पुरामुळे शेतकर्‍यांची दैनावस्था; पिकांची नासाडी

    दिनांक :15-Sep-2025
Total Views |
विसापूर, 
crops-destroyed-visapur बल्लारपूर तालुक्यात यावर्षी वर्धा व इरई नदीच्या पुराने नदी काठावरील शेतकर्‍यांची दैनावस्था झाली. तिनदा पिके पुराच्या पाण्याखाली आल्याने शेकडो हेक्टर मधील पिकांची नासाडी झाली. यामुळे बळीराजा हवालदिल झाला. तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला. आता पूर ओसरत आहे. मात्र, पुरामुळे बल्लारपूर तालुक्यातील बळीराजांची स्वप्ने भंग केल्याची भावना घर करून आहे.
 
 
crops-destroyed-visapur
 
बल्लारपूर तालुक्यात कृषी क्षेत्र कोरडवाहू आहे. खरीप हंगाम शेतकर्‍यांनी जीव लावून केला. जमीनीची मशागत करत सोयाबीन, कापूस, भात, तूर, भाजीपाला व अन्य धान्यपिकांची लागवड केली. मात्र, बळीराजाचे हे स्वप्न औट घटकेचे ठरले. पुराने होत्याचे नव्हते केले. शेकडो हेक्टर मधील पिकांची पुराने नासाडी केली. crops-destroyed-visapur परिणामी शेतकरी पुन्हा एकदा आर्थिकदृष्ट्या खचला आहे. बल्लारपूर तालुक्यातील हडस्ती, चारवट, नांदगाव (पोडे), विसापूर, बल्लारपूर, बामणी, दहेली, लावारी, कळमना, आमडी, पळसगाव, कोठारी, किन्ही आदी गावातील शेतकर्‍यांना याचा फटका बसला आहे. सलग तिनदा आलेल्या पुराने बळीराजा घायाळ झाला आहे. ऐन दिवाळीत हाती येणार्‍या पिकांची नासाडी झाली आहे. आता शासकीय पातळीवर नुकसानीचे पंचनामे होतील. मदत देण्याची घोषणा होईल. मात्र, शासकीय मदत तुटपुंजी असते. कर्ज काढून खर्च केला. आशा होती पिकपाणी आल्यावर कर्ज फेडण्याची. मात्र, पुराने शेतकर्‍यांच्या स्वप्नाचा भंग केला आहे, अशी प्रतिक्रया शेतकरी व्यक्त करीत आहे.