पुणे
My Village Healthy Village campaign ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेची क्षमता वाढविण्यासाठी आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा अधिक प्रभावी करण्यासाठी राज्य सरकारने “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” या राज्यव्यापी अभियानाची सुरूवात केली आहे. या उपक्रमाद्वारे ग्रामपंचायतींना सर्वसमावेशक आरोग्यसेवा पुरवण्यास प्रोत्साहन दिले जाणार आहे आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गावांना “आरोग्यसंपन्न ग्राम” म्हणून ओळखले जाणार आहे.
अभियानाच्या अंतर्गत सहभागी ग्रामपंचायतींचे ५९ विविध निकषांवर मूल्यांकन केले जाईल. यात स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, सुरक्षित पिण्याचे पाणी, लसीकरणाची टक्केवारी, माता-बाल आरोग्य सेवा, कुपोषण नियंत्रण, रोग प्रतिबंधक उपाय आणि आरोग्य सुविधांची उपलब्धता यांचा समावेश आहे. मूल्यांकन प्रक्रियेत ७० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या गावांना “आरोग्यसंपन्न ग्राम” हा दर्जा देण्यात येणार आहे.
या स्पर्धात्मक उपक्रमामुळे My Village Healthy Village campaign गावांमध्ये स्वच्छता, पोषण, लसीकरण, प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आणि डिजिटल आरोग्य नोंदी या घटकांना चालना मिळेल, असे आरोग्य विभागाने सांगितले आहे. अभियानांतर्गत नागरिकांच्या आरोग्य नोंदी डिजिटल स्वरूपात तयार केल्या जाणार असून, यामुळे आजारांचे वेळेवर निदान, उपचार आणि आरोग्य सेवांचे नियोजन अधिक प्रभावीपणे करता येणार आहे.अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना राज्यस्तरावर ५ कोटी, ३ कोटी आणि २ कोटी रुपयांपर्यंतचे बक्षिस देण्यात येणार आहे. याशिवाय विभागीय, जिल्हा व तालुका स्तरावरही स्वतंत्र पुरस्कारांची तरतूद आहे. अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्राम, तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर समित्या स्थापन केल्या जातील. या समित्यांमध्ये ग्रामपंचायत प्रतिनिधी, आरोग्य विभागाचे अधिकारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका आणि स्थानिक स्वयंसेवी संस्थांचा समावेश असेल.ग्रामपंचायतींनी आरोग्य विभागाच्या अधिकृत पोर्टलवर नोंदणी करून या अभियानात सहभाग घेता येणार आहे. यासाठी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय आणि जिल्हा आरोग्य विभागाकडून मार्गदर्शनही केले जाणार आहे.राज्य सरकारच्या या उपक्रमाद्वारे ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेत गुणात्मक सुधारणा साधण्याचा आणि सर्व नागरिकांसाठी सुरक्षित, पोषणयुक्त आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा सुनिश्चित करण्याचा उद्देश आहे. ग्रामीण समाजात आरोग्याबाबत जनजागृती वाढवणे, माता-बाल आरोग्य सुधारणा, लसीकरणाचे शंभर टक्के लक्ष्य साधणे आणि स्वच्छता व सुरक्षित पाणी यावर विशेष भर देणे या अभियानाचे मुख्य हेतू आहेत.या अभिनव उपक्रमामुळे गावांमध्ये आरोग्य व्यवस्थेच्या दर्जात लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा असून, ग्रामपंचायतींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.