अग्रलेख
Maruti Chitampalli नाती जोडणे कठीण असते असे म्हणतात. नाती टिकविणे तर महाकठीण! जर असे असेल, तर नवी नाती निर्माण करणे ही तर एक अशक्यप्राय गोष्ट असते, असेच म्हणावे लागेल. आजकाल अपार्टमेंट नावाच्या दरवाजाबंद खुराड्यात राहून त्यालाच आपले विश्व समजण्याची वृत्ती कदाचित नाईलाजाने असेल तरी वाढीस लागली. अशा काळात नाती जोडणे, नाती टिकविणे किंवा नवी नाती निर्माण करणे शक्य नाही आणि कदाचित परवडणारेही राहिले नसावे. माणसाचे माणसाशी माणसासम वागणे हीदेखील एक बातमीच होऊ पाहात असून माणसाने तसे वागावे यासाठी ईश्वराकडे प्रार्थना करावी लागते, ईश्वराकडे मागणे मागावे लागते किंवा साकडे घालावे लागते. अशा परिस्थितीत माणसाने माणसाशी नाते जोडून माणसासम वागण्याची अपेक्षा तर धूसरच; पण मानवेतर सजीवांशी नाते जोडणे हा तर विचारदेखील महाग होऊ पाहात असताना मारुती चितमपल्ली नावाचा एक महान माणूस काळाच्या पडद्याआड जावा, हे मोठे नुकसानच म्हणावे लागेल. एकाच कुटुंबात जर तीन भावंडे असतील, तर तिघा भावंडांतील थोरल्या व धाकट्या भावांचे नाते दूरचे असते. कारण मधे एक भाऊ असतो.
अशी आजकालच्या नातेसंबंधांची मानवी व्यवहारांतील स्थिती वर्णिली जात असते. त्यातील अतिशयोक्तीचा किंवा विनोदाचा भाग सोडला, तरी परस्परांसोबत असलेली नाती दुरावत चालल्याची एक खंत त्यामधून व्यक्त होत असते. माणसांचे माणसांशीच असलेले नाते अशारीतीने दुरावत चालले असेल, तर माणसाचे निसर्गाशी असलेले नाते पुन्हा जोडण्याचा गंभीर विचार केला तरी ते प्रत्यक्षात येणे फारसे सोपे नाही, असेच जाणवते. अशी खंत व्यक्त करणारी माणसे आसपास आहेत, पण विकासाचा मारा एवढा प्रबळ आहे की, त्याच्या लोंढ्यात वाहवत चालल्यावर असे विचार करण्यासही उसंत मिळत नाही आणि निसर्ग आणि माणूस यांच्यातील नाते जपण्याचा ध्यास असलेल्या काही मोजक्यांच्याच संख्येचा ऱ्हास होणे अधिकच क्लेशकारक ठरते. सध्या नेमकी हीच स्थिती असताना मारुती चितमपल्ली यांचे निधन व्हावे, हा समाजमनावरचा मोठा आघात ठरणार आहे.
मारुती चितमपल्ली यांनी निसर्गाशी नाते जोडले, ते टिकविले आणि अन्यांचेही नाते निसर्गाशी जडावे यासाठी आपले उभे आयुष्य अक्षरशः समर्पित केले. ते कार्य पूर्ण होण्याआधीच जगाचा निरोप घेताना त्यांच्या मनात याची खंत निश्चितच लागून राहिलेली असेल. हे काम सोपे नव्हते. त्यासाठी आधी अरण्याचे, जंगलांचे आणि वनांचे मन जाणून घेणे आवश्यक असते. त्यासाठी वनांचे वाचन करावे लागते, मारुती चितमपल्ली यांनी आयुष्यभर अरण्यवाचन केले आणि वनाचे मन माणसासमोर मोकळे केले पाहिजे या ध्यासाने विपुल लेखन करून माणूस व वने यांचे नाते जोडण्याचा प्रयत्न केला. आपल्या प्रामाणिक आणि सोज्वळ लेखनातून त्यांनी माणसाला जंगलांची, तिथल्या जीवनाची आणि निसर्गाच्या कहाणीची ओळख करून दिली, म्हणून आज त्यांच्या नसण्याची पोकळी प्रत्येकास जाणवते आहे हे खरे आहेच; पण ही पोकळी भरून काढणारा कुणी वारस सापडला नाही, तर त्यांची ती खंत कधीच संपणार नाही, याची जाणीव ठेवली तरच त्यांच्या कार्याला समाजाने, व्यवस्थेने आणि यंत्रणांनी मान्यता दिल्याचे स्पष्ट होईल. आपल्या उण्यापुऱ्या 92 वर्षांच्या आयुष्यातील उमेदीचा संपूर्ण काळ त्यांनी अरण्यवाचनासाठी वाहून घेतला.
