वेध...
विजय निचकवडे
sadhana Bhosale समाजात जगताना प्रतिष्ठेने जगलेच पाहिजे. पण ही प्रतिष्ठा मिरविताना कुणाच्या जोरावर, हाही विचार व्हायलाच हवा! माझ्या इभ्रतीला शोभेल, असंच लेकरांनी वागावं, त्यांच्यावर अपेक्षांचे प्रचंड ओझे लादेपर्यंत बापाला समाजातील आपली प्रतिष्ठा जिवापाड वाटावी आणि हे जपताना पोटच्या लेकराचा जीव घेण्यापर्यंत मजल जात असेल तर मला सांगा, अशी प्रतिष्ठा मिरविण्यात कोणता आनंद? ही मानसिकता विकृतीपेक्षा कमी नाही.
अनेक घटना रोज घडत असतात. प्रत्येक घटनेनंतर समाजातील विकृत मानसिकता पुढे येत असते. माणूस किती आणि कोणत्या टोकाला जाऊ शकतो, याची प्रचीती या घटनांमधून येते. अशाच एका घटनेने समाजमन सुन्न केले आहे. सांगली जिल्ह्यातील वरकरंजी येथील एका घटनेने विकृत बापाला तर समाजापुढे आणलेच; पण अशा प्रतिष्ठेसाठी अपेक्षांचे ओझे पाल्यांवर लादणारी मानसिकता बाहेर आली. दहावीत 92 टक्के गुण घेणारी साधना नीट परीक्षेच्या सरावात कमी गुण घेते आणि बापाला प्रश्न पडतो की, ही डॉक्टर कशी होईल? यातच मुख्याध्यापक असलेला म्हणजेच शिक्षित म्हणविणारा बाप तिला लाकडी वरवंट्याने मारून तिचा जीव घेतो. बाप-लेकाच्या नात्याला कलंक लावणारी ही घटना समाजातील बऱ्याच वास्तवांचे दर्शन घडविणारी आहे. नक्कीच प्रत्येकाला आपल्या मुला-मुलीने मोठे होऊन समाजात प्रतिष्ठेचे स्थान मिळवावे असे वाटते. यात आपसूकच त्या बापाचीही प्रतिष्ठा वाढते. मग आज समाजात प्रतिष्ठेने मिरविण्यासाठी मुलाने डॉक्टर, इंजिनीअर होणे हेच सूत्र लागू आहे का? अन्य कुठल्या क्षेत्रात, नव्हे त्या मुलांना ज्या क्षेत्रात आवड असेल, त्यात मोठे होऊन आई-बापाची प्रतिष्ठा जपली जाऊ शकत नाही का? नक्कीच! आई-बापाला मुलांचे हित अधिक कळते, पण त्याच्या इच्छा, अपेक्षा आणि त्याची आवडही कळणे गरजेचे नाही का? आणि हेच कळत नसल्याने कदाचित साधनासारख्या निष्पाप जिवांना पालकांच्या टोकाच्या महत्त्वाकांक्षांचे बळी ठरावे लागते. 92 टक्के गुण घेऊन उत्त्ीर्ण होणारी विद्यार्थिनी नक्कीच सामान्य नव्हती. तिलाही तिच्या भविष्याची आणि सोबतच आई-वडिलांच्या समाजातील प्रतिष्ठेची काळजी असेलच ना? पण सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने जीव जाईपर्यंत मारणे म्हणजे विकृतीशिवाय दुसरे काहीच नाही. मुलांवर आपली स्वप्नं थोपवून त्यातून स्वत:ची प्रतिष्ठा जपण्याचा हा आडमुठेपणा समाजाला लागलेली कीड आहे. धोंडीराम भोसले यांच्या निमित्ताने हे एक उदाहरण पुढे आले, पण असे अनेक मायबाप आहेत, जे मुलांना स्वत:च्या अपेक्षांप्रमाणे वागायला लावून मुलांची स्वप्ने, त्यांचे कलागुण चुरगाळून टाकण्याचे काम करतात. स्पर्धेत मुलांना ढकलून त्यांच्याकडून वारेमाप अपेक्षा केल्या जातात. मुुलांची क्षमता, त्यांची आवडनिवड याचा जराही कानोसा न घेता, मला वाटते म्हणून त्याने/तिने इंजिनीअर, डॉक्टर व्हावे, अशी मानसिकताच आज सुरू होण्याआधीच मुलांचे आयुष्य अपेक्षांच्या ओझ्यांनी संपविण्याचे काम करीत आहे.
पालकांच्या महत्त्वाकांक्षा इतक्या टोकाला पोहोचल्या आहेत की, आज त्या मुलांच्या जिवावर उठल्या आहेत. आज मुलांवर प्रेम नाही, अपेक्षांवर आणि समाजातील प्रतिष्ठेवर नितांत प्रेम करणाऱ्या पालकांची अनुभूती येऊ लागली आहे. पालकांचा टोकाचा अट्टहासच मुलांच्या जिवावर उठला, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.sadhana Bhosale का मुलांना त्यांच्या इच्छा-आकांक्षा, आवडी-निवडीप्रमाणे जगण्याचा अधिकार नाही? पालकांचा धाक नक्की असावा, पण तो धाक लादलेले ओझे वाटू नये, इतका नको? कारण याच ओझ्यांचे गाठोडे कधी कुणाचे आयुष्य संपवेल, याचा नेम नाही. आम्ही सुशिक्षित आहोत. मग सुशिक्षितपणाचा थोडा अंश आपल्या वागण्यातून दिसला तर कदाचित आपल्या प्रतिष्ठेसाठी मुलांवर दबाव टाकताना जरा आपण विचार करू शकू. मुलांची आवड काय? हे जाणून त्या पद्धतीने त्यांच्या पाठीशी उभे राहणाऱ्या पालकांच्या प्रतिष्ठेला नक्कीच लेकरं तडा जाऊ देणार नाहीत, पण प्रतिष्ठेसाठी वरवंट्याने मारण्याची राक्षसी भूमिका घेणाऱ्या बापांना मात्र नक्कीच या समाजातील कोणताही मुलगा बाप म्हणून स्वीकारेल, असे वाटत नाही. समाजात वाढत चाललेली ही विकृत मानसिकता बदलायला हवी. नाहीतर तुमची मुलं डॉक्टर, इंजिनीअर बनतील, तुमची प्रतिष्ठा जपली जाईलही; पण त्या मुलांच्या आयुष्यातील आनंद कायमचा संपलेला असेल. ते स्वतःसाठी जगणे विसरून आयुष्यभर तुमच्याच अपेक्षांचे आणि प्रतिष्ठेचे ओझे वाहत असतील, हे तेवढेच खरे!
9763713417