वर्धा,
stolen sand उन्हाळ्यात जिल्ह्यात वाळू घाटांचा लिलाव झाला नाही. चोरीच्या वाळूची अवैध वाहतूक करणार्यांवर महसूल व पोलिस विभाग कारवाई करीत आहे. सध्या पावसाळा सुरू झाल्याने नदीतून वाळूची उचल करणे पर्यावरण विभागाच्या नियमांना बगल देणारा प्रकार ठरतो. वाळू चोरट्यांवर कारवाई करणार्या पोलिस व महसूल विभागाला आता वाळू चोरी करणारा गवसल्यास पर्यावरणच्या नियमांचा भंग केल्याचाही ठपका ठेवल्या जाईल.
एप्रिल ते जून २०२५ अखेरपर्यंत पोलिस विभागाने चोरीच्या वाळूच्या अवैध वाहतूक प्रकरणी तब्बल १०३ गुन्हे दाखल केले आहे. या कारवाईंदरम्यान पोलिस विभागाने १४२ जणांना अटक करून त्यांच्याकडून वाळू व वाळूची वाहतूक करण्यासाठी वापरलेली वाहने असा १८ लाख ८८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. १० जून ते ३० सप्टेंबर हा मान्सून कालावधी असल्याचे स्पष्ट करीत या काळात नदींच्या पात्रांतून वाळूची उचल करता येणार नाही, असे पर्यावरण विभागाच्या वतीने स्पष्टही करण्यात आले आहे. पण अजूनही जिल्ह्यातील विविध भागात वाळू तस्करांकडून नदी व नाल्यांचे पात्र पोखरले जात असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.