तन को जोगी सभी करै, मन को करे न कोय ।
सहजै सब सिधि पाइये, जो मन जोगी होय ।।
Sant Kabir Das तथाकथित साधू किंवा सज्जन आपल्या शरीराचे बाह्य रूप बदलतात. साधू रुद्राक्षांच्या माळा घालतात, भस्माचे पट्टे ओढतात. तथाकथित सज्जन पांढरे स्वच्छ कपडे घालून आपले मन, आपले चारित्र्य किती स्वच्छ आहे, किती निष्कलंक, जोग्यासारखे आहे हे भासवतात. हे सगळे बाहेरूनच असते. पण मनाचे काय, मनाला स्वच्छ करण्याच्या बाबतीत मात्र हे सारे ‘तथाकथित’च असतात. असे काहीतरी करा, मनातला भक्तिभाव जागवा म्हणजे मनही शरीरासारखेच स्वच्छ, सुंदर आणि जोगी होईल.
आपल्या Sant Kabir Das दोह्यांमधून अशाप्रकारे समाजाला दिशा दाखवणारे हे आहेत संत कबीर. हिंदी भाषेतीलच नाही तर ‘जगातील सर्वश्रेष्ठ व्यंगकार’ असे या संत कबीरांना हिंदीवाले मानतात. आपल्या ज्ञानेश्वर, तुकारामांच्या अभंगांचे जे स्थान महाराष्ट्रात आहे तेच स्थान कबीरांच्या दोह्यांचे संपूर्ण उत्तर भारतात, हिंदी भाषकांमध्ये आहे, तेही पंधराव्या शतकापासून. ‘व्यंगकार’ हा शब्द हिंदीत समाजातील व्यंगांवर टीका करणारा या अर्थाने आहे. समाजातील अनिष्ट चालीरीती, परंपरा, प्रथा, अंधश्रद्धा या साèयांवरच शब्दांचे आसूड कबीरांनी ओढले आहेत. हिंदी भाषेत डॉक्टरेटच्या सर्वाधिक प्रबंधांचा विषय ‘संत कबीर’ हाच असून, आजही त्यांच्यावरचे किंवा त्यांचे लिखाण, ताजे टवटवीत असल्यासारखे तेवढ्याच उत्सुकतेने, श्रद्धेने वाचले जाते.
मध्ययुगातील भारतीय संत परंपरेत संत कबीरांचे स्थान अनन्यसाधारण आहे. ‘कबीराचे दोहे’ हे पंधराव्या शतकापासून भारतीय समाज जीवनावर प्रभाव टाकतात. संत कबीरांनी अनेकांच्या आध्यात्मिक, भौतिक, सामाजिक जीवनाला दिशा दिली. त्यामुळेच रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अनेकांनी कबीरांना वैचारिक गुरू मानले. रवींद्रनाथांनी कबीरांच्या दोह्यांचा इंग्रजीत अनुवाद करून ते जगभर पोचवले. गांधीजींच्या विचारांचा उगम कबीरांच्या संस्कारांमध्ये सापडतो. डॉ. आंबेडकरांनीही त्यांना आपले गुरू मानले होते.
संत कबीरांच्या जन्माबाबत अनेक दंतकथा आणि लोककथा आहेत. काहींच्या मते, कबीर एका विधवेच्या पोटी जन्माला आले. जननिंदेच्या भीतीने तिने त्या बालकास तळ्याकाठी सोडून दिले. तळ्याकाठचे हे बालक निरू व निमा या मुस्लिम विणकर दाम्पत्याला सापडले व पुढे त्यांनी त्याला वाढविले, सांभाळ केला. बहुसंख्य कबीरपंथी विक्रम संवत 1455 (इ. स. 1398) मध्ये ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमेच्या दिवशी कबीरांचा जन्म झाला असे मानतात. याच, म्हणजे आजच्याच दिवशी ज्येष्ठ पौर्णिमेस कबीर जयंती साजरी करतात. कबीरांच्या कालखंडात समाज जीवनात प्रत्येक पातळीवर भेदभाव होत असे. गोरगरीब तसेच वंचित वर्गातील लोकांच्या लेकरांना शिक्षणाची दारे उघडली जात नसत. कबीर तर ‘निरू-निमा’ सारख्या मुस्लिम विणकरांच्या घरात वाढत होते. साहजिकच त्यांना तत्कालीन औपचारिक शिक्षणापासून दूर राहावे लागले. तथापि, समाज जीवनाचे सखोल निरीक्षण, अनुभव व बहुश्रुततेच्या आधारे लौकिकार्थाने निरक्षर असणाऱ्या कबीरांनी सर्व समाजाला अध्यात्म, बंधुता व माणुसकीचा मार्ग दाखवला. आपल्या शिक्षणाविषयी सांगताना कबीर एका दोह्यात म्हणतात,
मसि कागद छुयो नहीं, कलम गहि नहीं हाथ ।
चार ही युग की महातम, मुखहि जनाई बात ।।
मी शाई वा कागदाला कधी स्पर्शही केला नाही, कधी लेखणी हातात धरली नाही. पण चारही युगातील ज्ञान मी केवळ ऐकून प्राप्त केले, असा याचा अर्थ.लिहिता वाचता येत नसले तरी कबीरांनी अनुभवातून आणि सत्संगातून ज्ञान प्राप्त केले होते. दोहे, साखी या माध्यमांतून ते आपले विचार बोलून दाखवत आणि त्यांचे शिष्य ते लिहून ठेवत. त्यांचे हे विचार बानी, वचन, आदेश या नावाने ओळखले जातात. कबीरांचे शिष्य भगवानदास यांनी कबीरांच्या 600 पदांचा संग्रह केला. तो ‘बीजक’ म्हणून ओळखला जातो. कबीरपंथीय ‘बीजक’ हा आपला धर्मग्रंथ मानतात. ‘कबीर ग्रंथावली’ हा देखील एक महत्त्वपूर्ण ग्रंथ मानला जातो. या ग्रंथात कबीरांचे 400 दोहे व 800 साख्या व इतर पदे आहेत. कबीरांच्या रचना पूरबी हिंदी या बोलीभाषेत आहेत. या भाषेत अवधी, ब्र्रज, भोजपुरी, खडीवाले, अरबी, फारसी अशा तत्कालीन सर्व भाषांमधील शब्द मोठ्या प्रमाणात आढळतात. या भाषेला ‘सुधुक्कडी’ असेही म्हटले जाते. कबीरांच्या अनेक रचनांचा ‘श्री गुरुग्रंथ साहिब’मध्ये समावेश करण्यात आला आहे.
