जळगाव,
Jalgaon municipal scheme पतीच्या निधनानंतर संसाराचा गाडा ओढत असलेल्या विधवा आणि निराधार मातांसाठी जळगाव महानगरपालिकेने एक महत्त्वपूर्ण मदत योजना सुरू केली आहे. मुलीच्या लग्नासाठी आर्थिक अडचणीत असलेल्या मातांना पालिकेकडून प्रत्येकी २१ हजार रुपयांचे अर्थसहाय्य मिळणार आहे. विशेष म्हणजे, ही योजना महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच राबवली जात आहे.
महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाद्वारे सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी ही योजना आखण्यात आली असून, एकूण २३ लाभार्थ्यांचा समावेश होणार आहे. या योजनेचा लाभ ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर दिला जाणार असल्याने पात्र महिलांनी लवकरात लवकर अर्ज करणे आवश्यक आहे.अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ फेब्रुवारी २०२६ आहे आणि अर्ज कार्यालयीन वेळेत जळगाव महानगरपालिका, सहावा मजला, डे एनयूएलएम विभागात सादर करणे अपेक्षित आहे. अर्ज साध्या कागदावर स्वहस्ताक्षरीत किंवा संगणकीकृत स्वरूपात स्वीकारला जाईल.योजनेची पात्रता व अटी स्पष्ट केल्या आहेत. अर्जदार महिला जळगाव महानगरपालिका क्षेत्रात किमान १० वर्षांपासून वास्तव्यास असावी. मुलीचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे आणि आईने पुनर्विवाह केलेला नसावा, याचे प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे. योजनेचा लाभ थेट बँक खात्यात जमा केला जाईल.
आवश्यक कागदपत्रांमध्ये मुलीचा जन्मदाखला, शाळा सोडल्याचा दाखला किंवा १०वी/१२वीचे प्रमाणपत्र, १० वर्षांचा निवासी पुरावा, आई व मुलीचे आधारकार्ड, पतीचा मृत्यू दाखला, पिवळे किंवा केसरी रेशनकार्ड तसेच बँक पासबुकचे पहिले पान यांचा समावेश आहे. तसेच संजय गांधी निराधार योजनेचे कार्ड व पुनर्विवाह न केल्याचे स्वहस्ताक्षरीत प्रतिज्ञापत्र सादर करणे अनिवार्य आहे.जळगाव महानगरपालिकेच्या उपायुक्त निर्मला गायकवाड-पेखळे यांनी आवाहन केले की, “पात्र महिलांनी मुदतीत आपले अर्ज सादर करावेत. जास्तीत जास्त गरजू महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा.”या योजनेमुळे आर्थिक अडचणीत असलेल्या विधवा आणि निराधार मातांसाठी मोठी मदत मिळणार आहे आणि त्यांच्या मुलीच्या लग्नाशी संबंधित समस्यांचे समाधान होण्यास पालिकेने महत्त्वाची पाऊल उचलले आहे.