कोची
Cargo ship fire near Kochi कोलंबोहून न्हावा-शेवा बंदराकडे येणाऱ्या ‘एमव्ही वान हाय 503’ (MV WAN HAI 503) या मालवाहू जहाजाला भीषण आग लागल्याची घटना केरळजवळ घडली. या दुर्घटनेत जहाजावरील चार खलाश बेपत्ता असून, पाच जण जखमी झाल्याची माहिती भारतीय नौदलाने दिली आहे. जहाजावर एकूण २२ खलाश होते.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कोचीपासून सुमारे ३१५ किलोमीटर अंतरावर समुद्रात जहाजाच्या अंडरडेकमध्ये अचानक आग लागली. त्यानंतर मोठा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. आगीचा प्रसार झपाट्याने झाल्यामुळे काही वेळातच संपूर्ण जहाजात भीषण आग पसरली. या घटनेचा थरारक व्हिडिओही समोर आला असून, हेलिकॉप्टरमधून टिपलेल्या दृश्यांमधून आगीचे भयावह चित्र दिसून येते.
सध्या भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाच्या मदतीने जहाजावरील उर्वरित खलाशांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. बेपत्ता खलाशांचा शोधही युद्धपातळीवर सुरू आहे.
भारतीय नौदलाने Cargo ship fire near Kochi दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, हे जहाज सिंगापूरचे असून त्याची लांबी २७० मीटर तर रुंदी १२.५ मीटर इतकी आहे. जहाजाने ७ जून रोजी कोलंबोहून प्रवास सुरू केला होता आणि १० जून रोजी एनपीसी मुंबई येथे पोहोचण्याचे त्याचे उद्दिष्ट होते. मात्र, मुंबईत दाखल होण्यापूर्वीच कंटेनर विभागात आग लागली.या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती नौदलाकडून देण्यात आली आहे.