पुणे,
ZP and Panchayat Samiti Elections महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीचे निकाल हळूहळू स्पष्ट होत असून, अनेक ठिकाणी प्रस्थापित राजकीय घराण्यांचे वर्चस्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. पुणे, सोलापूर, रायगड आणि रत्नागिरीसारख्या जिल्ह्यांत दिग्गज नेत्यांच्या नातेवाईकांनी आपला प्रभाव कायम राखत यश संपादन केले आहे.
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव मतदारसंघात माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या पुतणे विवेक वळसे पाटील यांनी पारगाव जरकवाडी गटातून तिसऱ्या फेरीत २,१३० मतांची आघाडी घेत विजय मिळवला. तर पुरंदर तालुक्यात माजी आमदार बापूसाहेब पठारे यांच्या कन्या रूपाली झेंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर यश संपादन केले. या तालुक्यातील दोन्ही पंचायत समिती सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयी झाल्यामुळे पक्षाची पकड अधिक मजबूत झाल्याचे दिसून आले.
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात मानेगाव जिल्हा परिषद गटात माजी मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे आणि शिवाजीराव सावंत यांचे पुत्र पृथ्वीराज सावंत यांनी भाजपच्या तिकिटावर तब्बल ६,८०० मतांच्या फरकाने विजय मिळवला. तसेच भाजप नेते राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत यशस्वी पदार्पण करून बाजी मारली.
कोकणातील ZP and Panchayat Samiti Elections जिल्ह्यांमध्येही राजकीय घराण्यांचे दबदबा स्पष्टपणे दिसून आला. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर विधानसभा मतदारसंघातील असगोली जिल्हा परिषद गटातून आमदार भास्कर जाधव यांचे पुत्र विक्रांत जाधव यांनी पहिल्या फेरीपासूनच ५७१ मतांची आघाडी घेऊन विजय मिळवला. रायगड जिल्ह्यात आमदार भरत गोगावले यांचे चिरंजीव विकास गोगावले यांनी प्रतिस्पर्ध्याला पराभूत करत आपले राजकीय अस्तित्व सिद्ध केले.या निकालांमधून स्पष्ट दिसून आले आहे की स्थानिक पातळीवर जनसंपर्क आणि कौटुंबिक राजकीय वारसा यांचा उमेदवारांच्या यशावर निर्णायक परिणाम होत आहे. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी या निकालांना महत्त्वाचे संकेत मानले जात आहेत.राजकीय विश्लेषकांचा असा अंदाज आहे की, स्थानिक स्वराज्य संस्थांवर राजकीय घराण्यांचा प्रभाव टिकून राहिल्याने पुढील काळात राजकीय समीकरणांवर याचा परिणाम होईल.