पुरी,
Jagannath Puri Rath Yatra : ओडिशाच्या पवित्र पुरी नगरीत पार पडणाऱ्या भव्य जगन्नाथ रथयात्रेत सहभागी होणाऱ्या लाखो श्रद्धाळूंकरिता रिलायन्स इंडस्ट्रीज अन्न सेवा उपक्रम राबवणार आहे. “कोणताही भाविक उपाशी राहू नये” या संकल्पनेतून रिलायन्स फाउंडेशनमार्फत यात्रेच्या मार्गावरील सहा प्रमुख ठिकाणी लाखो भाविक आणि कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना गरम व पौष्टिक भोजन पुरवले जाणार आहे. उल्लेखनीय म्हणजे, रिलायन्स फाउंडेशनचा अन्न सेवा कार्यक्रम हा जगातील सर्वात मोठा अन्न सेवा उपक्रम मानला जातो.

या तेरा दिवस चालणाऱ्या रथयात्रेमध्ये देशभरातून लाखो भक्त पुरीमध्ये येतात. त्यामुळे गर्दीचे नियंत्रण व चेंगराचेंगरी टाळणे हे मोठे आव्हान असते. यासाठी रिलायन्स स्थानिक प्रशासन, महापालिका व पोलिस यंत्रणेसोबत समन्वय साधून यात्रेच्या मार्गावर स्पष्ट दिशादर्शक फलक (साइनबोर्ड) लावणार आहे, जेणेकरून भक्त सुरक्षितपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतील. गर्दी नियंत्रणासाठी ४,००० पेक्षा अधिक प्रशिक्षित स्वयंसेवक तैनात करण्यात येणार आहेत. तसेच, कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांसाठी १०० पोलिस मदत केंद्रे उभारण्यात आली आहेत, जे श्रद्धाळूंना त्वरित मदत पुरवण्यासाठी सज्ज असतील.
पुरीमध्ये सुरू होत असलेल्या या सेवेबाबत बोलताना रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे कार्यकारी संचालक अनंत एम. अंबानी म्हणाले, “सेवा कार्य हे रिलायन्सच्या ‘We Care’ या तत्त्वज्ञानाशी खोलवर जोडलेले आहे. पुरीतील भाविकांची सेवा करण्याची संधी म्हणजे आमच्यासाठी खऱ्या अर्थाने एक आशीर्वाद आहे. आमचा विश्वास आहे की रथयात्रेदरम्यान यात्रेकरू आणि कर्तव्यरत कर्मचारी यांची सेवा करणे म्हणजेच परमेश्वराची सेवा करणे होय . भाविकांची यात्रा सुखरूप, सुरक्षित व सोयीची होण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
भाविकांच्या लहानसहान गरजांचाही विशेष विचार करण्यात आला आहे. उष्णतेपासून दिलासा मिळावा म्हणून १.५ लाखाहून अधिक हातपंखे वाटप करण्यात येत आहेत. पावसाळी वातावरणाचा विचार करता ३,५०० रेनकोट पोलिस कर्मचाऱ्यांना वाटप करण्यात आले आहेत, जेणेकरून ते त्यांच्या जबाबदाऱ्या सक्षमपणे पार पाडू शकतील. स्वयंसेवक, महापालिका कर्मचारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांना वेळेत जलपान किट्स पुरवण्यात येणार आहेत.