जनरल मनोज पांडे यांचे प्रतिपादन
अमरावती विद्यापीठ दीक्षांत समारंभ
अमरावती,
तरुण पिढी ही केवळ देशाचे नागरिक नसून ती भारताच्या परिवर्तनाचा आणि प्रगतीचा एक अविभाज्य भाग आहे. येणा-या काळात विविध क्षेत्रांतील नेतृत्वाची धुरा तुम्हा तरुणांच्या खांद्यावर असेल, युवाशक्ती हीच भारताच्या प्रगतीची खरी ओळख असल्याचे प्रेरणादायी उद्गार भारतीय लष्कराचे माजी प्रमुख General Manoj Pandey जनरल मनोज पांडे यांनी काढले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या सोमवारी झालेल्या ४२ वा दीक्षांत समारंभामध्ये प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे तसेच विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. आर. एम. कडू, हर्षवर्धन देशमुख, डॉ. प्रवीण रघुवंशी, डॉ. आर. डी. सिकची, डॉ. व्ही. एच. नागरे, डॉ. व्ही. एम. मेटकर, डॉ. विद्या शर्मा, डॉ. ए. एम. बोर्डे, डॉ. मनिषा कोडापे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी, वित्त व लेखा अधिकारी सीए पुष्कर देशपांडे, अधिष्ठाता डॉ. अरूण हरणे, डॉ. एच. आर. देशमुख, डॉ. मोना चिमोटे, डॉ. वैशाली गुडधे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, आयक्युएसी संचालक डॉ. संदीप वाघुळे, तंत्रशिक्षण सहसंचालक डॉ. व्ही. आर. मानकर, उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. अभय खांबोरकर प्रामुख्याने उपस्थित होते.
General Manoj Pandey जनरल मनोज पांडे यांनी या प्रसंगी पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थांचे अभिनंदन केले आणि भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी ’तीन सी’ चा मंत्र दिला. चरित्र, क्षमता आणि आचरण हे यशाचे तीन आधारस्तंभ आहेत. प्रामाणिकपणा, निष्ठा आणि नैतिक धैर्य हे उत्तम माणसाचे लक्षण आहे. विद्यार्थांनो हेच गुण तुम्हाला योग्य मार्ग निवडण्यास मदत करतील. आपल्या कार्यक्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी ज्ञान आणि कौशल्य सतत अद्ययावत ठेवा. आयुष्यभर शिकण्याची वृत्ती जोपासा. शिस्त, सांघिक कार्य आणि सहानुभूती या गुणांमुळे तुम्ही समाजात वेगळी ओळख निर्माण करू शकाल. बदलाचा स्वीकार करण्याचे आवाहन त्यांनी केले. समारंभा डॉ. कमलताई रामकृष्ण गवई यांना डिलीट पदवीने सन्मानीत करण्यात आले. त्यांचे पुत्र व सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यावेळी प्रामुख्याने हजर होते.
गुणवंतांचा पदके व पारितोषीकांनी सन्मान
नेहरु कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नेर परसोपंत येथील निकीता किशोर पुनसे या विद्यार्थीनीने ६ सुवर्ण व १ रोख पारितोषिक, आर.ए. कला, एम.के. वाणिज्य व एस.आर. राठी विज्ञान महाविद्यालय, वाशीम येथील पल्लवी बालकृष्ण राठोड या विद्यार्थीनीने ५ सुवर्ण व रौप्य १ रोख, श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय, शेगांव येथील तेजस्विनी विठ्ठल भगत आणि विद्याभारती महाविद्यालय, अमरावती येथील साईश्वरी सत्यजित इंदुरकर या विद्यार्थीनीने प्रत्येकी ४ सुवर्ण पारितोषिके प्राप्त केली आहेत. दीक्षांत समारंभात या विद्यार्थीनींना मान्यवरांच्या हस्ते पदके व रोख पारितोषिके देवून गौरवान्वित करण्यात आले. दीक्षांत समारंभात ८० टक्के पदके मुलींना, तर २० टक्के पदके मुलांना मिळाली.