मुंबई,
Ashok Saraf ‘मामला पोरींचा’ या चित्रपटाच्या मुहूर्तासाठी कोल्हापूरला जात असताना ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा १७ एप्रिल १९८७ रोजी भीषण अपघात झाला होता. या अपघातात ते त्यांच्या गाडीच्या सीटसकट बाहेर फेकले गेले होते. हा प्रसंग त्यांच्या आयुष्यातील एक वळण ठरला. आजही तो क्षण त्यांच्या आठवणीत खोलवर कोरलेला आहे.जुन्या आठवणींना उजाळा देत एका कार्यक्रमात अशोक सराफ बोलत होते.

पुण्यातील संचेती रुग्णालयात त्यांच्यावर दीर्घ काळ उपचार सुरू होते. या काळात त्यांच्या प्रकृतीची विशेष काळजी चारुदत्त सरपोतदार आणि अजय सरपोतदार यांनी घेतली. अपघात इतका गंभीर होता की जवळपास दोन महिने अशोक सराफ रुग्णालयातच होते. त्यांचे जीवन काही काळासाठी थांबल्यासारखे झाले होते.त्या काळात त्यांच्या आईची प्रकृतीही खालावली होती. त्यामुळे त्यांच्या अपघाताविषयी आईला काहीच सांगण्यात आले नव्हते. "अशोक कुठेय?" असा प्रश्न आई विचारायची, तेव्हा "शूटिंगला गेलाय" असं उत्तर दिलं जायचं. मात्र, ९ मे १९८७ रोजी अशोक सराफ यांच्या आईने अखेरचा श्वास घेतला. तेव्हा अशोक सराफ रुग्णालयातच होते. आईला अखेरच्या क्षणी भेटताही आले नाही, ही खंत त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात व्यक्त केली आहे.
आईची आठवण
"तिच्या शेवटच्या काळात मी तिच्याजवळ असायला हवं होतं... मला बघावंसं वाटत असणार... काहीतरी बिघडलंय असं वाटलं असेल का तिला?" अशा शब्दांत त्यांनी त्यांच्या भावना 'मी बहुरुपी' या आत्मचरित्रात मांडल्या आहेत. "माझ्यावरची आपत्ती आईनं आपल्या अंगावर घेतली, असा माझा ठाम विश्वास आहे," असंही त्यांनी नमूद केलं ‘मामला पोरींचा’ या चित्रपटाचे निर्माते अशोक सराफ यांच्याविना पुढे काम सुरू करणार नव्हते. अखेर ६ सप्टेंबर १९८७ रोजी मुंबईतील एका हॉटेलमध्ये या चित्रपटाचा मुहूर्त झाला. या मुहूर्तावेळी अशोक सराफ नव्या जोमानं कॅमेऱ्यासमोर उभे राहिले. पत्रकार परिषदेत त्यांचं गळा दाटून आला होता. डोळ्यांतून अश्रू ओघळायच्या सीमारेषेवर आले होते.हा क्षण अशोक सराफ यांच्या आयुष्यातील दुसऱ्या इनिंगचा प्रारंभ होता. तो केवळ पुनरागमन नव्हे, तर जणू त्यांचा पुनर्जन्म होता. असे त्यांनी सांगितले