हिंदू साम्राज्य दिवस

09 Jun 2025 13:14:55
Hindu Empire महाराष्ट्रात मुघल साम्राज्याची पाळेमुळे खोलवर गेलेली होती. त्याला जवळपास 300 वर्षांचा कालावधी झालेला होता. त्यामुळे इथल्या भाषा, भूषा, भोजन, भवन, भेषज म्हणजे औषध या सर्वांबरोबरच जनजीवनावरही बऱ्याच प्रमाणात प्रभाव झालेला होता. मुलांची नावे सुद्धा पिराजी, शहाजी अशा पद्धतीची ठेवली जायची. लोकांच्या बोली भाषेमध्ये फारसी व उर्दू शब्द सुद्धा सहजपणे बोलले जायचे. वापरात असलेली चलनी नाणी ही सुद्धा मुघलांची होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी विजेत्यांचा हा प्रभाव समाप्त करण्यासाठी त्या काळात सर्वत्र रूढ असलेले फारसी, उर्दू शब्द राजव्यवहारातून काढून टाकले व राजव्यवहार कोशाची निर्मिती केली. इंग्रजांनी दिलेली गुळगुळीत नाणी बनवून देण्याचा प्रस्ताव छत्रपती शिवाजी महाराजांनी नाकारला व स्वत:ची चलनी नाणी सुरू केली. ही महाराजांची स्वदेशी दृष्टी होती.
 
 

हिंदवीस्वराज्य  
 
 
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही इतिहासातील एक अनोखी स्फूर्तिदायक घटना होती. 300 वर्षांपेक्षा अधिक कालखंडापासून महाराष्ट्रावर वेगवेगळ्या बादशहांचे राज्य होते. लोकांनी गुलामी मानसिकतेने स्वीकारलेली होती. हिंदूंची जागा फक्त बादशहाची चाकरी करण्यातच आहे अशा पद्धतीची विचारसरणी ही मोठमोठ्या शूरवीर, पराक्रमी लोकांची होती. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य उभे करण्याचा केलेला प्रयत्न हा इतिहासाला सुद्धा नवीन होता. ही चौकटीबाहेरची विचारसरणी होती.
 
गुलामगिरी इतकी रक्तात भिनलेली होती की कुठलाही राजा स्वत:चा राज्याभिषेक करून घेणे हा अपराध समजत होता. स्वत:चा राज्याभिषेक करणे म्हणजे बादशाही सत्तेला आव्हान देण्यासारखे होते. त्यामुळे कोणी राज्याभिषेक करायला धजावत नव्हता. यामुळेच की काय धार्मिक ग्रंथांमध्ये सुद्धा राज्याभिषेक विधी हा सुद्धा दिसेनासा झालेला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यासाठी काशीवरून त्यावेळेसचे अत्यंत विद्वान गागाभट्ट यांना बोलविण्यात आले होते. देशातील विविध साधुसंतांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला आपले आशीर्वाद पाठविले होते.
 
रामदास स्वामी यांनी संपूर्ण भारताची एकेकाळी यात्रा केली होती. त्या यात्रेमध्ये हिंदूंवर चाललेले बादशाही मुघल सत्तेचे अत्याचार त्यांनी स्वत: आपल्या डोळ्यांनी पाहिलेले होते. समाजाची परिस्थिती आणि महिलांवर होणारे अत्याचार व्यक्त करताना ते म्हणतात
‘‘किती गुजरणी ब्राह्मणी भ्रष्टविल्या, किती एक देशांतरी त्या विकिल्या, किती सुंदरा हाल होऊनी मेल्या ।’’ त्यावेळेस त्यांनी समाजाचे वर्णन ‘‘धर्म बुडाला’’अशा पद्धतीचे केलेले होते. परंतु त्या परिस्थितीपासून तर शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांमुळे समाजामध्ये इतका स्वाभिमान व सामर्थ्य निर्माण झाले की त्याच संत रामदास स्वामींना असे लिहावे लागले की ‘‘बुडाला औरंग्या पापी, म्लेंच्छ संहार झाला’’ आणि ‘‘उदंड झाले पाणी, स्नानसंध्या करावया ।’’ रामदास स्वामींनी आपल्या रचनांमध्ये त्या त्या वेळेच्या सामाजिक परिस्थितीचे वर्णन केलेले आहे. परंतु धर्म बुडालापासून ते उदंड झाले पाणी, स्नानसंध्या करावयापर्यंत एक मोठे सामाजिक स्थित्यंतर झालेले आपल्याला दिसून येते. अर्थातच याचे श्रेय छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाला जाते.
 
