घातक व्यसनाधीनता

12 Jun 2025 12:11:52
 
 
वेध
 
नीलेश जोशी
 
गावच्या काही सज्जनांनी । लागावे व्यसन-निर्मूलनी ।
उत्तम गुणांच्या अनेक श्रेणी विकासाव्या गावी ।।
addiction राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी निर्मळ गावाची मांडणी ग्रामगीतेतून केली आहे. त्यांनी ज्या गोष्टी गावात अर्थात गावातील तरुण, आबालवृद्धांमध्ये असाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली, त्यात व्यसनमुक्तता देखील आहे. वरील ग्रामगीतेच्या ओवींमधून हे स्पष्ट होते. समाज सुखी, संपन्न आरोग्यदायी असावा यासाठी समाज निर्व्यसनी असणे आवश्यक आहे. व्यसन कोणतेही असो वाईटच; पण दुर्दैवाने तरुणाईला आंतर्बाह्य पोखरणारी व्यसनाधीनता दिवसेंदिवस वाढतच असल्याचे दिसून येते. देशाचे भविष्य ज्या युवापिढीच्या हाती आहे, ज्यांच्याकडून सृजनाची अपेक्षा आहे तेच जेव्हा व्यसनाधीन होतात तेव्हा ही बाब केवळ व्यक्तिगत किंवा कौटुंबिक न राहता समाज आणि देशासाठी गंभीर समस्या ठरते. म्हणूनच समाजसुधारकांसह राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी देखील या संदर्भात त्या काळी जनजागरण करण्यासाठी पुढाकार घेतला. सद्य:स्थितीतही याबाबत व्यापक जनजागरणाची आवश्यकता आहे.
 
 
vysan
 
 
व्यसनाधीनतेची सुरुवात तारुण्याच्या उंबरठ्यावर होते असे म्हटले जाते. पण वय वर्षे 10 ते 17 या वयोगटातील अल्पवयीनांमध्ये देखील वाढत असलेली व्यसनाधीनता चिंतेत भर टाकणारी आहे. सिगारेटने झालेली सुरुवात हळूहळू दारू आणि अमली पदार्थांच्या सेवनापर्यंत कशी पोहोचते हे त्या व्यसन करणाऱ्याच्या लक्षातही येत नाही.आणि जेव्हा लक्षात यायला लागते, त्याचे भयंकर दुष्परिणाम दिसू लागतात तेव्हा वेळ निघून गेलेली असते. चांगले वळण लागण्याची वेळ ही त्याच्या बालपणाची असते. त्या वयात केलेले संस्कार सातत्याने होत राहिले तर मनुष्य व्यसनाधीन होणार नाही अशी परिस्थिती निर्माण होते. पण या उलट झाल्यास वेगळे चित्र दिसून येते.
 
अमली पदार्थांच्या सेवनामुळे श्वसन संस्थेचे विकार आणि मेंदू आणि फुफ्फसांच्या तक्रारी सुरू होतात. अनेक मानसिक आजार, ताण, चिंता, नैराश्य, व्यसनामुळे निर्माण होतात आणि त्या ताणामुळे, नैराश्यामध्ये आणखी जास्त व्यसन केले जाते. कौटुंबिक व आयुष्यातील इतर तणावांमुळे व्यसन करणे आणि त्यामुळे वाढलेल्या तणावामुळे व्यसन अधिक वाढत जाणे हेच न संपणारे दुष्टचक्र आहे. मोबाईल वापराचे व्यसन, त्यात व्हिडीओ गेम्सचे व्यसन, समाज माध्यमांचा अतिरेकी आणि अविवेकी वापर, त्यातही अश्लील चित्रफितींच्या विघातक व्यसनांच्या सवयी तरुणाईचे सर्वच स्तरावरील मानसिक आरोग्य गिळंकृत करताहेत. ज्या वयात तरुण-तरुणींनी कंबर कसून अभ्यास करावा, तितक्याच उत्साहात खेळावे, व्यायाम करावा, मजा करावी, बागडावे, आयुष्याच्या या सोनेरी क्षणांचा आनंद पुरेपूर लुटावा, मनमुराद भटकंती करताना आलेल्या जीवनरसाचा हृदयंगम प्रत्यय मनात खेळवावा, मुरवावा, समाजासाठी काही करू पाहावं, ज्या वयात जीवनाची सुरेल स्वप्नं रंगवणाऱ्या मनाने जागेपणीही पाहावीत, त्या वयात व्यसनाच्या विळख्यात अडकलेली तरुणाई पाहून या देशाचे व समाजाचे होणार तरी काय असा गंभीर आणि चिंता करायला लागणारा प्रश्न उपस्थित होतो. ‘रिकामे डोके सैतानाचे घर’ अशी म्हण प्रचलित आहे. म्हणूनच रिक्त ठिकाण किंवा जागा ही कुठल्यातरी उपायाने भरलीच जाते हा सिद्धांत आहे. शरीरातील डोके, मेंदू व बुद्धी हे बालपणी रिक्त वाटत असतात म्हणून त्याच काळात ते उत्तम संस्कार, उत्तम विचार आणि आचार यातून भरायला हवे. त्यासाठी आपल्याकडे फार चांगली व्यवस्था पूर्वापार चालत आली आहे. ती म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती. या एकत्र कुटुंब पद्धतीत कोणालाच आपण एकटे आहोत असे वाटत नाही. प्रत्येक जण प्रत्येकाला मदत करतो. इतकेच नव्हे तर वेळोवेळी विचारांचे त्या त्या प्रमाणात आदानप्रदान होते. हे चांगले विचार एकदा मनात पक्के बिंबले तर व्यसनांना जागा आणि वेळ मिळत नाही.addiction परिणामी आपोआपच आयुष्य आनंदी, समाधानी होते. त्यामुळे आजही आपण आपल्या कुटुंबात एकत्र येण्याची, सगळ्यांनी परस्परांशी विचारविनिमय करण्याची, सगळ्यांनी एकत्र येऊन आनंद साजरा करण्याची पद्धत स्वीकारली तर व्यसनाचा हा राक्षस आपोआप मारला जाईल व कुटुंब, समाज आणि राष्ट्र बळकट व्हायला वेळ लागणार नाही. आपल्यासोबत कुणीतरी आपले आहे ही भावनाच आपल्याला व्यसनाधीनतेपासून दूर राखू शकणार आहे.
 
नीलेश जोशी
9422862484
Powered By Sangraha 9.0