या कामास त्यांनी एवढे समर्पित केले की, त्या काळातील त्यांची नोकरी हा त्यांच्या उपजीविकेच्या साधनापेक्षाही, निसर्गाशी नाते जोडण्याच्या त्यांच्या ध्यासाचे साधन ठरले होते. लौकिकार्थाने सोलापूरच्या दयानंद महाविद्यालयातील पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांची पावले अरण्य वाचनाच्या दिशेने चालू लागली. कोईम्बतूर, बंगळुरू, दिल्ली, कान्हा आदी ठिकाणी घेतलेल्या व्यावसायिक शिक्षणातून अरण्य वाचनाची लिपी जाणून घेतली. आत्मसात केलेल्या वनोपनिषदाचे विश्लेषण, विवेचन करण्यासाठी लेखन, भाषण आणि संवाद ही साधने महत्त्वाची मानून निसर्ग, वने, जंगल, वनातील जमाती आणि वन्यप्राण्यांच्या जीवनशैलीतून माणूस व निसर्ग यांच्या नात्याचे धागे शोधण्याचा एक अचंबित करणारा प्रयोग त्यांनी सुरू केला व मारुती चितमपल्ली आणि अरण्य हे एक अद्वैत होऊन गेले. भौतिक जीवनाशी एकरूप होताना, स्वार्थाव्यतिरिक्त अन्य सर्व भवतालाचा विसर पडण्याचा जमाना जोमात असताना, मारुती चितमपल्ली स्वतःसही विसरून गेले आणि अरण्याशी एकरूप झाले. गेल्या काही दशकांत विकासाचे वारे वेगवान होऊ लागले आहेत. त्यासाठी निसर्गावर करवती चालविल्या जात आहेत. जंगले नष्ट होत आहेत. हा विकास जेव्हापासून सुरू झाला, तेव्हाच वने आणि जंगले हाच ज्यांचा नैसर्गिक व हक्काचा अधिवास असतो, अशा वन्य प्राण्यांचा माणसावरील विश्वास कमी होत गेला असावा.Maruti Chitampalli अगोदरच माणसापासून दूर राहण्याची वृत्ती असलेल्या वन्य प्राण्यांचे माणसाशी वैर सुरू झाले. मानव व वन्यप्राण्यांच्या संघर्षाच्या कथा सुरू झाल्या आणि जंगलासोबतचे माणसाचे नाते तुटल्याच्या जाणिवा स्पष्ट होत गेल्या. जंगले जपणे गरजेचे आहे, असा कंठशोष सुरू झाला, पण त्यामागेही पर्यावरणाचा ऱ्हास झाल्यास मानवी जीवन संकटग्रस्त होणार या भीतीचाच भाग मोठा होता. जंगलांच्या, अरण्यांच्या आश्रयाने हक्काने आपले अधिवास बनविणाèया प्राण्यांच्या चिंतेस या भीतीमध्ये फारसा थारा नव्हता.
