sand smugglers तालुक्यात सध्या अवैध रेती वाहतुकीने अक्षरशः उच्छाद मांडला आहे. भरदिवसा ट्रॅटर, डंपरमधून रेतीची खुलेआम वाहतूक होत असताना महसूल विभाग मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याने महसूल विभाग झोपेत का जाणीव पूर्वक दुर्लक्ष असा सवाल विचारल्या जात आहे.
शहरासह ग्रामीण भागात विना रॉयल्टी रेतीची विक्री होत असून शासनाच्या महसुलाला मोठा फटका बसत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यातील कन्हान परिसरातून कमी दरात रेती खरेदी करून ती कारंजा तालुयात आणली जाते. त्यानंतर कोणतीही शासकीय रॉयल्टी न भरता ही रेती अवाच्या सव्वा दराने विकली जाते. त्यामुळे तस्कर मात्र कोट्यवधींची उलाढाल करत असल्याचे बोलले जाते.विशेष म्हणजे ही वाहतूक कारंजा शहरासह ग्रामीण भागात लपूनछपून नव्हे, तर सर्रास भरदिवसा होत असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महसूल विभाग, पोलिस यंत्रणा आणि खनिज विभाग यांच्यात समन्वयाचा अभाव आहे का, की जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे, असा सवाल सामान्य नागरिक उपस्थित करत आहेत. अवैध रेती उत्खननामुळे पर्यावरणीय हानीही गंभीर स्वरूप धारण करत आहे. याकडे वेळीच लक्ष न दिल्यास भविष्यात मोठे संकट ओढवू शकते. त्यामुळे अवैध रेती वाहतुकीवर तात्काळ अंकुश ठेवावा, संबंधित वाहनांवर कारवाई करावी आणि जबाबदार अधिकार्यांची चौकशी करावी. अशी मागणी होत आहे. अन्यथा प्रशासनाविरुद्ध जनआंदोलन उभारण्याचा इशाराही देण्यात येत आहे.
शासनाने महसूल वाढीच्या घोषणा कराव्यात, पण प्रत्यक्षात डोळ्यासमोर सुरू असलेल्या रेती तस्करीकडे दुर्लक्ष करावे, ही बाब दुर्दैवी आहे. आता तरी जिल्हा प्रशासनाने कठोर पावले उचलून रेती माफियांना लगाम घालावा, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.