अर्जुनी मोर,
Sakoli-Wadsa bus service demand, साकोली ते वडसा या मार्गावरील इटखेडा-खामखुरा-कोरंभी-अर्जुननगर-आसली-गोरानगर मार्गे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची नियमित बस सेवा तातडीने सुरू करण्यात यावी, अशी मागणी खामखुरा येथील ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे.
सदर मार्गावरील अनेक गावांमध्ये सध्या कोणतेही नियमित प्रवासी साधन उपलब्ध नसल्याने नागरिकांना दळणवळणासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः आजारी रुग्णांना उपचारासाठी वेळेत रुग्णालयात पोहोचणे कठीण होत असून काही वेळा जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. परिसरातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी अर्जुनी/मोर, वडसा तसेच इतर ठिकाणी जावे लागते. मात्र प्रवासी वाहनांची सोय नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शेतकरी, कामगार आणि लहान व्यावसायिकांनाही दैनंदिन कामकाजासाठी ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वडसा येथे मोठी बाजारपेठ तसेच विविध शासकीय कार्यालये आणि आरोग्य सुविधा उपलब्ध असल्यामुळे या मार्गावर नियमित बससेवा सुरू होणे अत्यावश्यक असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सदर मार्ग वाहतुकीच्या दृष्टीनेही सोयीचा असून बससेवा सुरू झाल्यास मोठ्या प्रमाणात प्रवाशांचा लाभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. निवेदनाच्या प्रती स्थानिक आमदारांसह संबंधित अधिकार्यांना देण्यात आल्या असून या मागणीवर लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.