गोंदिया,
Heavy rain शहरात आज अतिवृष्टीची नोंद झाली. २५ जुलै रोजी रात्रीपासूनच जोरदार पाऊस झाल्याने शहरी जनजीवन विस्काळीत झाल्याचे चित्र होते. संततधार पावसाने शहरातील अनेक भाग जलमय झाल्याने घरात पाणी शिरल्याने नागरिकांची दमछाक झाली. दरम्यान, खबरदारी म्हणून शहरातील शाळांना आज, सुट्टी जाहीर करण्यात आली. हवामान विभागाने दिलेल्या इशारानुसार, जिल्ह्यात २६ जुलै रोजी जोरदार पाऊस झाला. गोंदिया शहरासह तालुक्यातही अतिवृष्टीची नोंद झाली. २५ जुलै रोजी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने सकाळी १० नंतर विश्रांती घेतल्यावर दुपारी पुन्हा पाऊस सुरू झाला. संध्याकाळपर्यंत संततधार सुरू होती. या पावसामुळे शहरातील अनेक भाग जलमय झाले होते. याचा सर्वाधिक फटका राजाभोज कॉलनी, शारदा कॉलनी, सूर्याटोला, बँक कॉलनी, रेलीटोली, मरारटोली, गजानन कॉलोनी, पांडे लेआउट, रिंग रोड, अवंती चौक, न्यू लक्ष्मी नगर, मुख्य बाजारपेठ, गणेशनगर यासह अनेक वस्त्यांना बसला.

या भागांत रस्त्यावरून वाहनारे पाणी अनेक नागरिकांच्या घरात शिरले. त्यामुळे नागरिकांचे फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू, रेशन आणि कपड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने दुपारपर्यंत बाजारपेठ बंद असल्याचे चित्र होते. रेल्वेच्या रामनगर व सूर्याटोला अंडरपासवर चार फूट पाणी साचल्याने हा मार्ग आवागमनासाठी बंद झाला होता. तसेच रेल्वे भूमिगत पुलाखाली पाणी साचल्याने हा मार्गही बंद झाला होता. बाई गंगाबाई महिला रुग्णालय व सहयोग रूग्णालयात पाणी शिरल्याने सर्वांचीच तारांबळ उडाली होती. अतिप्रवाहामुळे पाल चौक ते नमाद महाविद्यालय मार्गातील नाल्यावरील रस्ता खचला. Heavy rain दरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने वाहतूक पोलिस विभागाने बॅरेकेस्ट लावले. शहरातील प्रमुख रस्त्यांवर २ ते ३ फूट पाणी साचल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे अवघड झाले. त्यातच वारंवार खंडीत होणार्या वीजपुरठ्याचा सामना नागरिकांना करावा लागला. त्यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र होते. संततधार पावसामुळे शहरातील लहानमोठ्या तलावांच्या साठ्यात वाढ झाली असून काही तलाव ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहेत. दरम्यान, जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार आज शहरातील सर्व शाळा, महाविद्यालये सुरक्षेच्या दृष्टीने बंद ठेवण्यात आले.
आ. अग्रवाल मैदानात...
शहरात रात्री व आज पहाटेपासूनच संततधार पाऊस झाल्याने अनेक भाग जलमय झाल्याची स्थिती निर्माण झाली होती. दरम्यान आ. विनोद अग्रवाल यांनी शहरातील पूरजन्य स्थितीचे गांभीर्य लक्षात घेत स्वतः तहसीलदार समशेर पठाण व अप्पर तहसीलदार श्रीकांत कांबळे आदींसह शहराच्या पूरजन्य स्थितीची पाहणी केली. Heavy rain यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. तसेच नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई मिळवण्यासाठी करावयाच्या प्रक्रियेची माहिती दिली. प्रसंगी आ. अग्रवाल यांनी, तहसील प्रशासन, नगरपरिषद आणि संबंधित विभागांना पाण्याचा तातडीने निचरा करण्याचे, प्रत्येक प्रभावित भागात सर्वेक्षण पथके तैनात करण्याचे, पीडित कुटुंबांची यादी ४८ तासांत तयार करण्याचे व स्वच्छता मोहिम युद्धपातळीवर सुरू करण्याचे निर्देश दिले.
शहरातील पूरस्थिती मानवीनिर्मित!
शहरात रस्ते व नाल्यांचे बांधकाम मोठ्या प्रमाणात होत आहे. यांच्या सदोष बांधकामासह शहरातील अनेक भागात नागरिक व व्यापार्यांनी नाल्यांवर अतिक्रमण केल्याने पाण्याच्या मार्गावर अडथळा निर्माण झाला आहे. नाल्यांमध्ये कचरा व घाण टाकली जाते. त्यामुळे या नाल्यांतील पाण्याची निकासी होत नाही. Heavy rain त्यातच शहरातील नाल्यांची दुरूस्ती, नियमीत स्वच्छता, रस्त्याकडेच्या कचर्यांची नियमीत उचल आदी बाबींकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होते. परिणामी पावसाच्या पाण्याचे निकासीचे मार्गच बंद झाल्याने पावसाच्या एक दोन सरी आल्यासही रस्त्यांना तलावाचे स्वरूप येते. त्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याचे प्रकार समोर येतात. यंदाही हीच परिस्थिती असल्याने शहरातील पूरस्थिती मानवीनिर्मित असल्याचे सुज्ञांचे म्हणणे आहे.