नवी दिल्ली,
Earthquake hits Myanmar मंगळवारी सकाळी म्यानमारमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ४.७ इतकी नोंदवली गेली. आसाम, मणिपूर आणि नागालँडसह ईशान्य भारतातील अनेक राज्यांमध्येही या भूकंपाचे कंपन जाणवले असून नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या माहितीनुसार, सकाळी ६ वाजून १० मिनिटांनी भारत-म्यानमार सीमेजवळ भूकंप झाला. त्याचा केंद्रबिंदू मणिपूरच्या उखरुल जिल्ह्यातील आग्नेय दिशेला २७ किलोमीटर अंतरावर होता.
हा भूकंप जमिनीखाली १५ किलोमीटर खोलीवर झाला असून त्याचे निर्देशांक अक्षांश २४.७३ उत्तर आणि रेखांश ९४.६३ पूर्व असे नोंदवले गेले आहेत. भूकंपाचा केंद्रबिंदू नागालँडच्या वोखा जिल्ह्यापासून १५५ किमी आग्नेयेस, Earthquake hits Myanmar दिमापूरपासून १५९ किमी आग्नेयेस आणि मोकोकचुंगपासून १७७ किमी दक्षिणेस होता. तसेच मिझोरमच्या चंफाई जिल्ह्यातील अनेक भागातही भूकंपाचे कंपन जाणवले. काही ठिकाणी लोक घाबरून घराबाहेर पडले, मात्र अद्याप कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा मोठे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.