चंद्रपूर,
Chandrapur-building collapsed महानगरातील ऐतिहासिक जटपुरा गेटनजीकच्या 80 वर्ष जुन्या जीर्णावस्थेतील उत्तम लॉजच्या इमारतीचा भाग बुधवारी, 11 सप्टेंबर रोजी पहाटे 5 वाजताच्या सुमारास कोसळला. त्यात दूध विक्रेती महिला मनीषा लोखंडे (55) गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर एका खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. नित्यनियमाप्रमाणे मनीषा लोखंडे या उत्तम लॉजखाली बसून दूध विक्रीचे काम करीत होत्या. अचानक इमारतीचा एक भाग मनीषा यांच्या अंगावर कोसळला. यात त्यांना गंभीर दुखापत झाली. या धक्कादायक प्रकारानंतर त्यांच्यावर प्रथम शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार झाले. नंतर त्यांना पुढील उपचारासाठी एका खाजगी दवाखान्यात भरती करण्यात आले. त्यांच्या पाय, हात आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.
Chandrapur-building collapsed गेल्या 30-40 वर्षांपासून मनीषा यांचे पती सुनील लोखंडे दूध व्यवसाय करीत होते. आरे डेअरी बंद झाल्यानंतर त्यांनी पानठेला सुरू केला. मात्र, अचानक प्रकृती बिघडल्याने अवघ्या 15 दिवसांत त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली व पत्नी असा परिवार होता. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मनीषा गेल्या तीन वर्षांपासून दूध विक्रीचे काम करीत आहे. परंतु, या अपघाताने मुळे तिच्या हातापायासह डोक्यालाही गंभीर दुखापत झाली आहे. आता परिवाराचे काय होईल, अशी चिंता त्यांना भेडसावत आहे. या घटनेनंतर इमारतीचे मालक विनोद मेहता यांनी, मनीषा लोखंडे यांच्या संपूर्ण उपचाराची जबाबदारी उचलण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, नागरिकांच्या मते, शहरातील सर्व धोकादायक इमारतींवर पालिकेने तात्काळ कठोर कारवाई करणे गरजेचे आहे.
Chandrapur-building collapsed उत्तम लॉजच्या तळमजल्यावर एक छोटे हॉटेलही चालते. घटनेनंतर त्या हॉटेललाही मोठा धोका निर्माण झाला आहे. पालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून, इमारतीवर लवकरच कारवाई होणार असल्याचे सांगितले. महानगरात अशा अनेक जीर्ण इमारती अस्तित्वात असून, कधीही मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. अशा सर्व इमारती तातडीने जमीनदोस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. पालिकेच्या उदासीनतेमुळेच जीर्ण इमारतींचा धोका वाढत चालला असून, यापुढे मोठे अनर्थ होण्यापूर्वी प्रशासनाने जागे व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी केली आहे.
इमारत मालकास चारदा नोटीस Chandrapur-building collapsed
पडलेली इमारत विनोद मेहता यांच्या मालकीची असून, पालिकेकडून यापूर्वी चार वेळा नोटिसा बजावण्यात आले आहे, अशी माहिती माजी नगरसेवक छबू वैरागडे यांनी दिली. तरीही मेहता यांनी याबाबत काहीही कार्यवाही केली नाही. घरमालकाचे दुर्लक्ष आणि पालिकेची उदासीनता यामुळेच हा अपघात घडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.