अग्रलेख
Agralekh विकासाची गाडी वेगात दौडत असल्याने सध्या देशातील वातावरण सकारात्मक ऊर्जेने ओतप्रोत आणि चैतन्याने भारलेले आहे. अनेक चांगल्या गोष्टी घडत असताना विरोधी पक्षांना मात्र हे सहन होत नसल्याचे उघडपणे दिसत आहे. हिमालयीन रांगांमधील सर्वांत कठीण, दुर्गम असलेल्या पिरपंजाल पर्वताची छाती फोडून आपल्या अभियंत्यांनी श्रीनगरच्या पलीकडे असलेल्या बारामुल्ला शहरापर्यंत रेल्वेमार्ग नेला. याच मार्गावरून 6 जून रोजी कटरा येथून निघालेली केसरी वंदे भारत ट्रेन चिनाबवरील पूल पार करीत बारामुल्लाला पोहोचली. हा दिवस सर्व भारतीयांसाठी अभिमान आणि गौरवाचा ठरला. जम्मू-काश्मीरच्या विकासासाठी जेवढे प्रयत्न गेल्या दहा वर्षांत झाले तेवढे गेल्या 60 वर्षांतही झाले नाहीत. श्रीनगर-उधमपूर-जम्मू रेल्वे मार्गाचे भूमिपूजन खरे तर 1983 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते झाले होते, पण काम पूर्ण झाले भारतीय जनता पक्षाच्या राजवटीत.
हा प्रकल्प पूर्ण झाल्याबद्दल बहुतांश राजकीय पक्षांनी मोदी सरकारचे लाजेस्तव का होईना अभिनंदन केले असले तरी काँग्रेसच्या एकाही बड्या नेत्याने चकार शब्दही काढला नाही. वास्तविक पाहता या प्रकल्पाची पायाभरणी राहुल गांधी यांच्या आजीने केली होती. 1983 मध्ये या प्रकल्पाची किंमत फक्त 50 कोटी होती. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर आणि पहिली वंदे भारत ट्रेन श्रीनगरला पोहोचल्यानंतर एरवी छोट्या छोट्या गोष्टींसाठी प्रसारमाध्यमांवर मते व्यक्त करणारे राहुल गांधी यांनी मोदी सरकारचे अभिनंदन करणे तर सोडाच स्तुतीचा एक शब्दही काढला नाही. वास्तविक पाहता काश्मीर खोऱ्यात भाजपाचा एकही आमदार नाही. निवडणुकीच्या काळात पक्षाचा प्रचार करण्यासाठीही कुणी तयार होत नसतो. निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारही पुढे येत नाहीत. पण, सत्तेचा विचार न करता मोदी सरकारने निवडणुकीतील निकाल विरोध जातात की बाजूने, याचा विचार न करता गेल्या दहा वर्षांपासून काश्मीर खोऱ्यात झपाट्याने विकास चालविला आहे.Agralekh जेव्हा विकास होत असतो तेव्हा जनमतही हळूहळू का होईना विकास करणाऱ्यांच्या बाजूने तयार होत असते. नकारात्मक राजकारण करून काहीही साध्य होणार नाही, हे राहुल गांधी यांना केव्हा कळेल हे देवच जाणे. काहीना काही विचित्र, निराधार आणि अवास्तव विधान करून गोंधळ घालणे हे राहुलबाबाचे खास वैशिष्ट्य झाले आहे. निवडणूक आली की हे महाशय सक्रिय होतात आणि सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याच्या नादात नको ते बोलतात. याचे ताजे प्रकरण म्हणजे त्यांनी एका इंग्रची दैनिकातील लेखात निवडणूक आयोगावर केलेले वक्तव्य होय.
बिहारमध्ये या वर्षाच्या शेवटी विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत काय होणार आहे, याची जाणीव राहुल गांधी यांना झाली असल्यानेच त्यांनी निवडणूक आयोगावर टीका करणे सुरू केले आहे. 2024 मध्ये महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा मोठा पराभव झाला. स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रात प्रथमच काँग्रेसला एवढ्या कमी म्हणजे 16 जागा मिळाल्या. उद्धव ठाकरेंच्या पक्षाला तरी 20 जागा मिळाल्या. एवढा दारुण पराभव होऊनही काँग्रेसचे डोळे उघडले नाहीत. जो महाराष्ट्र सातत्याने काँग्रेसच्या पाठीमागे उभा होता त्या राज्यात एवढी वाईट अवस्था पक्षाची का व्हावी याचा विचार करणे आवश्यक आहे.
तशी देशात काँग्रेसची घसरण 1990 पासूनच सुरू झाली. फरक एवढाच की राहुलबाबाच्या काळात नीचांकी कामगिरीचे सर्व विक्रम मोडीत निघाले. ज्या निवडणूक व्यवस्थेवर काँग्रेस सातत्याने प्रहार करते, ती व्यवस्था काँग्रेसच्याच काळात निर्माण केली गेली. त्यामुळे ईव्हीएमविरोधात रान उठविणे म्हणजे कोल्ह्याला द्राक्षे आंबट असा प्रकार होय. बिहार विधानसभेतही काँग्रेसच्या पदरात फार जागा आहेत, असे नाही. महाराष्ट्र आणि बिहार मिळून विधानसभेच्या एकूण 531 जागा आहेत. महाराष्ट्रात 288, तर बिहार विधानसभेच्या 243 जागा आहेत. दोन्ही राज्ये मिळून काँग्रेसकडे आहेत फक्त 35 जागा. यावेळची काँग्रेसची स्थिती तर फारच वाईट आहे. नितीशकुमार यांच्या नेतृत्वातील जदयू आणि भाजपा यांची युती असल्याने आणि सध्या देशातील भाजपासाठीचे सकारात्मक वातावरण पाहता 2020 मध्ये काँग्रेसला मिळालेल्या 19 जागाही कायम राहतील की नाही, याची शाश्वती नाही.
