एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर :महागाई भत्त्यात ७ टक्क्यांची वाढ

वैद्यकीय योजना व अपघाती विमा कवचातही सुधारणा

    दिनांक :04-Jun-2025
Total Views |
मुंबई,
MSRTC महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारकडून मोठी दिलासादायक घोषणा करण्यात आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तब्बल ७ टक्क्यांची वाढ करण्यात आली असून, सध्या मिळणारा ४६ टक्के महागाई भत्ता आता वाढून ५३ टक्के करण्यात आला आहे. ही सुधारित भत्ता रक्कम जून २०२५ पासून मूळ वेतनावर लागू होणार आहे.
 
 
MSRTC
राज्यातील विविध एसटी कर्मचारी संघटनांकडून मागणी होत असलेल्या या निर्णयाबाबत सह्याद्री अतिथीगृहात वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यामध्ये भत्ता वाढीचा निर्णय घेण्यात आला. तसेच कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठीच्या वैद्यकीय योजनेतही मोठे बदल करण्यात आले असून, त्यामुळे आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि पोहोचण्याजोगी होणार आहे.दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या जुन्या तक्रारींवरही सरकारने लक्ष घातले आहे. तालुका पातळीवर ८ टक्के घरभाडे भत्ता मंजूर असतानाही प्रत्यक्षात केवळ ७ टक्केच भत्ता मिळत होता आणि तोही वेळेवर मिळत नव्हता. नव्या निर्णयामुळे ही तक्रार दूर होण्याची शक्यता आहे.
 
 

अपघाती विमा कवच लागू
एसटी MSRTC कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी राज्य सरकारने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. एसटीच्या कर्मचाऱ्यांसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून अपघाती विमा कवच लागू करण्यात आला आहे. एसबीआयमध्ये वेतन खाते असलेल्या कर्मचाऱ्यांना हे संरक्षण दिले जाणार आहे. विशेष म्हणजे, हे विमा कवच ड्युटीवर असताना किंवा नसतानाही लागू होईल.या योजनेअंतर्गत वैयक्तिक अपघातात मृत्यू झाल्यास १ कोटी रुपये, पूर्णतः अपंगत्व आल्यास १ कोटी रुपये आणि अंशतः अपंगत्व आल्यास ८० लाख रुपये इतकी विमा रक्कम कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.
 
 

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोफत एसटी प्रवास
 
 
सेवानिवृत्त MSRTC कर्मचाऱ्यांनाही यावेळी एक खास भेट देण्यात आली आहे. एसटीमधून निवृत्त झालेल्या सुमारे ३५ हजार कर्मचाऱ्यांना व त्यांच्या पत्नीला वर्षभर मोफत एसटी प्रवासासाठी पास देण्याची घोषणा करण्यात आली आहे. या निर्णयामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मान राखला जाणार असून, त्यांच्या दैनंदिन प्रवासातील खर्चातही मोठा बचाव होणार आहे.राज्य सरकारच्या या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण असून, त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक सुरक्षेला चालना मिळणार आहे.