नवी दिल्ली,
BSP will fight on its own: Mayawati मायावती यांनी २०२७ मधील उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात मोठा निर्णय जाहीर केला आहे. बहुजन समाज पार्टी हा पक्ष आगामी निवडणूक पूर्णपणे स्वबळावर लढवणार असून कोणत्याही पक्षाशी आघाडी किंवा युती केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पक्षाच्या बैठकींचा धडाका सुरू असताना विविध समाजघटकांना एकत्र आणण्याचे प्रयत्नही वेगाने सुरू आहेत. ब्राह्मण, मुस्लिम तसेच इतर घटकांना सोबत घेत व्यापक सामाजिक समीकरण उभे करण्याची रणनीती आखली जात आहे. या पार्श्वभूमीवर मायावती यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून इतर पक्षांपासून सावध राहण्याचे आवाहन केले.

त्यांनी काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि भारतीय जनता पक्ष यांच्यावर टीका करत त्यांच्या विचारसरणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.बी. आर. आंबेडकरांच्या विचारांना विरोध करणाऱ्या पक्षांशी हातमिळवणी केल्यास पक्षाचे नुकसान होईल, असे त्या म्हणाल्या. त्यामुळे २०२७ ची लढाई स्वबळावर लढण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी पक्का करावा, असे त्यांनी सांगितले. निवडणुका जवळ आल्या की विरोधक विविध प्रकारच्या डावपेचांचा अवलंब करतात, असा इशाराही त्यांनी दिला. दबाव, प्रलोभने आणि अन्य मार्गांनी पक्षाला कमकुवत करण्याचे प्रयत्न होऊ शकतात, मात्र कार्यकर्त्यांनी विचलित न होता एकजुटीने काम करावे, असे त्यांनी स्पष्ट केले. २००७ प्रमाणेच यावेळीही पूर्ण बहुमत मिळवून सत्ता स्थापन करण्याचे ध्येय ठेवावे, असे सांगत त्यांनी आंबेडकरी चळवळीशी निष्ठा कायम राखण्याचे आवाहन केले. बाबासाहेबांच्या स्वाभिमानाच्या लढ्याला बळ देण्यासाठी सर्वांनी मिशनच्या भावनेने काम करावे, असे मायावती यांनी ठामपणे नमूद केले.