नवी दिल्ली,
It's not easy to beat India: Ganguly माजी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार सौरव गांगुली यांनी टी-२० विश्वचषकातील भारत–पाकिस्तान सामन्याबाबत आपले मत व्यक्त करताना भारताला पराभूत करणे पाकिस्तानसाठी सोपे काम नसेल, असे ठामपणे सांगितले आहे. १५ फेब्रुवारी रोजी होणारा हा सामना क्रिकेटप्रेमींसाठी अत्यंत महत्त्वाचा असून, भारताचा संघ सध्या मजबूत स्थितीत असल्याचेही त्यांनी नमूद केले. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढत क्रिकेटसाठी चांगली बाब असल्याचे सांगत गांगुली यांनी या सामन्यामुळे स्पर्धेची रंगत वाढेल, असे मत व्यक्त केले.

भारत–पाकिस्तान सामन्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना गांगुली यांनी पाकिस्तानच्या उपांत्य फेरीतील संधींबाबत साशंकता व्यक्त केली. त्यांच्या मते, भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि इंग्लंड हे संघ उपांत्य फेरीत पोहोचण्याची अधिक शक्यता आहे. पाकिस्तानला या टप्प्यावर पोहोचणे कठीण जाणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले. याचबरोबर, टी-२० विश्वचषकात सहभागी असलेल्या सहयोगी देशांच्या कामगिरीचे गांगुली यांनी विशेष कौतुक केले. नेपाळ, नेदरलँड्स, स्कॉटलंड आणि अमेरिका यांसारख्या संघांनी बलाढ्य संघांना कडवी झुंज दिल्याचे त्यांनी सांगितले. नेपाळने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात विजयाच्या अगदी जवळ पोहोचल्याचे उदाहरण देत, अशा संघांना मोठ्या व्यासपीठावर अधिक संधी मिळाल्यास ते भविष्यात आणखी प्रभावी कामगिरी करतील, असा विश्वास गांगुली यांनी व्यक्त केला.