चुरणी
Melghat चिखलदरा तालुक्यातील राहू गावातील श्रेया शालिकराम दारसिंबे या दोन महिने वीस दिवसाच्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. सुरुवातीला या चिमुकलीला हतरू प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. याठिकाणी तब्येतीत सुधारणा होत नसल्याने तिला ग्रामीण रुग्णालय चुरणी येथे भरती करण्यात आले. तिची प्रकृती आणखी खराब झाल्यामुळे पुढील उपचारासाठी तिला अचलपूर येथे दाखल करण्यासाठी पाठविण्यात आले. परंतु, प्रवासात त्या मुलीचा मृत्यू झाल्यामुळे पुन्हा मेळघाटात बालमृत्यूची नोंद झाली आहे. Melghat एका आठवड्या अगोदर सुद्धा याच चुरणी ग्रामीण रुग्णालयामध्ये एका मुलाचा मृत्यू झाला होता. आठवड्याभरातच हा दुसरा मृत्यू झाल्याने या परिसरात खळबळ उडाली आहे. दुसरीकडे आरोग्य विभाग मेळघाटसाठी कुठलीही ठोस उपाययोजना करत नसल्यामुळे मेळघाटात बालमृत्यूचे प्रमाण अजूनही वाढतच आहे. राज्य शासनामार्फत चुरणी येथे लवकरात लवकर उपजिल्हा रुग्णालय उभारण्यात यावे अशी मागणी होत आहे.
Melghat मुलीला श्वसनाचा त्रास
दोन महिने वीस दिवसाची मुलगी होती. सुरुवातीला तिला हतरू प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून घेतले व त्यानंतर चुरणी ग्रामीण रुग्णालय येथे उपचार दिल्यानंतर पुढील उपचारासाठी तिला उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे पाठविण्यात आले होते. या मुलीला श्वसन संस्थेचा त्रास होत होता. चुरणीवरून परतवाडा नेत असताना वाटेत या मुलीचा मृत्यू झाला, अशी माहिती चिखलदर्याचे प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. केशव कंकाळ यांनी दिली.