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला इंग्रज, पोर्तुगीज यांचे प्रतिनिधी सुद्धा उपस्थित राहिले होते. राज्याभिषेकासाठी संपूर्ण देशातील सर्वच पवित्र नद्यांचे जल आणण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांची स्वत:चा राज्याभिषेक करण्यामागे जी दृष्टी होती ती केवळ महाराष्ट्रापुरते आपले स्वराज्य असावे अशी नव्हती तर त्यांना आसेतुहिमाचल हिंदवी स्वराज्य विस्तारित करायचे होते. पोर्तुगालची राजधानी लिस्बन येथील एका लेखागारात पत्र उपलब्ध आहे, ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात की, सिंधू नदीच्या उगमापासून ते कावेरीच्या दक्षिण तटापर्यंत पसरलेली ही भूमी आमची आहे. या भूमीतून विदेशी आक्रमकांना पळवून लावणे आणि उद्ध्वस्त झालेली सर्व मंदिरे, देवस्थाने यांना पुन्हा प्रस्थापित करणे यासाठी आपला हा सगळा उद्योग आहे असा उल्लेख त्या पत्रामध्ये आहे.Hindu Empire छत्रपती शिवाजी महाराजांचे हे स्वप्न अनेक वर्षांनंतर पेशव्यांच्या काळात जेव्हा अफगाणिस्तानातील अटक नदीच्या पलीकडे मराठ्यांचा भगवा झेंडा रोवला गेला त्यावेळेस साम्राज्य विस्ताराच्या बाबतीत खरे ठरले.
 
छत्रपती शिवाजी महाराजांनी राजा व्हावे ही साधुसंतांची इच्छा होती. ही इथल्या गोरगरीब जनतेची इच्छा होती. संपूर्ण हिंदुस्थानची इच्छा होती की हिंदूंचे राज्य देशामध्ये कुठेतरी उभे राहावे व हिंदूंचा कोणीतरी राजा व्हावा. प्रजेला रक्षकाची आवश्यकता होती. प्रजेला नेतृत्वाची आवश्यकता होती. देशामध्ये चालणाèया बादशाह्यांना सुद्धा हिंदूंचे राज्य आहे याची जाणीव करून देणे आवश्यक होते. कोणीही यावे आणि टपली मारून जावे असा समाज हिंदू समाज नाही तर त्याचाही रक्षणकर्ता आहे. त्यांचेही स्वतःचे राज्य आहे ही जाणीव सर्वांनाच करून देणे आवश्यक होते. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वत:ला राज्याभिषेक करून घेणे स्वीकारले.
 
राज्याभिषेकाचा विचार हा महाराजांच्या मनामध्ये फार आधीपासूनच होता हे आपल्या लक्षात येईल. आपल्याला दीर्घकाळ लढावे लागू शकते. यासाठी स्वराज्याची घडी बसविण्यासाठी त्यांनी दिलेले लक्ष हा सुद्धा राज्याभिषेकाच्या प्रयत्नांचाच एक भाग होता. जनतेला वसविणे, त्यांना गुरेढोरे, बी-बियाणे देणे, त्यांना नांगरण्याकरिता जमीन देणे, त्यांच्या बायका-मुलांची सुरक्षिततेची काळजी वाहणे, जे लोक धर्मांतरित झाले त्यांना हिंदू धर्मात परत आणणे, आवश्यक त्या सोयी सुविधा प्रदान करणे, धर्ममार्तंडांना सुद्धा आपला शुद्धीकरणाचा विचार पटवून सांगणे, फारसी आणि उर्दू शब्दांना बाहेरचा रस्ता दाखवून मराठीचा आग्रह धरणे, त्यासाठी राजव्यवहार कोश निर्माण करणे, नौदल उभे करणे, वतनदारी पद्धत समाप्त करून सैनिकांना पगार देणे, सैन्याचे नूतनीकरण करून तोफा बनविण्याचे कारखाने निर्माण करणे, स्वतःचे चलनी नाणे सुरू करणे आणि राज्याभिषेकापासून शिवाजी शक नाही तर राज्याभिषेक शक अशी कालगणना सुरू करणे हे सर्वच प्रयत्न एक सार्वभौम राजा बनण्याचे प्रयत्न होते.Hindu Empire 1646 ते 1674 या 28 वर्षांमध्ये केलेल्या प्रयत्नांचा परिपाक म्हणजे शिवराज्याभिषेक होता.
 
आजपर्यंत भारतामध्ये अनेक राजे झाले, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांना जनतेने ईश्वराचा अंश मानले. हिंदू या देशाचे राजे होऊ शकतात या विचाराची सुरुवात म्हणजे शिवराज्याभिषेक आहे. शिवराज्याभिषेकामुळे केवळ महाराष्ट्रातीलच जनतेला आनंद झाला नाही, तर आसेतुहिमाचल पसरलेल्या या भारत भूमीमध्ये राहणाèया, विविध भाषा बोलणाèया परंतु सनातन धर्माला मानणाèया सर्वच लोकांना आनंद झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही महाराष्ट्रापुरती मर्यादित घटना नव्हती तर ही एक अखिल भारतीय घटना होती. म्हणूनच शिवराज्याभिषेक हा हिंदू साम्राज्य दिवस आहे. ही इतिहासातील एक अनोखी मोठी घटना होती. ही घटना ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी 6 जून 1674 रोजी घडली. आज या घटनेला 351 वर्षे पूर्ण झाली आहेत. मुघलांच्या दडपशाहीला उत्तर देणारा, न्यायकुशल राजा आमच्या महाराष्ट्रात होऊन गेला. ज्याने संपूर्ण देशाला प्रेरणा दिली ही आमच्याकरिता निश्चितच अभिमानाची व आनंद साजरा करण्याची गोष्ट आहे.
Powered By Sangraha 9.0