इस्लामाबाद,
Terrorists killed in Khyber Pakhtunkhwa दहशतवाद्यांचे आश्रयस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाकिस्तानने खैबर पख्तूनख्वा प्रांतात मोठी सुरक्षा कारवाई केल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गुप्तचर माहितीच्या आधारे वेगवेगळी ऑपरेशन्स राबवून देशाच्या वायव्य भागात रात्रीच्या वेळी दोन छापे टाकले असून या कारवाईत १३ दहशतवादी ठार झाल्याचे सांगण्यात आले आहे. पीटीआय वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, लष्कराच्या मीडिया विंग इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सने गुरुवारी जारी केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली. १३ आणि १४ जानेवारीच्या मध्यरात्री खैबर पख्तूनख्वामध्ये ही कारवाई करण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
आयएसपीआरने सांगितले की खैबर पख्तूनख्वा प्रांतातील दोन वेगवेगळ्या चकमकींमध्ये फितना अल-खवारीज या गटाशी संबंधित १३ दहशतवादी मारले गेले. बन्नू जिल्ह्यात मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांच्या उपस्थितीवर छापा टाकला. या चकमकीत आठ दहशतवादी ठार झाले. यानंतर कुर्रम जिल्ह्यात करण्यात आलेल्या दुसऱ्या कारवाईत आणखी पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या आधीच, या आठवड्याच्या सुरुवातीला बलुचिस्तानच्या कलाट जिल्ह्यातही सुरक्षा दलांनी कारवाई केली होती. त्या कारवाईत चार दहशतवादी मारले गेल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला होता. अशा सलग लष्करी कारवाया सुरू असतानाही देशात दहशतवादी हिंसाचारात वाढ होत असल्याचे चित्र समोर येत आहे.
पाकिस्तान इन्स्टिट्यूट फॉर पीस स्टडीजच्या अलीकडील अहवालानुसार, २०२५ या वर्षात पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ल्यांच्या संख्येत ३४ टक्क्यांची वाढ झाली आहे. तसेच, या हल्ल्यांमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत २१ टक्क्यांनी वाढ झाल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे एकीकडे दहशतवाद्यांविरोधात कारवाईचे दावे होत असताना दुसरीकडे देशातील सुरक्षा परिस्थिती अधिकच चिंताजनक बनत असल्याचे दिसून येत आहे.