वर्धा,
आधुनिक होणे म्हणजे जे योग्य मार्गदर्शन करतात त्यांचा विरोध करणे होय. शाश्वत विचारांना टाळून जगणे, स्वतःचे करियर, भोगवादाकडे वाढता कल, व्यसनांना प्रतिष्ठा देणे, पाश्चिमात्यांचे अनुकरण सुरू आहे. पाश्चिमात्य संस्कृतीमुळे हिंदू संस्कृतीचे पतन सुरू आहे. त्यामुळे संस्कार संपन्न परिवारच संस्कृतीचे जतन करतील, असे प्रतिपादन विवेकानंद केंद्र, कन्याकुमारीच्या राष्ट्रीय अध्यक्ष PadmShri Nivedita Bhide पद्मश्री निवेदिता भिडे यांनी केले. स्वामी विवेकानंद केंद्र वर्धा शाखेच्या वतीने स्थानिक अनेकान्त स्वाध्याय मंदिर येथे ‘भारतीय संस्कृतीचे जनत काळाची गरज’ या विषयावर आयोजित व्याख्यानातत्या बोलत होत्या. यावेळी विदर्भ विभाग संचालक डॉ. जगदीश हेडाऊ, संपर्क प्रमुख डॉ. शेषराव बावनकर उपस्थित होते.
PadmShri Nivedita Bhide पद्मश्री भिडे पुढे म्हणाल्या की, आज आपली संस्कृती रसातळाला जात आहे. नातेसंबंध हा आपल्या संस्कृतीचा पूर्वी गाभा होता. जीवनात शाश्वत आनंद होता. आज सर्वकाही आहे. पण, आनंदच आपण गमावून बसलो आहोत. सर्वपरिवार विघटित झाले आहेत म्हणून भारतातील प्रत्येक कुटुंबाला मूळ भारतीय संस्कृती, संस्कार आणि मूल्यावर आधारित एक सशत, सुखी व समृद्ध बनविणे आवश्यक आहे. भाषा, भूषा, भजन, भोजन, भ्रमण व पर्यावरण आदी घटकांच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबात राष्ट्रप्रेम जागृत करणे काळाची गरज आहे. नाते संबंध जर सुरेख झाले तर भारतीय समाजातील सेवाकार्यात वाढ होऊन सामाजिक समरसता वाढेल व प्रत्येकला स्व आधारित जीवन जगण्याची प्रेरणा मिळेल. त्यातून अनेक कुटुंबांना नागरी कर्तव्याची जाणीव निर्माण होईल व सक्षम भारत निर्माण होईल, असे त्या म्हणाल्या. प्रास्ताविक मनोहर बारस्कर यांनी केले. संचालन डॉ. राम बावनकर यांनी केले तर आभार अमोल गाढवकर यांनी मानले. यावेळी प्रांत संघटक सुजा दळवी व विदर्भ विभाग प्रमुख भरत जोशी यांची उपस्थिती होती.