स्वामी रामानंद हे काशी क्षेत्रातील कबीरांचे समकालीन महान सत्पुरुष होते. त्यांच्याकडे अनेक जाती-धर्मांतील लोक जात येत असत. ते सर्वांना वेद, उपनिषदे, शास्त्रे इत्यादींच्या आधारे मार्गदर्शन करत. त्यांनीही अनेक रचनांची निर्मिती केली आहे. त्यांच्याही अनेक रचनांचा समावेश ‘गुरुग्रंथ साहिब’मध्ये आहे. कबीरांचे स्वामी रामानंद यांच्याकडे जाणे-येणे असे. त्यांच्याकडूनच कबीरांना गंगाघाटावर रामनामाची दीक्षा मिळाली असे मानतात. आयुष्याच्या प्रारंभी कबीरांना मुल्ला, मौलवींबरोबर संघर्ष करावा लागला.
हा संघर्ष वैचारिक स्वरूपाचा होता. या संघर्षामुळे कबीरांचे चरित्र अद्भुतरम्य झालेले दिसते. स्वतः मुसलमान समाजात जन्मले असूनही कबीर रामाचे नामस्मरण करतात आणि हिंदूंच्या देव-देवतांची पूजाअर्चा करतात. ते मुसलमानांमधील अनिष्ट रूढी, धार्मिक कट्टरतावादी परंपरा, अत्याचारांवर कडाडून टीका करतात म्हणून मुसलमान मुल्ला, मौलवींनी त्यांना विरोध केला. विविध संकटांतून बाहेर पडल्यानंतर कबीर, ‘मी काहीही केले नाही. काही करूही शकणार नाही. जे काही केले, जे काही घडले, ते प्रभू परमात्म्याने केले. पण लोकात मात्र कबीराचे नाव झाले’, अशा अर्थाच्या एका दोह्यात लिहितात,
कबीर ना हमा किआ न करहिगे, ना करि सके सरीरू ।
किआ आनऊ किछु हरि कोआ, भइओ कबीरू कबीरू ।।
कबीरांचा काळ, पंधरावे शतक हिंदू आणि इस्लाम या दोन धर्मांमधील संघर्षाचे होते. या दोन्ही धर्मांमधील अर्थहीन रूढी आणि कर्मकांडांवर टीका, प्रहार करताना त्यांनी कोणालाही सोडले नाही. आज अनेक सुधारणावादी, कथित समाजसुधारक, अंधश्रद्धाविरोधी अनिष्ट बाबींना लक्ष्य करताना मुस्लिमांना सोडून देण्याचा उद्योग करतात. पण कबीरांचे तसे नव्हते. ते दोन्ही धर्मांतील चुकीच्या पायंड्यांना सारखेच झोडपे लगावत. कबीरांनी आपल्या महानतेचा कधी बडेजाव केला नाही आणि लोकांच्या मनात त्यांच्याप्रति असलेल्या आदराचा ‘जास्तीचे मिळवण्याकरता परवाना’ म्हणून कधी पाहिले नाही. त्यांच्या दैनंदिन जीवनात वेगळे, उठून दिसेल असे काहीही नव्हते. कबीर म्हणजे ‘असामान्यपणे सामान्य माणूस’ असे ख्यातनाम हिंदी साहित्यिक हजारीप्रसाद द्विवेदी यांनी म्हटले आहे, ते उगीच नाही. त्यांचा साधेपणा त्यांच्याच या ओळीतून कसा व्यक्त होतो पाहा,
साईं ऐता दीजिए, जाने कुटुम समाय ।
मैं भी भूखा न रहू, साधु न भूखा जाय ।।
जसे आपले बहुतेक संत कवीही होते तसेच कबीरांचेही होते. या साèया संतांनी आपल्यामधल्या कवीच्या, काव्यगुणांच्या भरवशावरच आपल्या समकालीन समाजमनाला हात घातला. एवढेच नव्हे तर ते सारे आजही त्याच प्रभावीपणे समाजमन ढवळून काढू शकतात आणि तसा अनुभव आज पाच-सातशे वर्षांनंतरही आपण घेत आहोतच. कबीरांच्या भक्तिमार्गाचा केंद्रबिंदू राम आहे. ‘हा राम’ म्हणजे विष्णूचा अवतार किंवा अयोध्येचा राजा नाही. तर तो त्यांचा सर्वांत जवळचा ‘आल्हाददायक व चित्तशामक’ या अर्थाचा राम आहे. वैश्विक सद्भावाला दिलेले ते एक नाव आहे ‘राम’. जे फुलाच्या सुगंधासारखे आहे, ज्याचा अनुभव तर घेता येतो, तरी तो अदृश्य असतो तो राम..!