गुलजार, द ग्रेट!

    दिनांक :04-Jun-2025
Total Views |
- अरुण म्हात्रे,
Guljar देशातच नव्हे तर जगात आपली ओळख निर्माण करणाऱ्या प्रख्यात कवी गुलजार यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान होणे ही त्याच्याबरोबरच प्रत्येक चाहत्यासाठी, संगीतप्रेमीसाठी आनंदाची बाब आहे, असे मला वाटते. ‘गुलजार’ असे एकेरी संबोधनच त्याच्यावरील अतीव आणि आंतरिक प्रेमाची साक्ष देण्यास पुरेसे आहे. हिंदी आणि उर्दूमध्ये कविता, गीते लिहिली असली, तरी त्याची मराठीशी घट्ट नाळ जोडलेली असणे, हीदेखील आपल्याला त्याच्याशी जोडणारी मोठी बाब म्हणता येईल. गुलजार कुसुमाग्रजांच्या कवितांचे भाषांतर करू शकला. तर, दुसरीकडे शांताबाईंनी त्याच्या ‘त्रिवेणी’चे मराठीत भाषांतर केले. याचे त्याने तोंडभरून कौतुकही केले. एकमेकांबरोबर असणारे असे नाते फार देखणे असते. तो मराठी वाचतो. आपल्याला उर्दू ऐकवतो. या अर्थाने तो कायमच खूप मराठीमय वाटतो. या संदर्भात बोलायचे तर आपण सत्यदेव दुबे यांच्या पंक्तीत त्याचे नाव घेऊ शकतो. दुबे हिंदी असले तरी आयुष्य संपूर्ण मराठी नाट्यसृष्टीला वाहून घेतले होते, तसेच गुलजारचेही आहे. तो उर्दू वा हिंदीला मानतो तेवढेच मराठीलाही मानतो. किशोर कदम आणि गुलजार एकत्रितपणे हा सुंदर प्रयोग करतात.
 
 

गुलजार  
 
 
माझ्याप्रमाणेच आपल्यापैकी प्रत्येकाचा त्याच्या गाण्यांशी अगदी जवळचा, जिव्हाळ्याचा संबंध आहे. चित्रपटांमधील त्याची गाणी अनेकांच्या हृदयाचा ठाव घेणारी, त्याच्याशी जोडून ठेवणारी आहेत. काही कार्यक्रमांच्या निमित्ताने मंचावर एकत्र आलो असता त्यांच्याशी संवाद साधण्याचे प्रसंगही मला लाभले. अर्थातच वैयक्तिकदृष्ट्या ती माझ्यासाठी फार मोठी बाब आहे. त्याच्या गाण्यांविषयी काय आणि किती बोलणार...! ‘बंदिनी’मधील त्याचे पहिले गाणे कोण विसरु शकेल? ‘मोरा गोरा अंग लैलै...’ पासून त्याच्या गाण्यांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला, तो सिलसिला अजूनही संपलेला नाही. ‘इजाजत’, ‘मौसम’, ‘आंधी...’ किती यादी देणार? अनेक गाणी आपल्या ओठांवर असून ती त्याची आहेत तितकीच आपल्या प्रत्येकाची आहेत. ती सहज ओठांवर येतात. हलकेच गुणगुणाविशी वाटतात. कवी म्हणून मला नेहमी वाटते की, गाणी लिहिणे ही एक कला आहे. यमके जुळवत काहींना ती जमते. बरेच गीतकार या पद्धतीने गाणी लिहितात. मात्र, गुलजार असे कधीच करत नाही. त्याचे गाणे आशयाच्या अंगाने येते.
 
 त्याच्या कवितेत कृत्रिम गोष्टीदेखील जिवंत रूप घेऊन येतात. त्याच्या कवितेत रात्र ढळत नाही तर हातून निसटते. एखादा क्षण हातून हलकेच ओघळतो. त्याची कविता वाट बघणारी तिन्हीसांज दाखवते. काव्यशास्त्रामध्ये याला आम्ही ‘व्यक्तिकरण’ म्हणतो. ही बाब गुलजारला फार छान जमली आहे. म्हणूनच त्याच्या कवितेतील पाऊस आपल्याला जवळचा मित्र भेटावा तसा भेटतो. तो ‘मेरा कोई सामान लौटा दो...’ म्हणतो तेव्हा ते सामान आठवणी, भूतकाळातील घटना, सहवास या सगळ्यांचे गाठोडे असते. वस्तू, सामान, निसर्ग, आठवणी या सगळ्यांना व्यक्तिरूप देणारी, आपलेसे करणारी, अधिक जवळ आणणारी त्याची ही शैली फार देखणी आहे. म्हणूनच ती तुम्हा-आम्हा प्रत्येकाला आवडणारी आहे. याच हक्काने आपण त्याला एकेरी नावाने बोलवतो. शैलेंद्र, निदा फाजली, साहिर यांच्या श्रेणीत बसणारे हे एक जवळचे नाव आहे. खरे सांगायचे तर, कवितेच्या प्रांतातील आम्ही सगळेच साहिरनंतर आदराने पाहतो ते नाव म्हणजे गुलजार.
 
