कल्याण,
Political twist in Kalyan-Dombivali कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेत सत्ता स्थापनेसाठी सध्या राजकीय वातावरण अत्यंत तापलेले आहे. अशातच मनसेच्या नेत्यांकडून एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिंदे गट आणि मनसेच्या नेतृत्वात या संदर्भात चर्चा सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. या घडामोडींचा परिणाम लवकरच महापालिकेतील सत्ता समीकरणावर दिसून येऊ शकतो. कल्याण–डोंबिवली महापालिकेत बहुमत मिळवण्यासाठी ६२ नगरसेवकांची गरज आहे. सध्या शिंदे गटाकडे ५३ आणि भाजपाकडे ५० नगरसेवक आहेत. तर ठाकरे गटाचे ११ नगरसेवक निवडून आले होते आणि मनसेकडे ५ नगरसेवक आहेत. मात्र, निकालानंतर ठाकरे गटाचे दोन नगरसेवक मधुर म्हात्रे आणि किर्ती ढोणे बेपत्ता झाले. यामुळे ठाकरे गटाचा संख्याबळ ११ वरून सातवर आला.

या दोन्ही नगरसेवक पूर्वी मनसेचे कार्यकर्ते होते, त्यामुळे आता मनसेकडून निवडून आलेले ५ नगरसेवक आणि या दोन नगरसेवक अशा एकूण ७ नगरसेवक शिंदे गटाला पाठिंबा देऊ शकतात. शिंदे गटाचे नेते मनसेशी चर्चेत आहेत, परंतु अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. संजय राऊत यांनी या बदलत्या पाठिंब्याबाबत नाराजी व्यक्त केली असून सांगितले की, ठाकरे गटाच्या चिन्हावर निवडून आलेले नगरसेवक मनसेत गेले तरी त्यांना अपात्रतेबाबत कारवाई होऊ शकते. जे नगरसेवक गट स्थापनेसाठी उपस्थित राहत नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. शिंदे गटाचे ५३ नगरसेवक बुधवारी सकाळी कोकण भवनात रवाना झाले आहेत, जिथे त्यांच्या गटाची अधिकृत नोंदणी केली जाणार आहे. शिवसेनेचा अधिकृत गट स्थापन करण्यासाठी गेल्या दिवशी बैठक देखील पार पडली होती.