मार्च महिना एप्रिलइतकाच उष्ण राहणार?

28 Feb 2026 09:35:25
नवी दिल्ली,
Will March be as hot as April वसंत ऋतूच्या सुरुवातीसह देशभरातील हवामानात बदल दिसून येत आहेत. डोंगराळ भागांमध्ये पाऊस सुरू असला तरी वायव्य आणि मध्य भारतातील मैदानी भागात तापमान सातत्याने वाढत आहे. हवामान खात्याच्या मते, या भागांमध्ये कमाल तापमान सामान्यपेक्षा दोन ते चार अंश जास्त नोंदवले जात आहे. कोरडे वायव्य वारे दिवसाचे तापमान अधिक वाढवत आहेत. राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्राच्या काही भागात तापमान सध्या ३५ ते ३७ अंश सेल्सिअसच्या जवळ पोहोचले असून, हे उन्हाळ्याच्या सुरुवातीचे संकेत मानले जात आहेत. हवामान खात्याचे निरीक्षण सांगते की वायव्य भारतातील अनेक भागांमध्ये कमाल तापमान एका आठवड्यासाठी सामान्यपेक्षा तीन ते पाच अंश जास्त राहण्याची शक्यता आहे.
 
 
 
Will March be as hot as April
 
मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, पंजाब, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, आसाम, त्रिपुरा, छत्तीसगड, बिहार, झारखंड, ओडिशा आणि महाराष्ट्रात सध्या कमाल तापमान ३० ते ३४ अंश सेल्सिअस दरम्यान आहे, तर किमान तापमान १२ ते १५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. मदुराई येथे सर्वाधिक ३७ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. हवामान खात्याचे म्हणणे आहे की चार व पाच मार्चला गुजरातच्या काही भागात उष्ण आणि दमट वातावरण राहील. मध्य भारतात पुढील २४ तासांत तापमान सध्या जसंच्या तसं राहण्याची शक्यता आहे, परंतु पुढील सहा दिवसांत हळूहळू दोन ते चार अंश वाढ होऊ शकते. आठवड्याच्या शेवटी मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रातील कमाल तापमान सामान्यपेक्षा दोन ते चार अंश जास्त राहण्याची अपेक्षा आहे.
 
 
दोन कमकुवत पश्चिमी विक्षोभांच्या परिणामामुळे जम्मू आणि काश्मीर, उप-हिमालयी पश्चिम बंगाल, सिक्कीम, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हलका पाऊस व बर्फवृष्टी होऊ शकते. तसेच २८ फेब्रुवारी रोजी अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयमध्येही हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. शनिवारी दिल्ली आणि परिसरात आकाश निरभ्र राहील. दिल्लीतील कमाल तापमान ३० ते ३२ अंश आणि किमान तापमान १३ ते १५ अंश दरम्यान राहण्याची अपेक्षा आहे. अनेक ठिकाणी किमान तापमान सामान्यपेक्षा जास्त राहील तर कमाल तापमान सामान्यपेक्षा १.५ अंश जास्त राहण्याची शक्यता आहे.
Powered By Sangraha 9.0