी, निरोगी असतात, तेच राष्ट्र सुखी व निरोगी मानले जाते. त्यामुळेच सजीव सृष्टीच्या निरामय जगण्याशी संबंधित ‘बीज अंकुरे अंकुरे’ उपक्रम आम्ही हाती घेतला आणि यशस्वीपणे राबविला. या वर्षात इतरही उपक्रम तरुण भारतने आखले आहेत आणि त्यातील बहुतांशी उपक्रमांचा संबंध पर्यावरण रक्षणाशी आहे. जगणे सुरक्षित असल्याशिवाय कोणत्याही चर्चेला अर्थ नसतो. पर्यावरण ऱ्हासामुळे आपण अनेक संकटे झेलत आहोत. या साऱ्या संकटांना मानवी हव्यास कारणीभूत आहे. पर्यावरणाचे नुकसान करून मानवानेच स्वतःचे जीवन धोक्यात घातले आणि त्यालाच ते सावरावे लागेल, हे सर्वांना कळावे म्हणून मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करायची, असा निर्धार आम्ही केला आहे. या उपक्रमाला विशेष पृष्ठभूमी देखील आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प. पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी संघाच्या शताब्दी वर्षात समरसता, पर्यावरण, समाधानी कुटुंब, स्वदेशी आणि नागरी कर्तव्ये अशा पंचसूत्रींवर काम केले पाहिजे, असा विचार मांडला. त्यातील पर्यावरण हा विषय मध्यवर्ती ठेवून त्याची अन्य चार सूत्रांची सांगड या उपक्रमात घातली आहे. पर्यावरण रक्षणात प्रत्येकाची म्हणजे पर्यायाने कुटुंबांची सुरक्षितता व समाधान आहे. वृक्षलागवडीत कोणताही भेदाभेद नसतो. त्यामुळे त्याचा संबंध सामाजिक समरसतेशी आहे. पर्यावरण ऱ्हासावरील उपाय म्हणून वृक्षलागवड करायची असल्यामुळे तिचा संबंध नागरी कर्तव्याशी आहे. शिवाय, या उपक्रमात ज्यांचा प्रामुख्याने समावेश केलेला आहे, ते वृक्ष प्रामुख्याने स्वदेशी आहेत. ते सावली देणारे, उष्मा कमी करणारे, पक्ष्यांना अधिवास व खाद्य देणारे तसेच त्यांच्या प्रजननासाठी उपयुक्त आहेत.
असा सूक्ष्म विचार करून तरुण भारतने ‘बीज अंकुरे अंकुरे’साठी सहकार्याचे आवाहन केल्याबरोबर उदंड प्रतिसाद देत आमच्या सुजाण वाचकांनी चिंचोके, सुबाभूळ, बहावा, कवठ, शेवगा, सीताफळ, जंगली बदाम, बोर, बकुळ, बेल, चिचबिलाई, हेटी, आपटा अशा अनेक उपयुक्त झाडांच्या बिया आमच्या कार्यालयात आणून दिल्या. बाभूळ वृक्षाचा या उपक्रमात आम्ही जाणीवपूर्वक समावेश केला आहे. बाभळीची रोपे फारशी कुणी लावत नाहीत. वास्तवात बाभळीच्या झाडावर असंख्य पक्षी घरटी करतात. त्याचा पक्ष्यांच्या प्रजननाला उपयोग होतो. वड, बकुळ, बाभूळ ही वेगळ्या प्रकारची झाडे. त्यावर तीस-चाळीस प्रकारच्या पक्ष्यांचे जीवन अवलंबून असते. अशा विविध प्रकारच्या झाडांच्या बिया मिसळून कागदी पाकिटांमध्ये भरण्यात आल्या. या उपक्रमात आमच्या वाचकांनी, विशेषत: ज्येष्ठ नागरिकांनी प्रचंड सहकार्य केले.bij ankure ankure रामदासपेठेतील कार्यालयात येऊन ही पाकिटे भरून दिली. यातले सगळे तरुण भारतचे वाचक होतेच असे नाही. सगळे पर्यावरणाप्रति जागरूक असलेले नागरिक आहेत हे नक्की!