‘मेरे अपने’ नावाचा चित्रपट मला आठवतो. यात हाती काम नसणाèया युवकांच्या प्रश्नाला हात घातला होता. त्या काळात भारतभर बेरोजगार युवकांच्या चळवळी सुरू झाल्या होत्या. नोकरीसाठी तरुण वाट मिळेल तिथे पळत होते. या सगळ्याचे चित्रीकरण यात अगदी नेमकेपणाने दिसते. ही शिकलेली तरुण मुले हाती काम नसल्यामुळे गुंडगिरीकडे कशी वळतात, त्यांचे गट कसे होतात, ते कसे गुन्हेगारी करू लागतात हे प्रभावीपणे सांगण्याचा प्रयत्न झालेला दिसतो. गुलजारची ग्रेट गोष्ट म्हणजे त्याने हे सगळे प्रत्यक्ष सुरू होते, त्याच काळात एका कथानकातून विषय रुपेरी पडद्यावर आणला. आपल्याकडे ‘अधांतर’ नावाचे नाटक जवळपास याच विषयावर बेतलेले आहे. पण ते रंगमंचावर यायला जवळपास 20 वर्षे लागली. जयंत पवार यांनी ते लिहिले आणि गिरणी कामगारांचा प्रश्न मंचावर आणला. पण ‘मेरे अपने’ हा चित्रपट त्याच्या किती तरी आधी गुलजारने पडद्यावर आणला होता. यातील एक वृद्धा या तरुणांना सांभाळते आणि सन्मार्गी आणण्याचा प्रयत्न करते. पुढे ‘अंकुश’मध्ये याच प्रश्नाला हात घालण्यात आला, पण गुलजारने त्याआधीच हाताला काम नसणाèया युवकांच्या समस्येला तोंड फोडले. कोणीतरी आपल्याला आपले म्हणावे, ही या तरुणांच्या मनातील भावना त्याने शब्दांवाटे मांडली. गुलजारने अशा अनेक मानवी भावनांना वाट मोकळी करून दिली.
 
 ‘सब कुछ ठीकठाक है...’ हे त्याचे गाणेही असेच लक्षात राहिले आहे. खरे तर परिस्थिती अगदीच विपरीत असते. काहीच नीट नसते. आयुष्य भरकटलेले असते. तरीही चित्रपटातील तरुण ‘सब कुछ ठीकठाक है’ म्हणतात तेव्हा एक प्रकारे परिस्थितीवर प्रहार होतो, नैराश्य व्यक्त होते आणि हे सगळे उपहासात्मक शैलीत होते. म्हणजेच कधी गुलजार पराकोटीच्या तरल शैलीत लिहिताना दिसतो तर दुसरीकडे तो असेही काही लिहून जातो. तो ‘आंधी’मधील गाणी लिहितो आणि तोच नंतर ‘बिडी जलै ले..’ लिहितो. ही रेंज अफलातून आहे. खरेच तो अस्सल मुंबईकर झाला आहे. मुंबईचे सगळे वातावरण त्याच्या रक्तात मिसळून घेतल्यामुळे तो करतो ते सामान्य माणसाला जवळचे वाटते.
 
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे गुलजारने एस. डी. बर्मन, सलील चौधरी, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, आर. डी. बर्मन, मदनमोहन ते अगदी ए. आर. रेहमान यांच्याबरोबरही काम केले आहे. ही रेंज असामान्य म्हणावी लागेल. कवी म्हणून गुलजारचा हा गुण मला अत्यंत मोलाचा वाटतो. गाणी लिहिताना संगीतकारांशी संबंध येतो तेव्हा प्रत्येकाची निकड वेगळी असते. प्रत्येक संगीतकार गाण्याचे वेगळे मीटर सांगत असतो. त्याला कसे गाणे हवे आहे, ते स्पष्ट करत असतो. सगळ्याच कवींना प्रत्येकाला हवे तसे गाणे देणे शक्य होत नाही. आपण ‘तेथे पाहिजे जातीचे...’ म्हणतो; तसे येथे असते. या धर्तीवर पाहता गुलजार सांगाल ते सगळे देणारा माणूस आहे, असे मला वाटतो. तो कोणत्याही मीटरमध्ये लिहू शकतो. आजही मी ‘मिली’ वा ‘घर’मधील गाणी ऐकतो तेव्हा तो किती आपल्या मानसिकतेशी जोडलेला आहे, हे समजते. त्याची प्रत्येक ओळ आपल्या मनाने कधी ना कधी अनुभवलेली असते. म्हणूनच त्याची गाणी जाणकारांबरोबर सर्वसामान्यांनाही आवडतात. अभिजात, समीक्षक वर्गाला त्याचे काव्य आवडते, तसेच सामान्यातील सामान्यही त्याचा आस्वाद घेऊ शकतो. या कसोटीवर उतरत असल्यामुळेच गुलजार ग्रेट ठरतो.