सांगली,
Foot and Mouth Disease outbreak, सांगली जिल्ह्यातील मौजे डिग्रज, कर्नाळ आणि पद्माळे या तीन गावांमध्ये जनावरांमध्ये लाळ्या आजाराचा गंभीर उद्रेक झाला असून, वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे अनेक जनावरे मृत्युमुखी पडत आहेत. या परिस्थितीमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेषतः डिग्रज गावात आतापर्यंत सात ते आठ जनावरे या आजारामुळे दगावल्याची नोंद झाली असून, उर्वरित दोन गावांमध्येही मोठ्या प्रमाणावर जनावरे बाधित झाली आहेत.
या तीन गावांतील सुमारे Foot and Mouth Disease outbreak, पन्नास टक्क्यांहून अधिक जनावरांना लाळ्या आजाराची तीव्र लागण झाल्याचे चित्र आहे. बाधित जनावरांच्या तोंडातून मोठ्या प्रमाणात लाळ गळणे, पायांच्या खुरांचे नुकसान होणे, चालण्यात अडचणी येणे अशी गंभीर लक्षणे दिसून येत असून, काही जनावरांची अवस्था अत्यंत नाजूक आहे. मात्र, योग्य वेळी पशुवैद्यकीय उपचार न मिळाल्याने आजार नियंत्रणाबाहेर जात असल्याची शेतकऱ्यांची भावना आहे.डिग्रज, कर्नाळ आणि पद्माळे ही तीनही गावे एका पशुवैद्यकीय विभागांतर्गत येतात. मात्र, या विभागात सध्या केवळ एकच पशुवैद्यकीय डॉक्टर उपलब्ध असून, त्यांच्या पदोन्नतीनंतर अतिरिक्त जबाबदारी दुग्धशाळा विभागाकडे गेल्याने या गावांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. परिणामी, आजाराचा प्रसार वेगाने होत असतानाही वेळेवर तपासणी, उपचार आणि लसीकरण होऊ शकलेले नाही.
उपाययोजना करा
या तीन गावांमध्ये सुमारे बारा ते तेरा हजार जनावरे असून, त्यांच्यापासून दररोज अंदाजे चौदा ते पंधरा हजार लिटर दूध उत्पादन होते. या दूधविक्रीवरच गावातील शेतकऱ्यांचे कुटुंब, मुलांचे शिक्षण तसेच दैनंदिन खर्च अवलंबून आहेत. एका जनावराची सरासरी किंमत सुमारे एक लाख रुपये असल्याने, जनावरांच्या मृत्यूमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसानही मोठ्या प्रमाणात होत आहे.या पार्श्वभूमीवर स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनिल फराटे यांनी प्रशासनाकडे तातडीची मागणी केली आहे. अतिरिक्त पशुवैद्यकीय डॉक्टरांची त्वरित नियुक्ती करून लाळ्या आजाराने बाधित सर्व जनावरांचे लसीकरण करण्यात यावे, तसेच मृत जनावरांच्या मालकांना तात्काळ योग्य ती नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा स्वतंत्र भारत पक्ष व विविध शेतकरी संघटनांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.दरम्यान, प्रशासनाकडून तातडीची उपाययोजना न झाल्यास या आजाराचा फैलाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत असून, शेतकरी वर्गाकडून लवकरात लवकर ठोस निर्णय घेण्याची मागणी जोर धरत आहे.