कल्याण
Kalyan-Dombivli Municipal Corporation कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने शहरातील स्वच्छतेसाठी आता कंबर कसली असून उघड्यावर कचरा फेकणाऱ्यांविरोधात धडक मोहिम हाती घेतली आहे. विशेष म्हणजे या मोहिमेची धुरा महिला बचत गटांच्या हाती देण्यात आली असून त्यांना महिला मार्शल म्हणून नियुक्त केले गेले आहे. गेल्या आठ दिवसांत या मार्शलनी तब्बल ५० हजार रुपयांचा दंड वसूल करून बेशिस्त नागरिकांना धडा शिकवला आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी महोत्सवानिमित्त २०२५-२६ हे वर्ष महिला सक्षमीकरणाला समर्पित करण्यात आले आहे. याच धर्तीवर घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी महिला बचत गटातील ५० महिलांना मार्शल म्हणून कार्यादेश दिला आहे. या महिलांना कारवाईचे अधिकार दिले असून वसूल केलेल्या दंडाच्या रकमेपैकी ४० टक्के रक्कम प्रोत्साहन भत्ता म्हणून देण्यात येणार आहे. यामुळे महिला स्वावलंबी होताच त्यांना रोजगाराची नवी संधी देखील उपलब्ध झाली आहे.
कल्याण पूर्वेतील Kalyan-Dombivli Municipal Corporation आनंदवाडी परिसरासह विविध भागांत महिला मार्शल गस्त घालत आहेत. उघड्यावर कचरा फेकणे, प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणे तसेच नियम मोडणाऱ्या फेरीवाल्यांवर त्यांची करडी नजर आहे. घरोघरी कचरा वर्गीकरण केलं जात आहे की नाही, घंटागाडीत कचरा दिला जातोय की नाही, यावर देखील लक्ष ठेवले जात आहे. प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे की नियम मोडणाऱ्यावर कठोर कारवाई केली जाईल.तसेच कल्याण पश्चिमेतील हायप्रोफाईल बिरला वन्या सोसायटीत कचऱ्याचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. विकासकाने कचरा प्रकल्प कार्यान्वित न केल्याने आणि कचरा गोडाऊनमध्ये साठवून ठेवल्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. यामुळे सुमारे ८०० कुटुंबांना त्रास सहन करावा लागत असून लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की काही रहिवाशांना घर सोडावे लागण्याची वेळ आली आहे.संतप्त रहिवाशांनी सोसायटीबाहेर गाड्या आडव्या लावून निषेध नोंदवला आहे. नियमानुसार, १०० किलो पेक्षा जास्त कचरा निर्माण होणाऱ्या सोसायट्यांना स्वतःचे कंपोस्टिंग युनिट चालवणे बंधनकारक आहे. महापालिकेच्या घनकचरा विभागाने या प्रकरणाची दखल घेतली असून विकासकावर लवकरच साईट व्हिजिट करून दंडात्मक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
या मोहिमेमुळे शहरातील स्वच्छतेच्या नियमांचे पालन सुनिश्चित करण्यास मोठा हातभार लागणार असून महिला सक्षमीकरणासंदर्भातही सकारात्मक संदेश जात आहे.