वेध
encroachment is dangers चंद्रपुरातील तुकूम भागात हायवा ट्रकने सानिका कुमरे या 22 वर्षीय तरुणीला जागीच चिरडले. लक्कडकोटच्या एका शेतकऱ्यांची ही पोर पोलिस अधिकारी व्हायचे स्वप्न उराशी बाळगून चंद्रपुरात आली होती. सोमवारी सायंकाळी अभ्यासिकेतून परत आपल्या निवासस्थानी जाताना हा अपघात घडला. खरे तर, याला अपघात म्हणूच नये. कारण अपघात आकस्मिक, अनपेक्षित असतो. जेथे अर्धाअधिक रस्ताच दुकानांच्या आणि वाहनांच्या अतिक्रमणामुळे रोखून धरला असेल आणि अगदी सहजपणे अपघात घडावा अशीच स्थिती जाणूनबुजून तयार केली गेली असेल, तर त्याला अपघात तरी कसा म्हणायचा? या घटनेतही असेच झाले. ट्रकचालकाचे नियंत्रण सुटले आणि समोर अतिक्रमणामुळे केवळ काही फुटाच्या रस्त्यावर चालणाऱ्या पादचारी व दुचाकीस्वारांना चिरडण्यापलीकडे आणखी दुसरे काही घडणार होते? अन्य एक मुलगी व महिलाही जखमी झाली.
समोरच्या आणखी काही लोकांचे सुदैव की, या तिघांना धडक दिल्यानंतर तो ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडाला धडकून बंद पडला. अन्यथा त्या साऱ्यांचे मरण होतेच. ही घटना व्यापकदृष्टीने एक शहरातील लहानशी वाटत असली तरी समस्या म्हणून ती सार्वत्रिक आहे. चंद्रपूर असो, की मग विदर्भातील अकोला, यवतमाळ, वर्धा, अमरावती किंवा अन्य लहान शहरे असोत, सगळीकडे रस्ते व ‘फूटपाथ’वरचे अतिक्रमण थोड्याफार फरकाने सारखेच आहे. अनेक शहरांत पदपथ नावालाच आहे. कारण त्यावर समोरच्या दुकांनाचे साहित्य ठेवले असते. इतके की तेथून चालणे शक्य होत नाही. दुकानदारांच्या दादागिरीमुळे नाईलाजाने पायी चालणाऱ्यांना त्यांचा हक्काचा मार्ग सोडून मुख्य मार्गावर चालावे लागते.
तेथेही दुचाकी व चारचाकी ठेवल्या असतात आणि त्यामुळे अर्धाअधिक रस्ता नसतोच, उर्वरित काही फुटाच्या रस्त्यावरून, मोठ्या वर्दळीतून जीव मुठीत घेऊन लोकांना जावे लागते. मागून येणारे वाहन कधी धडक देईल याचा काहीच नेम नसतो. याही घटनेत असेच झाले, जे अतिशय लज्जास्पद आणि कानात मुंग्यांचे वारूळ निर्माण करणारे आहे.encroachment is dangers अतिक्रणधारकांची मुजोरी, ती काढण्याची जबाबदारी असलेल्या मनपा अधिकाऱ्यांची नालायकी आणि दुचाकी चालकांकडून चालान कापण्याचीच आपली जबादारी आहे किंवा त्यालाही बगल देत वरचे चार दोन पैसे खिशात कोंबणे एवढेच आपले कर्तव्य आहे, अर्धा रस्ता घेरून उभे असलेले ऑटो, चारचाक्या घटवणे हे काही आपले काम नाही म्हणून काखा वर करणाऱ्यां वाहतूक पोलिसांच्या अकार्यक्षमतेचा हा परिपाक आहे.
आपल्या व परिवाराच्या चांगल्या आयुष्याचे स्वप्न रंगवणाऱ्यां आणि त्यासाठी गाव सोडून शहरात अभ्यास करणाऱ्यां या तरुणीचा कसलाही दोष नसताना बळी गेला. त्या कुटुंबाचा गहिवर, त्यांचे डोंगराएवढे दु:ख हे सारे सरकारी अधिकारी समजू शकणार आहेत का? एवढी असंवेदनशील व ढिम्म झालेली ही व्यवस्था मोठी घातक आहे, बघा. नागपूरचा थोडाफार अपवाद वगळता अख्ख्या विदर्भाच्या साऱ्यांच शहरांमध्ये वाहनतळ नावालाही नाही. वाहनतळ उपलब्ध नाही म्हणून चारचाकी आणि दुचाकीवाले भर रस्त्यांवर त्यांच्या गाड्या उभ्या करून निघून जातात. रस्ते तुंबतात, भांडणं होतात आणि रस्त्याच्या कडेला चहा पीत वाहतूक पोलिस खिदळत असतात, हे चित्र कुण्या एका शहराचे नाही, तर सर्वव्यापी आहे. ऑटोवाल्यांची तर कमाल आहे. भरधाव वेगाने रस्त्यावर जात असलेला ऑटो अचानकपणे ग्राहक गावला म्हणून करकच्चपणे अचानक थांबतो. धडक न देण्याची कसरत मागच्या वाहनधारकाने त्याची त्याने करावी, असा काहीसा या ऑटोचालकाचा अविर्भाव असतो. कुणी जरा त्याला काही बोलले तर तो शिवीगाळ करायला, प्रसंगी थोबाडीतही मारायला मागेपुढे पाहात नाही.encroachment is dangers कारण त्याचे सहकारी ऑटोचालक त्याचाच पक्ष घेणार हे त्याला माहीत असते. अशी संघटित गुन्हेगारी आपणच काय, वाहतूक पोलिसही उघड्या डोळ्यांनी बघत असतात. ऑटोचालकांवर कारवाई का करीत नाही असे विचारले तर, जाऊ द्या न बिचारे गरीब आहेत, अशी अजब दिलदारी हे वाहतूक पोलिस दाखवतात. जणू गरीब असणे हा वाहतुकीचे नियम मोडण्याचा परवाना आहे..! येथे विशेष उल्लेखनीय असे, रात्री दहा वाजेपर्यंत चंद्रपूरच्या तुकूम परिसरातील या रस्त्यावर मोठी वाहने जाऊ नये असा नियम केला असताना, हा ट्रक सायंकाळी 5 वाजता तेथे काय करीत होता? या प्रश्नाचे उत्तर आता कोण देणार आहे..!
संजय रामगिरवार
9881717832