अशा वेळी त्या जंगलांना, तेथील रहिवासी असलेल्या वन्यजिवांना, वनस्पतींना आणि तेथील पर्यावरणालाही माणसापर्यंत आपल्या व्यथा पोहोचविण्याची गरज वाटली असावी आणि मारुती चितमपल्ली यांच्या रूपाने आपल्याला अशा संवादाचे साधन सापडले या विचाराने निसर्ग, वने आणि अरण्येही सुखावली असावीत. अरण्य वाचनामुळे मन प्रगल्भ झालेल्या चितमपल्ली यांनी वनांची हीच वेदना जाणली; त्यासाठी रात्रंदिवस अरण्ये, जंगले, वनांमध्ये वणवण केली, तिथल्या आदिवासी कोरकू, गोंड, निहाल आणि अनेक जमातींची जीवनशैली, श्रद्धास्थाने, कथा, दंतकथाही जाणून घेतल्या आणि या सामग्रीतून सिद्ध झालेल्या साहित्यानिशी वनांच्या व्यथांची उपनिषदेच त्यांच्या लेखणीतून साकार झाली.Maruti Chitampalli वनदेवता, वृक्षदेवता, निसर्गदेवता या केवळ कल्पना नाहीत, तर तिथल्या जीवनशैलीचे ते एक वास्तव आहे. ते जाणून घेतले तर वृक्ष, वनस्पती आणि सृष्टीतील प्राणिमात्रांशी संवाद साधता येतो. याचे बीज आपल्या प्राचीन ग्रंथांतूनही आढळून येते, पण हेच ज्ञान आपल्याला पाश्चात्त्य अभ्यासकांनी दिल्यावर खरे वाटू लागते, ही त्यांची खंत होती. आपल्या लेखनातून हीच माहिती, ज्ञान सामान्यांपर्यंत पोहोचावे आणि वास्तवाचे भाव यावे यासाठी त्यांनी केलेले विपुल लेखन हा अद्भुत माहितीचा खजिना होता, असेच अनेकांस वाटले, पण तो केवळ करमणुकीसाठी किंवा निसर्गाच्या माहीत नसलेल्या असंख्य बाबींचा डांगोरा जनांसमोर पिटण्यापुरता मर्यादित नव्हता.
या माहितीतून माणसाने निसर्गाशी तुटत चाललेले, दुरावत चाललेले नाते पुन्हा जोडावे, निसर्गाशी संवाद साधावा आणि विकासाच्या नावाने निसर्गाचा व नैसर्गिक पर्यावरणाचा èहास होऊन निसर्गावर जगणे निर्भर असलेल्या मानवेतरांचे जगणेही आश्वस्त करावे, ही त्यांची तळमळ होती. त्यासाठी त्यांनी आपली वाणी आणि लेखणी झिजविली, तरीही त्यांचे काम अपूर्णच राहिले. जल, वायू, वृक्ष, पक्षी आणि निसर्ग यांच्या जगण्याचे शास्त्र उलगडण्याचा त्यांचा संकल्प होता. शतकाच्या उंबरठ्यावरही, त्यासाठी ते झिजत राहिले, म्हणून ते ‘अरण्यऋषी’ ठरले.
चितमपल्ली हे स्वर्गातील दिव्य वृक्षाला आलेल्या खास बहरातून उमललेले एक फूल होते. सुगंध उधळणाèया वाèयावर झुलत हे एकदा धरतीवर अवतरले आणि एकटेच रानात पडले; तिथेही ते निसर्गासोबत झुलत राहिले. मन मोहवून टाकणारा सुगंध उधळत राहिले... ही वने, जंगले आणि अरण्ये हीच आपल्यासाठी प्रभूने निवडलेली रम्य उद्याने आहेत आणि तेच आपले आहे, अशा भावनेतून वनांशी नाते जोडणाऱ्या चितमपल्ली यांच्या तपश्चर्येतून तयार झालेले नव्या नात्यांचे धागे नव्याने जोडले जातील, तो खंतावलेल्या निसर्गाचा सुदिन ठरेल. केवळ कोणाच्या जाण्याने पोकळी निर्माण झाल्याच्या भावनेने उसासे सोडण्यापेक्षा, ती पोकळी भरून काढण्याची जबाबदारी पेलणारी मने निर्माण होणे ही चितमपल्ली यांच्याशी बोलणाऱ्या अरण्यांची अपेक्षा असेल. ती पूर्ण करण्यासाठी नाती जोडावी लागतील.Maruti Chitampalli माणसाने माणसाशी माणसासम वागावे, अशा अपेक्षेच्या काळात, माणसाने निसर्गाशी माणसासम वागावे, या अपेक्षेची भर पडली आहे. मारुती चितमपल्ली नावाच्या अरण्यऋषीने यासाठीच आयुष्य वेचले, म्हणून आपण त्यांचे ऋणी असायलाच हवे.