लोकसभेतही तेच हाल आहेत. बिहारमधील लोकसभेच्या 40 पैकी फक्त 3 जागा काँग्रेसकडे आहेत. यापैकी एक जागा किशनगंज लोकसभा मतदारसंघाची आहे. ज्यामध्ये 70 टक्क्यांच्या आसपास मुस्लिम मतदार आहेत. देशातील हिंदी पट्ट्यामधील बिहार हे महत्त्वाचे राज्य आहे. मार्च 1990 पासून बिहारमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री नाही. कधीकाळी देशावर एकछत्री राज असलेल्या देशातील या सर्वांत जुन्या राजकीय पक्षावर एवढी वाईट स्थिती का यावी, याचा विचार न करता निवडणूक आयोग किंवा केंद्र सरकारवर टीका करून काहीही साध्य होणार नाही. ईव्हीएम मशीन हॅक होत आहे हे सिद्ध करून दाखवा, असे आवाहन निवडणूक आयोगाने गेल्या लोकसभा निवडणुकीच्यावेळीही केले होते.
त्यावेळी काँग्रेसचा एकही प्रतिनिधी निवडणूक आयोगाकडे गेला नाही. काँग्रेसचे आताचे रडगाणे हे मतदान प्रक्रियेवरचे आहे. मॅचफिक्सिंग करून निवडणूक आयोग आणि भाजपाने विधानसभा निवडणुकीचे निकाल आपल्या बाजूने फिरविल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. शेवटच्या एक दीड तासांत 76 लाखांच्या आसपास मते वाढविल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यालाही निवडणूक आयोगाने उत्तर दिले असताना राहुल गांधी बालिशपणे वक्तव्य करीत आहेत. एका इंग्रजी दैनिकात, 7 जूनच्या अंकात राहुल गांधी यांनी लेख लिहून विधानसभा निवडणुकीत गडबड केल्याचा आरोप केला आहे.Agralekh निवडणूक आयोगानेही आकडेवारी जाहीर करीत प्रत्युत्तर दिले असले तरी राहुल गांधी सत्य मानायला तयारच नाहीत. मतदारयाद्यांमध्ये बोगस मतदारांची नावे घुसविल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मात्र, अंतिम मतदारयाद्या सर्वच राजकीय पक्षांना उपलब्ध करून दिल्या. या मतदारयाद्यांना काँग्रेसने आक्षेप घेतला नाही. प्रत्येक मतदान केंद्रावर त्या त्या पक्षाचे प्रतिनिधी असतात. विधानसभा निवडणुकीच्या काळात 1 लाख 3 हजार 727 प्रतिनिधी केंद्रांवर नियुक्त करण्यात आले होते आणि त्यामध्ये काँग्रेसच्या 27 हजार 99 प्रतिनिधींचा समावेश होता.
निव्वळ बोगस मतदान झाल्याचा आरोप करून चालणार नाही तर त्याचे पुरावेही सादर करावे लागतात. मतदान प्रक्रियेच्या काळात यापैकी काँग्रेसच्या एकाही केंद्र प्रतिनिधीने मतदारयाद्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यापुढे खरे अपील दाखल केले नव्हते. आता थयथयाट करून काहीच उपयोग नाही. महाराष्ट्रातील मतदारांनी दिलेला कौल मान्य करून बिहारात गेल्या निवडणुकीत जिंकलेल्या 19 जागा कायम राहतील, याकडे लक्ष द्यावे. जनता आता राजकीयदृष्ट्या जागृत झाली आहे. सत्तेची चावी कुणाच्या हातात द्यावी हे मतदारांना चांगले ठावूक झाले आहे. मतदारांना गृहीत धरण्याचे दिवस कधीचेच संपले आहेत. तेव्हा महाराष्ट्रातील निकालावर शंका व्यक्त करणे म्हणजे प्रत्यक्ष मतदारांनी दिलेल्या कौलाचा अवमान होय. कोण सत्य आणि वास्तवाला धरून बोलत आहे, हे जनता जाणून आहे. देशात 2014 पासून जेवढ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्या आहेत त्यापैकी राहुल गांधी यांच्या नेतृत्वात किती जिंकल्या याचा प्रथम विचार करावा. निवडणुकीतील विजय काही वर्तमानातील कामगिरीवरही मिळत नसतो. भूतकाळात तुम्ही काय दिवे लावले आहेत याचा विचारही मतदार करतात.Agralekh आज विकासाचा वारू चौखूर उधळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात भारत सुरक्षित असल्याची खात्री देशवासीयांना झाली आहे. मतदारांनी दिलेल्या कौलाचा मान राखण्याची सवय काँग्रेसला आणि राहुलबाबाला जेवढ्या लवकर होईल तेवढे चांगले.