नवी दिल्ली,
NCERT textbooks for class 8 राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) बुधवारी आठवीच्या इयत्तेच्या पाठ्यपुस्तकातील "न्यायिक भ्रष्टाचार" प्रकरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या फटकारानंतर माफी मागितली आहे. एनसीईआरटीने सांगितले की या चुकीच्या मजकुरामुळे काही अनुचित छाप पडला असून, योग्य अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करून पाठ्यपुस्तक पुन्हा लिहिले जाईल. न्यायालयाच्या फटकारानंतर, पाठ्यपुस्तक त्यांच्या वेबसाइटवरून तातडीने काढून टाकण्यात आले आणि त्याचे वितरण थांबवले गेले आहे.
एनसीईआरटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, इयत्ता आठवीच्या पाठ्यपुस्तकात काही मजकूर व निर्णयातील त्रुटी अनावधानाने समाविष्ट झाल्या आहेत. आम्ही न्यायालयाचे आणि भारतीय संविधानाचे सन्मान करतो, तसेच मूलभूत अधिकारांचे रक्षण करण्यास कटिबद्ध आहोत. या चूकीमुळे कोणत्याही संवैधानिक संस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा किंवा तिचा अधिकार कमी करण्याचा कोणताही हेतू नव्हता.
एनसीईआरटीने सांगितले की, चालू पुनरावलोकन प्रक्रियेच्या भाग म्हणून, रचनात्मक सूचना स्वीकारल्या जातील आणि संबंधित प्राधिकरणाशी सल्लामसलत करून पाठ्यपुस्तक आवश्यकतेनुसार पुन्हा तयार केले जाईल. नवीन पाठ्यपुस्तक २०२६-२७ शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीला इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिले जाईल. मुख्य न्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती विपुल पंचोली यांच्या खंडपीठाने या प्रकरणावर तीव्र आक्षेप घेतला आणि एनसीईआरटीला नोटीस बजावली. न्यायालयाने स्पष्ट केले की कोणालाही न्यायव्यवस्थेची बदनामी करण्याची परवानगी नाही. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि अभिषेक सिंघवी यांनी तातडीने सुनावणीची मागणी केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.