कोलंबो
Shanaka's statement २०२६ च्या आयसीसी पुरुष टी२० विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर श्रीलंका संघाचा कर्णधार दासुन शनाका याने आपल्या भावना व्यक्त करत संघाभोवती पसरलेल्या नकारात्मक वातावरणावर कठोर शब्दांत भाष्य केले. सह-यजमान म्हणून स्पर्धेत उतरलेल्या श्रीलंकेने गट फेरीत ऑस्ट्रेलियावर विजय मिळवत आगेकूच केली होती; मात्र झिम्बाब्वेविरुद्ध झालेला पराभव निर्णायक ठरला. त्यानंतर संघाला विजयाची लय सापडली नाही आणि अखेरीस स्पर्धेतून त्यांना गाशा गुंडाळावा लागला.
न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर मोठ्या फरकाने पराभव झाल्यानंतर उपांत्य फेरीची संधीही हातातून गेली. सलग पराभवांमुळे संघावर टीकेची झोड उठली असून यामुळे खेळाडूंवर मानसिक ताण वाढल्याचे शनाका यांनी मान्य केले. त्यांच्या मते, संघाबाहेरील वातावरणातील नकारात्मक चर्चा खेळाडूंच्या कामगिरीवर परिणाम करत आहे. मैदानाबाहेरून सतत टीका होत असताना सकारात्मक राहणे कठीण जाते, असे त्यांनी सांगितले.
या स्पर्धेतील खेळपट्ट्या गोलंदाजांना अनुकूल होत्या, तसेच काही महत्त्वाचे खेळाडू पूर्ण तंदुरुस्त नव्हते, याचाही फटका बसल्याचे त्यांनी नमूद केले. विशेषतः फलंदाजांनी अपेक्षित कामगिरी न केल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. इंग्लंडविरुद्ध अल्प धावसंख्येवर बाद झाल्यानंतर न्यूझीलंडविरुद्धही संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. वरच्या फळीतील फलंदाजांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि आक्रमक दृष्टिकोन ठेवला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. टी-२० प्रकारात धाडसी निर्णय आणि सकारात्मक हेतू अत्यावश्यक असतो; जोखीम न घेतल्यास यश मिळणे कठीण आहे, असे मतही शनाका यांनी व्यक्त केले. श्रीलंका क्रिकेटसमोरील आव्हाने गंभीर असून भावी पिढीच्या हितासाठी योग्य पावले उचलली जाणे आवश्यक आहे, असे संकेत त्यांनी दिले.