नागपूर,
Maruti Chitampally News अरण्यऋषि मारुती चितमपल्ली म्हणजे खरे तर जंगलाशी पूर्णतः तादात्म्य पावलेले व्यक्तित्व. जंगलाला त्यांच्यातून आणि त्यांच्यातून जंगलाला वेगळे करताच येणार नाही इतकी दोघांत एकरूपता. ही एकरूपता त्यांच्या निळावंती, जंगलाचं देणं, घरट्या पलिकडे, रातवा, रानवाटा, प्राणीकोश, पक्षीकोश, सुवर्ण गरुड, निसर्गवाचन, शब्दांचे धन, मृगपक्षीशास्त्र, केशराचा पाऊस या पुस्तकात पानोपानी प्रत्ययास येते, आणि चकवा चांदण-एक वनोपनिषद हे आत्मचरित्र या शब्दनिर्मितीचा कळसाध्याय. त्यांच्या जाण्याने अरण्यातील चांदणप्रकाशच निमाला. नागपूरसोबत त्यांचे खास रुणानुबंध होते. त्यांच्यप्रति मान्यवरांनी आपल्या हृद्य भावना व्यक्त केल्या.

ज्येष्ठ साहित्यिक वनऋषि पद्मश्री मारुती चितमपल्ली यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. निसर्ग तसेच पर्यावरणाशी नाळ जोडलेले साहित्यिक चितमपल्ली यांचे विदर्भात वन्यजीव आणि वनस्पतींच्या दुर्मीळ प्रजातींच्या जतन व संवर्धनात महत्त्वपूर्ण योगदान राहिले. Maruti Chitampally News प्राणी-पक्षी शब्दकोषासह पर्यावरणाशी संबंधित अनेक पुस्तके त्यांनी लिहिली. भारतीय वन आणि वन्य जीवनामध्ये असलेले वैविध्य जगात कुठेही नाही, हे चितमपल्ली यांनी आपल्या लेखनातून सांगितले. विदर्भातील वनसमृद्धी सोप्या भाषेतून आपल्या साहित्यात आणून त्यांनी निसर्गाला आपल्या आणखी जवळ आणले. निसर्गावर प्रेम करून त्याचे रक्षण करण्यासाठीचा वस्तुपाठ त्यांनी आपल्याला घालून दिला आहे. निसर्गाचे जतन आणि संवर्धन करण्याचा संकल्प करणे, हीच त्यांना योग्य आणि सार्थ श्रद्धांजली ठरेल.
नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री
निसर्गाला शब्दरूपांनी जिवंत करणारे आणि मराठी साहित्यात निसर्गसंपदेविषयीच्या अक्षरधनाची भर घालून, आपली साहित्य संपदा समृद्ध करणारे अरण्यऋषि पद्मश्री मारूती चितमपल्ली कायम अजरामर राहतील. वन विभागात काम करताना चितमपल्ली यांनी अनेक निसर्ग किमया आपल्या निरिक्षणातून शब्दरुपाने चितारल्या. पक्षितज्ज्ञ, निसर्गलेखक, वन्यजीवांचा अभ्यासक अशी त्यांनी ओळख मिळवली. त्यांच्यामुळे मराठी भाषेला राना-वनातील, निसर्गाशी निगडीत अस्सल असे शब्द मिळाले. विदर्भातही त्यांचा मोठा गोतावळा आहे. जंगलातील अनेकांशी त्यांचे ऋणानुबंध राहीले आहेत. या सगळ्या प्रवासात ते आयुष्यभर निसर्ग आणि मराठी साहित्य क्षेत्राशी व्रतस्थ राहिले. या ऋषिला भावपूर्ण श्रद्धांजली
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
अरण्ये म्हणजे फक्त जंगले नाहीत; ती आपल्या संस्कृतीची-ज्ञानदानाची जिवंत केंद्रे आहेत, असे सोपेसहज तत्त्वज्ञान जगाला सांगणारे तत्त्वचिंतक, मारुती चितमपल्ली यांचे जाणे वेदना देणारे आहे. त्यांच्या सोलापूरच्या घरी घालवलेले दोन तास मला त्यांच्यासमवेत जंगलभ्रमंती केल्यासारखे आठवतात. या भेटीत अनेक जंगलाचे अनेक किस्से त्यांनी मला ऐकविले. माणूस, जंगल आणि प्राणी असा तो संवाद होता. ती भेट नवप्रेरणा देणारी ठरली. एरवी केवळ झाडा-फुलांच्या किंवा नदी काठांच्या वर्णनाभोवती फिरणारे आपले साहित्य मारुती चितमपल्ली यांच्या कर्तृत्वाने, संकल्पकौशल्याने आणि तपस्येने समृद्ध झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री
मारुती चितमपल्ली यांच्या जाण्याचे अतीव दुःख आहे. लक्ष्मीनगर येथे ते वास्तव्यास असताना त्यांचा मोठा सहवास मला लाभला. ते फार कुणाशी बोलत नसत. प्रत्येेक भेटीत ते जंगलातील अनेक अतर्क्य गोष्टी सांगायचे. आमच्या रामटेक येथील कँपवर येऊन राहायची त्यांची खूप इच्छा होती. पण त्यांच्या प्रकृतीमुळे मी नेऊ शकलो नाही. नागपूर सोडून ते सोलापूरला जातानाही त्यांना रामटेकला जाता आले नाही ही खंत होती. आज तीच खंत मला जाणवत आहे. पण त्याच्या सहवासात मी खरोखर समृद्ध झालो.
अमोल खंते. निसर्गप्रेमी
मराठी वाङ्मयाच्या प्रांतात मारूती चितमपल्ली यांनी अरण्य वाचनाच्या अंगाने घातलेली ललित वाङ्मयाची भर ही अद्वितीय आणि एकमेव आहे. वाङ्मयात पर्यावरणीय बांधीलकीचे, अरण्य संवादाचे आणि मानव आणि निसर्ग यांच्यातील परस्परावलंबी नात्याच्या संस्कृतीची पुनर्स्थापनाच चितमपल्ली यांच्या साहित्याने मराठीत केली आहे. त्यांना माझ्याकडे विदर्भ साहित्य संघाच्या संमेलन समितीचे काम असतांना उमरखेडच्या विदर्भ साहित्य संमेलनाचे व नंतर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ विदर्भ साहित्य संघाकडे असताना, सोलापूर येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष करता आले होते व त्यांनी ते स्वीकारले होते याचा आनंद होता व आहे. त्यांच्या निधनाने मराठी साहित्य प्रवाहात वेगळी भर घालणारा एक ज्येष्ठतम लेखक आपण गमावून बसलो आहोत. त्यांना विनम्र श्रद्धांजली.
श्रीपाद भालचंद्र जोशी, पूर्वाध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