मुंबई
Hera Pheri 3 तब्बल २५ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘हेरा फेरी’ चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतो. या चित्रपटातील बाबूराव गणपतराव आपटे उर्फ बाबू भैय्या हे पात्र साकारणारे अभिनेते परेश रावल अलीकडेच ‘हेरा फेरी ३’ मधून बाहेर पडल्याची बातमी चर्चेत आली होती. मात्र, आता त्यांनी दिलेल्या एका सूचक उत्तरामुळे चाहते पुन्हा आशावादी झाले आहेत.
चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान परेश रावल यांनी अचानक प्रकल्पातून माघार घेतली होती. त्यामुळे निर्मिती कंपनीने त्यांच्यावर तब्बल २५ कोटींचा दंड ठोठावला. यानंतर परेश रावल यांनी साइनिंग रक्कम म्हणून घेतलेले ११ लाख रुपये व्याजासह परत केले. या सगळ्या गोंधळानंतरही चाहते त्यांना चित्रपटात परत येण्याची विनंती करत होते.
अलीकडेच एका चाहत्याने एक्स (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांना विनंती करत म्हटले की, "सर, कृपया पुन्हा हेरा फेरी चित्रपटात सामील होण्याचा विचार करा. तुम्ही या चित्रपटाचे नायक आहात." यावर परेश रावल यांनी दिलेलं उत्तर लक्षवेधी ठरलं. त्यांनी म्हटलं, "नाही, हेरा फेरीमध्ये तीन हिरो आहेत." या उत्तरामुळे चाहत्यांमध्ये त्यांच्या पुनरागमनाची आशा निर्माण झाली आहे.
‘हेरा फेरी’ Hera Pheri 3 चित्रपटात बाबू भैय्यांसोबत राजू (अक्षय कुमार) आणि श्याम (सुनील शेट्टी) ही पात्रंही तितकीच लाडकी ठरली होती. या तिघांच्या अजरामर अभिनयामुळे हा चित्रपट एक कल्ट क्लासिक ठरला. त्यामुळे परेश रावल यांचं ट्विट ‘हेरा फेरी ३’मध्ये त्यांच्या पुनरागमनाचा इशारा देत असल्याचं समजलं जात आहे.
दरम्यान, या ट्विटवर चाहत्यांकडून जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी म्हटलं की, “ते तीन हिरो तुमच्या बरोबरीचे नाहीत”, तर काहींनी भावनिक अपील करत लिहिलं, “बाबू भैय्या, हे फक्त जनतेच्या मागणीनुसार करा… यावेळी आमच्यासाठी ते करा.”चित्रपटसृष्टीत हलक्याफुलक्या विनोदी कथानकांसाठी ‘हेरा फेरी’ हा चित्रपट आजही आदर्श मानला जातो. अशावेळी बाबूराव परत चित्रपटात दिसल्यास प्रेक्षकांसाठी ती पर्वणीच ठरेल, यात शंका नाही.