मिर्झापूर ग्रापंने सलग दुसर्‍यांदा पटकावला ५० लाखांचा पुरस्कार

18 Feb 2026 20:05:23
आर्वी, 
mirzapur-wins-majhi-vasundhara-abhiyan महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागांतर्गत राबविण्यात येणार्‍या माझी वसुंधरा अभियान अंतर्गत मागीलवर्षी ४.० अंतर्गत ५० लाखांचे बक्षीस प्राप्त करून यावर्षी पुन्हा ५.० अंतर्गत अभियानामध्ये सहभाग नोंदवून यावर्षी सुद्धा राज्यस्तरीय ५० लाख रुपयांचा प्रथम पुरस्कार जिल्ह्यातील आर्वी पंचायत समिती अंतर्गत आदर्श ग्राम संसद मिर्झापूर नेरीने पटकावला. २१ फेब्रुवारी रोजी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुरस्काराचे मोठ्या दिमाखात आणि शानदार शासकीय सोहळ्यात वितरण होणार आहे. याबाबत ग्रामपंचायतला सोहळ्याचे निमंत्रण प्राप्त झाल्याची माहिती ग्रापं अधिकारी संजय यावले यांनी दिली असून या अभियानात उत्कृष्ट कार्य करणार्‍या गटविकास अधिकार्‍यांच्या विशेष पुरस्कारामध्ये सुद्धा आर्वी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रदीप चव्हाण यांना पुरस्कार घोषित झाला आहे.
 
 
mirzapur-wins-majhi-vasundhara-abhiyan
 
महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाअंतर्गत ४.० आणि ५.० अंतर्गत सलग प्रत्येकी ५० लाखांचा प्राप्त झालेला पुरस्कार हा मिर्झापूर वासीयांच्या मेहनतीचे व आमदार सुमित वानखेडे यांच्या मार्गदर्शनाचे हे फळ असून गावातील लोकांनी दिलेली अमूल्य साथ आणि ग्रामपंचायत अधिकारी संजय यावले यांनी घेतलेली शब्दातीत मेहनत यामुळेच हे यश प्राप्त झाले आहे. प्रत्येक गावाने सर्वांना सोबत घेऊन ऐयाची वज्रमूठ बांधून मेहनत घेण्याचा प्रयत्न केला तर प्रत्येक गाव आदर्श गाव म्हणून समोर येऊ शकते. मिर्झापूर नेरी सारखी गावे विविध अभियानातून विकासाच्या प्रवासात समोर आली पाहिजे, अशी प्रतिक्रिया सरपंच बाळा सोनटके यांनी यावेळी दिली. यासंदर्भात बोलताना गटविकास अधिकारी प्रवीण चव्हाण म्हणाले की, पर्यावरणीय वातावरणीय बदल विभागाअंतर्गत आर्वी पंचायत समिती अंतर्गत गटविकास अधिकारी म्हणून प्राप्त झालेला विशेष पुरस्कार हा केवळ माझा सन्मान नसून प्रामाणिकपणे केलेल्या कामाचे व माझ्यासोबत काम करणार्‍या संपूर्ण सहकारी वर्गाचे हे यश आहे. mirzapur-wins-majhi-vasundhara-abhiyan मिर्झापूर सारख्या गावात काम करण्याचे भाग्य लाभले, हा विशेष आनंद आहे, अशी प्रतिक्रिया गटविकास अधिकारी प्रवीण चव्हाण यांनी यावेळी दिली आहे.
 
मिर्झापूर-नेरी विकासाचे रोल मॉडेल : आ. वानखडे
माझ्या मतदारसंघातील मिर्झापूर नेरी हे गाव एक विकासात्मक रोल मॉडेल बनत असून येथील ग्रामस्थांनी त्यावर जिद्द, चिकाटी आणि मेहनतीने सरपंच बाळा सोनटके यांच्या नेतृत्वात विकासाची लढाई सुरू ठेवली आहे. या नेतृत्वाचे आणि साथ देणार्‍या ग्रामस्थांचे अभिनंदन करत असताना मिर्झापूर नेरीला प्राप्त झालेल्या या पुरस्काराबद्दल आ. वानखेडे यांनी शुभेच्छा दिल्या.
 
Powered By Sangraha 9.0