श्री दत्त जयंतीच्या मार्गशीर्ष पौर्णिमेपासून सुरू झालेल्या उपक्रमाचा प्रवास वटपौर्णिमेला पूर्णत्वास गेला. विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये छोट्या कागदी पाकिटांमधून मिश्र बियांचे वाटप करण्यात आले. याच मालिकेतील ‘वसा वटपौर्णिमेचा’ या उपक्रमांतर्गत वडाच्या रोपासोबत एकेक पाकीट देण्यात आले. या बियांची रोपे तयार करून आप्तांना भेट म्हणून देणे, परिसरात वृक्षारोपण करणे, उद्यानांत किंवा मंदिर परिसरात रुजविणे आम्हाला अपेक्षित आहे. संपूर्ण विदर्भात अशी हजारो पाकिटे वितरित केली गेली आहेत. त्यातील किमान एकेक प्रत्येकाच्या दारी, परसात किंवा कुठेही लागले आणि इतरांनी एकेक लावले तरी भविष्यात हजारो वृक्षांचे नवे आच्छादन आपल्या सर्वांसाठी उपलब्ध होईल. या पाकिटांत तुळस व झेंडूच्या बियाही दिल्या आहेत. कृष्ण जयंतीला त्या कुंडीत लावून त्यांचे संगोपन करावे, अशी अपेक्षा आहे.bij ankure ankure पावसाळ्यात लावलेल्या झेंडूच्या झाडांना दिवाळीत फुले येतील व ती तुळशी विवाहाला वापरता येतील, अशी त्यामागची कल्पना. विदर्भातील हजारो वाचकांच्या घरी बियाणांची पाकिटे पोहोचली आहेत. त्यांच्या वाटपासाठी तरुण भारतमधील सहकारी, गावोगावचे वार्ताहर, एजंट, वाचक आणि विशेषतः स्त्रीशक्ती मोठा हातभार लावत आहे. तरुण भारत परिवारातील जिल्हा प्रतिनिधींच्या अर्धांगिनींसह त्यांच्या कुटुंबीयांनीही यात आपुलकीने भाग घेतला. या साèयांच्या योगदानाप्रति तरुण भारत परिवार कृतज्ञ आहे.
तुळशी विवाहाच्या महत्त्वाबद्दल थोडेसे सांगितले पाहिजे. आपल्याकडे पूर्वी तुळशी विवाहाला फार महत्त्व होते. धार्मिक महत्त्वाखेरीज तुळशी विवाहाचा सण हा पर्यावरण रक्षणाच्या संदर्भातील भारतीय विचारपरंपरेतील परमोच्च बिंदू. तुळशी असेल तेथे आजार येत नाहीत आणि प्राणवायूचे प्रमाण वाढते. जीवनदात्री वनस्पती म्हणून तुळशीचे महत्त्व पुरातन काळापासून भारतीयांना ठावूक आहे. त्याचे भान पुन्हा सर्वांना यावे, यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. शताब्दीच्या उपक्रमाचा भाग म्हणून विदर्भातील प्रत्येक गावातल्या प्रत्येक गल्लीत किमान एक तुळशी विवाह थाटात साजरा व्हावा, अशी आमची अपेक्षा आहे. त्यासाठी तुळशी विवाहाच्या काळात सार्वजनिक उपक्रम आयोजित केले जातीलच. आम्ही मोठ्या प्रमाणावर तुळशीची रोपे तयार करीत आहोतच. आमच्या वाचकांनीही ती तयार करावीत आणि कृष्ण जयंतीला (15 ऑगस्ट 2025) ही रोपे घरच्या कुंडीत लावावीत. या रोपातून जे तुळशीचे झाड आकाराला येईल, ते वृंदावनात लावून त्याचा विवाह संपन्न व्हावा, असे आम्हाला वाटते. हा उपक्रम बिया लावण्यापुरता मर्यादित नाही. त्यामागे धर्म-संस्कृती-परंपरा आहेच; शिवाय भविष्यासाठीची दृष्टीही आहे. समाजाला काही तरी देण्याच्या आमच्या असोशीला तरुण भारतच्या वाचकांनी भक्कम आधार दिला.
आम्हाला समाजाला द्यायचे आहे आणि वाचकांच्या माध्यमातून जे घडेल, ते देखील समाजालाच अर्पण करायचे आहे. विदर्भातील सामाजिक संस्थांनी आपापल्या स्तरावर अशा प्रकारचे उपक्रम राबवावेत, असे विनम्र आवाहन आम्ही करीत आहोत. ओल्या मातीच्या कुशीत बीजांचे अंकुरणे हे ईश्वरी आशीर्वादाचे मर्त्यलोकातील रूप असते, याचा प्रत्येकाने अनुभव घ्यावा. ‘बीजा हवी निगराणी, हवी मायेची पाखरः लख्ख प्रकाश निर्मळ, त्यात कष्टाचा पाझर’ अशा ओळी ‘बीज अंकुरे अंकुरे’ या कवितेतही आहेत. ‘अंकुराचे होता रोप, होई रोपट्याचे झाड’ हेही त्याच कवितेत म्हटलेले आहे.bij ankure ankure त्याच भावनेतून अनेकांचे हात या उपक्रमाला लागले. आता असंख्यांचे लागावेत, हा जगन्नाथाचा रथ सर्वांनी मिळून पुढे न्यावा आणि सर्वांचे जीवन सुखी, आनंदी व निरामय व्हावे, हीच जगन्नियंत्याला प्रार्थना!