टी-20 विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये जाणार हे संघ!

13 Jan 2026 15:45:45
इस्लामाबाद,
T20 World Cup semi-final आयसीसी टी-20 विश्वचषक २०२६ची उत्सुकता आता शिगेला पोहोचत असून, स्पर्धा सुरू होण्याआधीच क्रिकेटविश्वात चर्चांना उधाण आले आहे. भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली ही बहुप्रतिक्षित स्पर्धा ७ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज आणि क्रिकेट विश्वातील दिग्गज नाव वसीम अक्रम याने केलेली भविष्यवाणी विशेष लक्ष वेधून घेत आहे. भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी संघ या विश्वचषकात एकाच गटात आहेत. दोन्ही संघांमधील बहुप्रतिक्षित सामना १५ फेब्रुवारी रोजी रंगणार आहे. मात्र या सामन्याआधीच वसीम अक्रमने पाकिस्तान क्रिकेट संघाच्या सध्याच्या स्थितीवर स्पष्ट आणि कठोर भाष्य केले आहे. गेल्या काही वर्षांत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाची कामगिरी सातत्याने उंचावत गेली आहे, तर त्याच कालावधीत पाकिस्तान संघाची कामगिरी अपेक्षेप्रमाणे राहिलेली नाही, असे अक्रमने सूचित केले आहे.
 
 

T20 World Cup semi-final 
याच पार्श्वभूमीवर वसीम अक्रमने २०२६ च्या टी-20 विश्वचषकासाठी उपांत्य फेरीत पोहोचणाऱ्या चार संघांची भविष्यवाणी केली असून, त्यात पाकिस्तानचा समावेश केलेला नाही. भारतासह ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका हे चार संघ सेमीफायनलपर्यंत मजल मारतील, असा ठाम अंदाज त्याने व्यक्त केला आहे. आयसीसी स्पर्धांमधील पाकिस्तानची अलीकडची कामगिरी पाहता हा निर्णय भावनिक नसून वास्तवावर आधारित असल्याचेही अक्रमने अप्रत्यक्षपणे स्पष्ट केले आहे. पाकिस्तान संघाची घसरण अलीकडच्या मोठ्या स्पर्धांमध्ये प्रकर्षाने दिसून आली आहे. २०२४ च्या टी-20 विश्वचषकात पाकिस्तानला गट टप्प्यातच गाशा गुंडाळावा लागला होता, तर अमेरिका आणि भारत यांसारख्या संघांनी पुढील फेरीत प्रवेश केला होता. गेल्या काही काळापासून संघातील अस्थिरता, सातत्याचा अभाव आणि कामगिरीतील चढउतार यामुळे पाकिस्तानचा संघ संघर्ष करताना दिसत आहे.
दरम्यान, भारतीय संघ या स्पर्धेसाठी सज्ज होत असून, युवा आणि अनुभवी खेळाडूंचा संतुलित संघ मैदानात उतरण्याची शक्यता आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, अक्षर पटेल, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, इशान किशन, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर यांच्यासह जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव आणि हर्षित राणा यांसारखे खेळाडू संघाची ताकद वाढवताना दिसत आहेत. टी-20 विश्वचषक २०२६ मध्ये भारताचे सामने ७ फेब्रुवारीला अमेरिकेविरुद्ध, १२ फेब्रुवारीला नामिबियाविरुद्ध, १५ फेब्रुवारीला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध आणि १८ फेब्रुवारीला नेदरलँड्सविरुद्ध खेळवले जाणार आहेत. या सामन्यांमधून भारताची लय आणि तयारी स्पष्ट होणार असून, वसीम अक्रमची भविष्यवाणी खरी ठरते का, याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.
Powered By Sangraha 9.0